गोविंद ठोंबरे

Abstract

4.9  

गोविंद ठोंबरे

Abstract

तुझ्या जाण्याने...

तुझ्या जाण्याने...

3 mins
9.5K


खरं तर एखाद्याच्या आपल्या आयुष्यातून जाण्याने आपल्या आयुष्यात बरेच बदल घडतात असं मी ऐकलं होतं ! ती व्यक्ती आपल्या आयुष्याशी किती समरस झाली होती किंवा त्या व्यक्तीचे आपल्या आयुष्याशी अनपेक्षितपणे किती बंध जुळलेलं होतं याची प्रचिती ती व्यक्ती दुरावल्यानेच येते असं म्हणतात. मला अशी अनुभूती खरंतर या आधी कधी झाली नव्हती आणि अशी अनुभूती माझ्या वाट्याला येईल असं मी स्वप्नात पण दृष्टिलं नव्हतं. व्यक्ती विरहाने म्हणा किंवा दुराव्याचे असहाय्य वर्ण कुठेतरी मनात एक खोल दरी तयार करतात, की ती दरी आपण स्वतःच निर्माण करतो हे खरं तर आपल्याला कळतच नाही ! मलाही हे समजायला थोडा उशीर लागला. उशीर घेतला की लागला हे मी ठरवू इच्छित नाही.

सुन्न करून जाणारी नजर, आपल्यालाच खायला निघालेलं आपलं घर, मैत्रीची-जिव्हाळ्याची नाती कुठेतरी मग आपसूकच आपल्यातून स्वतःचं अस्तित्व ओढून दूर पळू लागल्यासारखी वाटायला लागतात. त्या व्यक्तीच्या दुराव्याचे पडसाद अनभिज्ञपणे आपल्या आयुष्यावर पडायला लागतात, हे मग आपलं आपल्यालाच समजून घ्यायला वेळ लागायला लागतो. व्यक्ती कोणीही असो ती प्रियसी असेल, प्रियकर असेल, कुटुंबातील सदस्य असेल, मित्र परिवारातील कोणी सोबती असेल, फार फार तर अनोळखी चेहऱ्यातही कधी कधी असा जिव्हारी लागणारा चेहरा मिळतो किंवा एखाद्यावर आपली अपरंपार श्रद्धा असेल, आदर असेल अशा व्यक्तीच्या दूर जाण्यानेही मनात काहूर माजायला लागतो. डोळ्यापुढे एकटेपणाची अंधारी यायला लागते.

मी कुठे माझा राहिलो

फक्त तुझ्या जाण्याने

आठवणीत एकटाच मी दिसतो

फक्त तुझ्या विरहाने

आपलं अस्तित्व काही वेळेसाठी आपण हरवून बसतो आणि एका क्षणभंगूर प्रवासाकडे काही काळासाठी आपण वाटचाल करायला लागतो. ते जाणीवपूर्वक नसते अथवा ते जाणीवपूर्वक असते याची एक संशोधनात्मक चर्चा खरं तर मनातल्या मनात आपण स्वतःचं करायला हवी ! परंतू तेवढी चिकित्सक मीमांसा करणारी वृत्ती आणि साहसीदृष्टी आपल्याकडे असायला हवी हे मात्र नक्की ! अमुक अमुक व्यक्ती दूर गेल्याने मी हळहळतो, निराशेने आतल्या आत गुदमरतो, स्वतःला एकटेपणाच्या बाहुपाशात ढकलतो आणि सर्व जग एकीकडे ठेवून मी माझं पोकळ जग मनाच्या गाभाऱ्यात उभा करतो; एवढं दुःखं होतं की मी स्वतःचा कधी कधी निरोप घ्यावा म्हणतो ! हे कितपत आपल्या आयुष्याच्या पोषकतेला गुणकारी आहे ? याचा विचारदेखील करावा लागेलच ! हा दुरावा येण्याआधी जर मी शहाणा होऊन यावर विचार करून आधीच आयुष्याला मार्ग दाखवत असेल तर ते ठीकच ! पण त्या दुराव्याचे, एकटेपणाचे डोहाळे मला आत्मतः लागले असतील तर मग काय ? त्यावर उपाय करायला मी तेवढा मानसिक बळकट त्या परिस्थितीत असेन ? आणि असेनही मी तेवढा सुजाण तर मग मी वेळीच सावध का होत नाही ? आणि तेवढी समजूतदार वृत्ती म्हणा किवा शहाणपण माझ्याकडे नसेल तर मग ते शहाणपण मला न मागता चांगल्या वाटेने कोण आणून देईल हे ही तितकंच महत्वाचं आहे ! कारण शहाणपण मागता येत नाही ते अनुभवता येतं. ते कोणाला देता येत नाही, ते कोणाकडून तरी अभिजातपणे आपल्यात शिरतं हे ही नाकारता येत नाही.

तू जाण्याने मर्म नाही बदलले

स्वभावातले भावही माझे

तू नसल्याने नाही पलटले

कोणाच्या जाण्याने आणि दुराव्याने माझा मूळ स्वभाव गुण नाही बदलत ! हां ! थोडासा बदल जाणवेल तोही एक प्रकारचा भाव असेल जो माझ्यातला मूळचा नसेल. चिडचिड होईल, राग येईल, काही नव्याने करण्याची तृष्णाही क्षमेल. पण मूळ माझ्यातला गुण मात्र तिथेच असेल ! त्याच्यावर पांघरूण आपल्या हाताने आपण घातलेलं असेल ! मनाचे भाव, स्वभाव, गुण, संस्कार, विचार, भावना, संवेदना या बसल्या जागीच आपण झोपवल्या असतील, कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ! पण त्या गोष्टी नक्कीच मेलेल्या नसतात हे मात्र नक्की आहे. त्याला फक्त गदगद हलवून जागं करणं हे आपल्याला जमायला हवं ! वेळ लागेल, स्वतःला सावरायला सुरुवातीला जमणार नाही. पण आपलंच अस्तित्व आपल्याला मिळवायला झगडावं तर लागेलच ना ! त्या व्यक्तीच्या आठवणी छळतील, हुज्जत घालतील मनाशी, भांडतील, परत आठवतील पण त्याचा प्रतिकार आपण सुयोग्य पद्धतीने त्या व्यक्तीला मनाशी जपत करू शकतो हाही एक सुखद अनुभव आहे. त्यासाठी स्वतःला तत्पर व्हावं लागेल आणि तेवढ्याच तत्परतेने एकट्या मनाला वेळीच अंधारातून, एकटेपणाच्या पोकळीतून बाहेर ओढावे लागेल ! जमेल नक्की, प्रामाणिक प्रयत्न महत्वाचे ! तेही स्वतःसाठी आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी..


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract