तरीही
तरीही
सरतो श्रावण नित्य इथला
तरी खुणा त्या पानांवरती;
अजून कोकीळ गातो तराणे
वसंत नसल्या झाडांवरती,
त्या बकुळीच्या फुलात अजुनी
गंध साठला,शिशिर असुनी
लाटा येऊन गेल्या तरीही;
अजून रेघा या वाळूवरती,
कसा पुसावा मला कळेना
क्षितीजाच्या भाळीचा मळवट;
उडून गेले पक्षी दिगंती...
पदचिन्हे का इतकी बळकट ?
घडी घालुनी आठवणींची
सागर लहरी देता सोडून;
पून्हा तरंगत येते वरती
ती तुकयाची गाथा होऊन.