स्वातंत्र्यवीर सावरकर
स्वातंत्र्यवीर सावरकर
'ने मजसी ने परत मातृभुमीला,
सागरा प्राण तळमळला,'
केली विनवणी अथांग सागराला
कोटी कोटी नमन माझे त्या स्वातंत्र्यवीराला
जीवनाच्या अमूल्य १३ वर्षे बंदीवासात
केले चिंतन समाजसुधारणेच्या कामी
अंधश्रद्धा, अस्पृश्यता,पोथीपूजा यांतून
कशी होईल मुक्त माझी भारतभूमी
अंदमानच्या काळकोठडीत भोगली काळ्यापाण्याची शिक्षा
जणू देशप्रेम सिद्ध करण्या द्यावी लागली
अतोनात हालअपेष्टा सहन करण्याची परीक्षा
बाभळीच्या काट्यांनी रचली महाकाव्ये
अंदमानच्या भिंतींवर निर्भीडपणे
क्रांतिकारकांचे मनोबल उंचावण्या
संघटनासाठी लिहिली किती धगधगती लेखने
नव्हत्या मान्य रुढीपरंपरा पुरातन
होती त्यांच्या ठायी विज्ञाननिष्ठा
पूजन पशुपक्ष्यांचे अमान्य होते
सांगणे एकच माणसाने माणसाची वाढवा प्रतिष्ठा
थोर क्रांतिकारक,झुंजार स्वातंत्र्यसेनानी
महान देशभक्त,धैर्यानचे मेरुमणी
प्रतिभासंपन्न कवी,तत्त्वनिष्ठ राजकारणी
भाषाशुद्धीचे प्रवर्तक,यंत्रयुगाचे समर्थक
सावरकर तर होते लाखो सद्गुणांचे धनी