व्यथा..
व्यथा..
नभ आले,नभ आले,रान सारे भिजविले
भिजविले धरणीमाता,नभे मला भिजविले ||
दीवसाच्या उजेडात, ढगांनी केली काळी रात
झाडे अवघी हालविले...
भिजविली धरणीमाता, नभे मला भिजविले ||
आनंदला बळीराजा, हर्ष झाला मनी फार
हात जोडून म्हणे.."देवा धन्य,तुझे उपकार
जाऊ उद्या पेरणीला,रान आज भिजलेले..||
सकाळीच उजेडात,कुणी चालले शेतात
कोणी जाते पेरणीला,बिज कोणी लावे मातीत,
लाख मोलाची बैलजोडी, कशी चालली डौलात
कालची पर्वा नाही,काल झाले ते झाले..
भिजविली धरणीमाता नभे मला भिजविले ||
पडताच पण उन दुपारी,कांती सुखली मुखाची
खाऊ का देत नाही, चटणी भाकर ती सुखाची
का असे दु:ख आम्हा? देवा आम्ही पुसतसे
तुजविण दुसरा वाली कोणी, नाही आम्हा दीसतसे
साऱ्या जगाचा अन्नदाता, आपल्या घरी उपाशी
का?असे वैर देवा...तुमचे हो आमच्याशी
अंगावरील वस्त्र आमचे, सदैव का फाटलेले?
भिजविली धरणीमाता, नभे मला भिजविले ||
येणारी नवीन पिढी, शहरांकडे घेते धाव
मातीला काहीच..का राहिला नाही हो भाव?
जय जवान, जय किसान, घोषणा फक्त देतो आम्ही
का घेत नाही शासन,शेतमालाची हो हमी
शेतीच का उपेक्षित? जग सारे सुधारले..
भिजविली धरणीमाता, नभे मला भिजविले ||
निरक्षर आहोत आम्ही,शिकवेना कोणी आम्हा,
आम्ही राहोत भले निरक्षर, मुले आमची शिकावित..
शाळा आहे गावात पण गाव नाही शाळेत
व्यथा आमच्या या कुणी,का नाही समजले..?
भिजविली धरणीमाता, नभे मला भिजविले ||