प्रिय सर...
प्रिय सर...
आठवते आजही मला...
हाताला धरून गेलेलो शाळेत,
भिती, कुतुहल, मनात
विविध विचारांचे काहूर...
का कोणास ठाऊक पण,
एक वेगळीच भिती, एक वेगळीच हुरहूर
पण सर... जेव्हा आपण ठेवलात पाठीवर
मायेचा हात, आणि म्हणालात "बाळा तुझे नाव काय?"
घाबरु नकोस..तु हुशार आहे,
त्या मायेच्या स्पर्शाने,
कुठल्या कुठे पळाली भिती,
त्या आश्वासक शब्दाने तुमच्या..
मनात संचारली उर्जा कीती,
सर.. तुम्ही या मातीला आकार दिलात..
चिमुकल्या पंखात उडण्याचे बळ दिले,
जगात जगताना जगण्याचे दिलेत धडे..
बालबुद्धी होतो म्हणून किंवा
माझ्यातील काही कमतरतेमुळे,
तेव्हा तुमचे महत्त्व समजू शकलो नाही.
जेव्हा आज ठोकरा खातोय जगाच्या,
..तेव्हा सर, फक्त तुमचीच आठवण येतेय,
तुम्ही दिलेली अनुभवाची शिदोरी
आयुष्यभराची साथ देईल,
कृतज्ञतेने चरणी सदैव तुमच्या
मस्तक माझे झुकुन राहील,
शास्त्र पण सांगतात...लघु नाही तो गुरू
गुरू हाच आपल्या आयुष्याचा तारु
म्हणून तुमच्या चरणी बसून गुरुजी...
आत्मविश्वासयुक्त जीवन करु !