साद वसुंधरेची....
साद वसुंधरेची....
साद वसुंधरेची....
एकेकाळी पृथ्वीवरती वृक्षांचे घनदाट जंगल।
प्राणी - पक्षी विहरत होते, करती ' जंगल में मंगल '॥
दिवस बदलले, वृक्ष तोडले, इमारतींची आता जंगले।
अरण्यातले प्राणी - पक्षी भयभीत होऊन दूर पांगले ॥
सिमेंटच्या ह्या जंगलामध्ये कोठे पाणी, कोठे हिरवळ? ।
निसर्गाची साथ शोधती , त्यांस म्हणती इथे खेडवळ॥
आभाळाची नको निळाई, हवी कुणाला इथे हिरवाई?
उंच इमारती, भव्य फ्लॅटच्या मालकास का हवी वनराई? ॥
परंतु हे आभासी जीवन, कुठे घेऊन जाईल तुम्हां?।
एके दिवशी कराल तुम्हीही पाण्यासाठी पृथ्वी - परिक्रमा॥
पाणी जेव्हा नसेल भूवर, शास्त्रही शोधा घालील आवर।
हे विचारी मनुजा , तूच रे, वृक्ष वाचवून जीवन सावर॥
आधुनिकतेच्या नावाखाली , नको अंदाधुंद वृक्ष कत्तल।
तापेल जर ही वसुंधरा, कोपेल ती, अन् घडवेल अद्दल॥
तेव्हा नसेल हे जनजीवन, पाणी शोधीत फिरशील वणवण।
पशू - पक्षी शोधतील तुज मग,व्याकुळ होऊन करण्या भक्षण॥
माय आपली वसुंधरा ही, हिरवी झाडे तिची लेकरे।
वाचव त्यांना, वाचव जीवन, रक्षण करुनी सुखी राहा रे॥