अखंड तेवत राहो स्वातंत्र्यज्योत... 🇮🇳
अखंड तेवत राहो स्वातंत्र्यज्योत... 🇮🇳
आज दिन आला हो स्वातंत्र्याचा,
नभी फडकला तिरंगा या भारतभूमीचा।
फुंकले रणशिंग, उठले शूरवीर,
मातृभूमीसाठी लढले रणधीर।
रक्त सांडले मातीत,
स्वातंत्र्याची आस धरुनी,
शेवटच्या श्वासापर्यंत लढले
प्राणांची आहुती देऊनी।
मस्तक कधी न झुकविले
गुलामगिरीच्या बेड्यांपुढे,
देशासाठी प्राण त्यागून
अमर झाले ते हुतात्मे।
दशकं उलटली स्वातंत्र्याला,
ही अमूल्य ठेव जपण्याची वेळ आली;
ज्यांच्या त्यागातून मिळाली मुक्ती,
त्या बलिदानाची जाणीव ठेवण्याची वेळ आली।
स्वातंत्र्य आहे विचारांचे,
स्वातंत्र्य आहे बोलण्याचे,
हक्कांसोबत अधिकारांचे,
आणि त्याहून महत्त्वाचे—
कर्तव्य निभावण्याचे।
नको स्वार्थ, नको लबाडी,
नको लाचलुचपत, भ्रष्टाचार;
या भारतभूमीला हवी
सच्ची माणुसकी
अन् इमानदारीचा आधार।
नेते असोत वा सामान्य जनता,
एकजुटीने पुढे जाऊया;
देशाच्या प्रगतीसाठी
मनापासून हातभार लावूया।
अखंड भारताचे स्वप्न
मनामध्ये तेवत ठेवूया,
प्रगतीच्या नव्या वाटेवर
भारताला पुढे नेऊया।
विश्वाच्या क्षितिजावर
भारताची कीर्ती गाजू दे,
आपल्या प्रत्येक कृतीतून
देशाचा मान वाढू दे।
घ्या तिरंगा हातामध्ये,
अभिमानाने फडकवा;
भारत मातेच्या जयघोषाने
नभ दुमदुमवा।
देशभक्ती केवळ शब्दांत नको,
ती कृतीतून दिसू दे;
त्या वीरांच्या बलिदानाची
जाणीव मनात जिवंत राहू दे।
त्यांच्या स्वप्नांचा भारत
आपल्या हातांनी घडू दे
अखंड तेवत राहो
स्वातंत्र्याची ही ज्योत,
सदैव उंच राखण्या मान
तिरंग्याचा, जन्मावे वीर या भारतभुमीत! 🇮🇳
