गर्वाचे घर खाली...
गर्वाचे घर खाली...
ढोलकपुर मध्ये आज वेगळीच शांतता पसरली होती. नेहमी सगळ्यांच्या मदतीस धावून येणारा भीम आजकाल अलिप्त राहू लागला होता. सगळ्यांसोबत अदबीने वागणारा उलट उत्तर देत प्रत्येकाला वाईट बोलत होता. कारण त्याला त्याच्या शक्तीचा गर्व झाला होता.
चुटकी, राजू, जग्गू बंदर सगळे त्याचे मित्र त्याला समजावू पाहत होते परंतु त्याने त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिथून तो निघून गेला. कालिया त्याच्या कडे महाराजांचा निरोप घेऊन आला.
"महाराज खुप चिंतेत आहेत त्यांनी तुला तातडीने बोलावणे धाडले आहे."
"मग मी काय करू..?"
"तु लवकर चल महालात आणि महाराजांवर असलेलं संकटाचे निवारण कर."
"आजवर प्रत्येक संकटाला मीच मात देत आलोय. प्रत्येकाला मीच धडा शिकवत बसलो तर तुम्ही काय करणार. मी नाही येणार."
"अरे असे नको म्हणू. तुला देवाने जी शक्ती दिलेय त्याचा योग्य वापर कर." कालिया भीम ला समजावत म्हणाला. पाठीमागून भीम चे मित्र देखील आले.
"हो भीम. कालिया बरोबर म्हणत आहे. तुला तुझ्या शक्तीचा वापर करून सगळयांना मदत केली पाहिजे." राजू त्याला म्हणाला.
"मी माझ्या शक्तीचा वापर कसाही करेन. तुम्ही कोण आहात मला हे सांगणारे." असं म्हणत भीम मोठ्या तोऱ्यात तिथून निघून गेला.
आता थोडावेळ विश्रांती घेऊ म्हणून तो जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत त्याला एक वानर मोठ्या झाडाखाली विश्रांती घेत दिसले. त्या वानराची शेपटी लांब होती. ती भीम च्या वाटेत येत होती. भीम ने रागात त्याला आवाज दिला.
"ए वानरा, चल बाजूला काढ तुझी शेपटी. ती माझ्या वाटेत आडवी येत आहे."
"अरे इतकेच आहे तर खाली वाकून ती तु बाजूला काढ न."
"काय..? मी..? तुला माहितीये का मी कोण आहे ते..?"
"नाही.."
"अरे मी सगळ्यात शक्तिशाली आहे. माझ्या सारखा इथे कोणीच नाही. आणि तु म्हणतोस की मी खाली वाकून तुझी शेपटी बाजूला काढू..? नाही.. हे कधीच शक्य नाही."
"तुला जमणार नाही असं म्हण ना."
"मला जमणार नाही अशी एकही गोष्ट अस्तिवात नाही. लवकर माझ्या वाटेतून बाजूला हो नाहीतर मी तुझी शेपटी उचलून तुला दूरवर फेकून देईन."
त्याच्या बोलण्यावर वानर जोरजोरात हसू लागले. भीम ला त्याच्या वागण्याने अधिक राग आला. तो त्या वानराला अद्दल घडवण्यासाठी वानराची शेपटी उचलण्यासाठी खाली वाकला आणि ती शेपटी धरून वर उचलू लागला. पण त्याला ती शेपटी वर काय जागची हलवता देखील येईना. भरपूर प्रयत्न करून देखील ती शेपटी जागची हलली नाही. भीम ने ओळखले हे काही साधे सुधे वानर नाही. नक्कीच दैवी शक्ती आहे. त्याला त्याच्या वागणुकीचा पच्छाताप झाला. भीम ने त्या वानरा समोर नतमस्तक होत माफी मागितली. वानर देखील आपल्या खऱ्या रूपात येऊन भीम समोर उभा राहिला. ते श्री हनुमान होते. त्यांनी त्याला अलगद उठवले. ते त्याला त्याच्या ह्या चुकीच्या वागणुकीची जाणीव करून देण्यासाठी आले होते. ती भीम ला झाली होती. त्याने यापुढे कधीच गर्व करणार नसल्याचे सांगून माफी मागितली. श्री हनुमानाने देखील त्याला माफ करून, गर्वाचे घर नेहमी खालीच असते असे सांगत पुन्हा कधीच कोणत्याच गोष्टीवर गर्व न करण्याचे सांगून तिथून अदृश्य झाले. भीम लगेचच महाराजांच्या महालात त्यांना मदत करण्यासाठी गेला. तिथे जाऊन त्याने सगळ्यांची माफी मागितली आणि ढोलकपुर व त्याच्या मित्रांना त्यांचा पूर्वीचा उदार मनाचा शुर भिम परत मिळाला.