जोम
जोम
अरे पावसा ...
असा रे तू कसा ?
तुला समजलो होतो जीवन
पण तूच उठलास जीवावर आमच्या
बरसावसं वाटलं
म्हणून का एवढं बरसावं !
तू यावं म्हणून
एकदा नव्हे
हजारदा केले होते
नवस देवापुढे
तू येत नव्हतास तोपर्यंत
कपाळाला आडवा हात लाऊन
पहात होतो तुझी वाट
चातकासारखी
आपले पणाच्या भावनेनं
तू आलास तेव्हा थोडं
बर वाटलं... माझ्यासारखं अनेकांना!
पण तू तर
ठरलास काळ आमचा
झाल्या असतील चुका
आमच्या हातून
थोड्याफार काही प्रमाणात
म्हणून काय
त्याची सजा एवढी द्यावी ?
तुझ्यामुळं आलेल्या महापूरानं
अधाशासारखं गिळलं
माझं घर, गाव अन् शेतीबाडीही
माझ्या बायको पोरांना मुकलो
मी कायमचा.... तुझ्यामुळेच !
तुला आमचा आक्रोश
कसा नाही रे समजला ?
आमच्या डोळ्यातलं
खारट पाणीही तू
ओघळू दिलं नाहीस
आमच्या गालांवर
तुझ्याच जीवावर किती
पाहिली होती स्वप्न
पण त्या स्वप्नांना मात्र
चक्काचूर केलस तू
तुझ्या मनाला येईल
तसं तू वागलास
उध्वस्त करून टाकलस
तू आम्हाला कायमचं !
पण आजचा दिवस शेवटचा
तो तुझा समज
आणि बघ उद्या
या उगवत्या सूर्याला
साक्षी ठेवून
याच धरणीवर
घट्ट पाय रोवून
पुन्हा उभा राहतो की नाही
नविन स्वप्न घेऊन
नव्या दमानं... नव्या जोमानं...
कणखर मनानं...