संविधान आणि आजची पिढी
संविधान आणि आजची पिढी
न्याय बंधुता समतेसाठी संविधान हे घडले
या घटनेने गणराज्याचे पाउल पुढती पडले
विरोध झाले चर्चा झाल्या कच्च्या मसुद्यावरती
मूलभूत जनहक्कासाठी भीमराव हे लढले
मजूर वंचित शेतकरी अन महिलांचा सन्मान
सामाजिक आर्थिक नीतीचे पूर्ण ठेविले भान
विचार श्रद्धा अभिव्यक्ती अन विश्वासू स्वातंत्र्य
व्यक्तीप्रतिष्ठा,राष्ट्र एकता बंधुत्वाची खाण
शिक्षण झाले सोपे आणिक मक्तेदारी सरली
भारतीय जनतेची ओंजळ सौख्य फुलांनी भरली
नागरिक या भारतभूचा बनला येथे राजा
जनशाहीही जगात मोठी आदर्शाची ठरली
अधिकारांनी नवउंचीवर बहुजनांना नेले
किल्मिष इथले जातिपातिचे समाजातुनी गेले
सर्वधर्म सम भावभावना यांचा आदर केला
लिहित भिमाने संविधान हे जगणे उन्नत केले
कथा,गोष्ट ना विश्वग्रंथ हा नियम स्वतः पाळावे
सर्व मानवा मार्ग दाखवी जगी कसे वागावे
न्याय बंधुता समानतेचे धडे सदा गिरवावे
नव्या पिढीने पुन्हा पुन्हा हे संविधान वाचावे