गेला किती काळ......
गेला किती काळ......
गेला किती काळ, रात्र अंधारुन आली,
झाली वेळ परतायाची, स्वारी अजून न आली ।।धृ ।।
खुळावलं माझं मन, येड झालं रं माझं तन ,
वाट पाही येड्यावाणी आतुर होऊन।
उरी दुःख लपवून मुखी ठेवी हास्य रंगोली,
सुख दुःखाच्या हिंदोळी, मनी चिंता डोकावली ।।
झाली वेळ परतायाची, स्वारी अजून न आली...... ।। १।।
लई अवघड डोंगराची वाट,
बाई कशी चढू मी हा घाट,
सजनाची पाहीली मी वाट, नजर ताठ अंधार जाहला दाट।रात्र भेगाळली, ....
झाली वेळ परतायाची, स्वारी अजून न आली..... ।।२।।
उरी आठवांचा पाऊस रे भरला,
सोबतीने जगताना श्वास हा कोंदला,
सहवासाची सुंदर शिल्पे मी कोरलेली,
तरी मनी अशुभाची शंका का दाटली,.......
झाली वेळ परतायाची, स्वारी अजून न आली। ।।३।।
वादळी वाऱ्या-पावसाचे हे भयकारी दिस,
अवचितपणे येई भरती दर्यासागरास,
तुझ्या सवे सुखी संसाराची मोट मी बांधली
तुझ्या विना जगण्याची कल्पना न केली......
झाली वेळ परतायाची, स्वारी अजून न आली। ।।४।।
जन्मोजन्मी लाभो साथ ही प्रार्थना तुज,
ये तू झडकरी ऐकण्या प्रीतीचे हे गुज,
तुझ्या माझ्या प्रेमाची बघ फुले ही फुलली,
वाट पाहुनीया नेत्री तुझी मने आसावली,
झाली वेळ परतायाची, स्वारी अजून न आली। ।।५।।