अजुनी गंध येतो फुलांना
अजुनी गंध येतो फुलांना
आठवते अजुनी मजला
शेवटची ती भेट आमची,
प्रिय व्यक्ती मलाच सोडून
गेली ना हो दूर कायमची !!
कुणास ठाऊक हे नेहमी
असे का बरे होत असते?
आपलीच आवडती व्यक्ती
आपल्याच सोबत नसते !!
जीवापाड जपतो आपण
अशा एका प्रेमळ व्यक्तीला,
घेऊन जातो तो (देव) अचानक
तोड नसते त्याच्या युक्तीला !!
सर्वांना जो आवडतो तोच
देवालादेखील आवडतो,
जन्ममरणाच्या कोड्यातुन
कोणीच ना कधी सावरतो !!
शेवटच्या त्या भेटीत तिने
एक गुलाब आणला होता,
प्रेम व्यक्त करण्यासाठीचा
हा मानस मी जाणला होता !!
प्रेम व्यक्त केल्यावरही ती
गप्प बसून राहिली होती,
गुलाबाची कळी अचानक
खुलताना मी पहिली होती !!
दुसऱ्याच दिवशी घटना
एक अचानक घडली हो,
काल मला भेटलेली सखी
आज सरणावर पडली हो !!
बांध फुटला अश्रुचा आणि
तोल ढळू लागला मनाचा ,
स्वतःच्या या हाताने तिला मी
निरोप दिला होता क्षणाचा !!
आठवणीत तिच्या मग मी
एक गुलाब लावला होता,
त्यापासून अनेक गुलाबांनी
बगीचा माझा फावला होता !!
आठवतात जेव्हा या गोष्टी
सांगत असताना मुलांना,
तिने दिलेल्या त्या गुलाबाचा
अजुन गंध येतो फुलांना !!