SHRIKANT PATIL

Action Others

3  

SHRIKANT PATIL

Action Others

गण्याचं शिक्षण

गण्याचं शिक्षण

3 mins
272


गेल्या महिन्यात गावच्या देवीची यात्रा होती. पाचवीत शिकणा-या गण्याचा बाप पांडबाही मुंबईहून खास यात्रेसाठी आला होता. यात्रेत दुकानं गर्दीने भरली होती. मुंबईतनं चाकरमनी आला म्हटल्यावर खिसा गरम असेपर्यंत गावातली दोन चार पेदाड मित्र जमतातच! त्यादिवशी पांडबासोबतही दोनचार जण होतेच.  पांडबा थोडी टाकूनच होता. त्या वरच्या वाडीत राहणा-या निवृत्त एका पोलिस अधिका-यांना तो भेटल्यावर डुलत डुलत सांगत होता,  "सायबऽऽऽ, आमच्या गण्याला तेवढं तुमच्यासारखं पोलिसऽऽऽ करायचंय बघा. त्याच्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी आहे ."

त्या सायबानं पांडबाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं , "अरं, एवढी सगळी स्वप्नं बघतोस तर आता मुलांसाठी शिक्षणासाठी पैशाची जोडणी करून ठेवायला हवी. त्यासाठी तू एक करायला हवं, दारू पिणं तेवढं बंद करं."  

 " सायबऽऽऽ ,आम्हा गरीब माणसाला काय , हिचाच आधार हो! पणऽऽऽऽ मुलांसाठी काय पण...दारूही नक्की सोडतो सायब "असं सायबाला म्हणत पांडबानं तेथून काढता पाय घेतला.  

     पांडबा मुंबईत एका बांधकाम व्यावसायिकाकडं काम करत होता. दिवसभर अवजड कामं करून थकायचा. त्यामुळं रात्रीला त्याला थोडी दारू घेतल्याशिवाय जमतं नव्हतं. पांडबाला दोन मुलं. पांडबाचं मुलांवर खूपच प्रेम. गण्याला एक मोठी बहीण. ती हायस्कूलला शिकायला जाते. बायको देवाघरी गेल्यापासनं सतत दोन्ही मुलांच्या भविष्याची काळजी पांडबा करायचा. मुलांच्या शिक्षणासाठी त्यानं गावाकडं आपल्या बहीणीकडं मुलं ठेवली होती. महिना-दोन महिन्यातून आपल्या पगारातले पाच -सहा हजार रूपये तो गावी पाठवतो. मुलांची शाळेची प्रगती ऐकून खूश होतो. 

 कधीतरी गावी आल्यावर पांडबाबरोबर दारुसाठी गावाकडची मित्र मंडळी नेहमी जमा व्हायची. त्यांच्या बरोबर पार्टी ठरलेली. तोही सर्व मित्रांना खूश करायचा.पण दारूच्या नशेत पांडबा बडबडायचा. कुणीतरी मुलांच्याबाबत एकाचे -दोन करून सांगायचे. मग पांडू भांडण काढायचा. मुलांना घेऊन मुंबईला जातो म्हणायचा. त्यादिवशी संध्याकाळी मीही तालुक्याहून नुकतंच घरी आलो होतो. इतक्यात पांडबाची बहीण धावत धावत आली व मला म्हणाली, "ओ गुरूजीनू ,गण्या व त्याच्या बहीणीला पोरांचो बापूस मुंबईला घेऊन चाललाय, कोणाचंच ऐकत नाही. दुपार पासनं घरात नुसता पिऊन धिंगाणा घातलाय, आता तिट्टयावर बसची वाट पाहत बसलाय. पोरं रडतंच गेलीत हो. तुम्ही तरी काय समजावून सांगा"  

असं म्हणत मला त्याचा फोन नंबर दिला. 

 मी पांडबाला फोन लावताच त्यानं आपली कहाणी सुरू केली. मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण नशेत असल्याने तो कुणाचंही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. 

शेवटी त्यानं साॅरी सर...मी काय चुकलो असंल तर मला माफ करा.. माझी बस आली ....असं म्हणत फोन ठेवला. शेवटी दुस-या दिवशी मुंबईत पोहचले. मुंबईत एक दोन नातेवाईकांकडे पोरांना ठेवण्यास विचारणा केली. मुंबईत स्वतःचंच पोट भरण्याचं मुश्किल तर इतरांना कोण पोसणार?आणि शिक्षणाचा तर विषयच नाही. नातेवाईकानी नाकारताच पांडबा जाग्यावर आला. नशेत आपण चुकलो हे त्याला कळून चुकलं..आता आपलं मुलांना गावालाच पाठवलेलं बरं असं त्याला वाटलं. एका नातलगांला सोबत करून त्यानं मुलांना गावच्या गाडीत बसवलं व मुलं गावी आली. गरीब मुलांची विनाकारण हेळसांड झाली.

  गरीब माणूस ताकद असेपर्यंत काम करतो.कष्टाच्या आयुष्यात उद्याची स्वप्नं परवडणारी नसतात, आवाक्यातली नसतात , असं जेव्हा त्याची खात्री होते तेव्हा उद्याची आशा सोडतो व आज होता होईतो पर्यंत मजेत जगायचा नकळत मार्ग स्वीकारतो.मग दारू , विडी-सिगारेट यासारखी व्यसनं त्यातूनच जडतात. घटकांभराचं सुख व न परवडणारा मोह जडतो.मग मुलांचं शिक्षणाचं स्वप्नं दूरच राहतं ! म्हणून त्याना हवा असतो आधार व योग्य दिशेने मार्गदर्शन. 

     पांडबालाही गावी आल्यावर आम्ही तेच सांगतो. थोडी कमाई मुलांच्या भविष्यासाठी ठेव. गरीबांना चांगले शिक्षण मिळावे व गरिबी दूर व्हावी हाच आमचा प्रयास. आज पांडबाचा महिन्यातून फोन एकदा तरी येतो. "सर आमच्या गण्याकडं लक्ष्य ठेवा बरं का ! "असं बोलतो. मीही त्याला काही काळजी करू नको, आमचं लक्ष्य असल्याचं सांगतो. तू तेवढं व्यवस्थित रहा. असंच आवर्जून सांगतो ते केवळ गण्याच्या शिक्षणासाठीच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Action