दिवेलागण
दिवेलागण
दिवेलागणीच्या वेळी
मन जरा
जास्तीच घाबरतं.....
कळ्या कातर हळव्या
झालेल्या असतात....
फुलांनीही बरीक़ अंग आखडून
घेतलेले असते...
सुरेल शांततेत मिटणाऱ्या रस्त्यावरच्या
पावलांची संख्या
मंदावलेली असते...
नजरेतून निघणारा
हरएक सांजकिरण
स्वतःच एक वाट होऊन
आलेला असतो....
येणाऱ्याची वाट
पाहिल्या जाते,
न येणाऱ्यासाठीही
डोळे पांथस्थ होतात...
दूरवर नदीकिनारी
सांध्यदीप तेवत
कुणीतरी गात असतं
अननुभूत चांदगीत !!