madhuri dipak patil

Action Inspirational

4.4  

madhuri dipak patil

Action Inspirational

मुलाचा जीव वाचवण्याची धडपड

मुलाचा जीव वाचवण्याची धडपड

5 mins
538


रामरावांना अचानक कोणाचातरी फोन येतो, "मंदार तुमचाच मुलगा का?"

रामराव चिंतेच्या सुरातच "हो बोला आमचाच मुलगा आहे."

तिकडून "तुमच्या मुलाचा फार मोठा अपघात झाला आहे, हाॅस्पिटलमध्ये अॅडमिट केल आहे" 

हे ऐकताच त्यांच्या काळजात धस्स होते. ते गडबडीने ऊठतात व बायको लक्ष्मीबरोबर फोनवर सांगितलेल्या हाॅस्पिटलला पोहचतात... लक्ष्मीबाई तर पूर्ण गळून गेलेल्या असतात.


मंदार रामरावांचा एकुलता एक मुलगा. घरची परिस्थिती हलाखीचीच. रामराव एका कंपनीत ट्रकवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होते. लक्ष्मीबाई घरीच होत्या. थोडंफार शिवणकाम करून घरातल्या खर्चाला हातभार लावायच्या. आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी रामरावांनी मंदारच्या शिक्षणासाठी हवा तेवढा खर्च केला होता. आपला मुलगा एवढा चांगला शिकून नोकरीला लागला म्हणजे झाल असच काहीस स्वप्न रंगवलेलं रामराव आणि लक्ष्मीबाईंनी. पण त्यावर काळाने घाला घातला. मंदारने सिव्हील इंजिनिअरिंग पूर्ण केल आणि जाॅब शोधू लागला पण म्हणावा असा जाॅब मिळाला नाही त्याला. मग आपण थोड थांबून आपल्या पोर्टलसाठी उपयोगी कोर्स करूयात जेणेकरून ती इन्स्टिट्यूटच आपल्याला चांगल्या कंपनीत जाॅब मिळवून देईल असा विचार करून मंदारने कोर्स करायच ठरवलं. त्यादिवशी नेहमीप्रमाणे असाच तो सकाळी लवकरच क्लासला निघालेला असताना नेमकी रोडवरून त्याची टू-व्हीलर स्लीप झाली आणी नेमकं त्याचवेळी समोरून येणार्‍या ट्रकची त्याला धडक बसली आणि त्याचा मोठा अपघात झाला.

      

रामराव आणि लक्ष्मीबाई हाॅस्पिटलमध्ये काॅटवर अॅडमिट असलेल्या मंदारला पाहतात आणि त्यांनी एवढावेळ दाबून ठेवलेल्या भावना डोळ्यातील आसवांवाटे बाहेर ओघळतात... मंदार तर अजूनही बेशुद्धच असतो. मंदारला प्रचंड प्रमाणात मुक्का मार बसलेला असतो. एक पाय आणि पाठीचं हाड मोडलेलं होतं. डाॅक्टर रामरावांना सांगतात की, लवकरच मंदारची पाठ आणि पायाचं आॅपरेशन कराव लागेल आणि त्यासाठी चार लाख रूपये खर्च येईल. रामरावांना खूप टेन्शन येतं, रात्रंदिवस ते एवढ्या पैशांची तजवीज कशी करावी याचा विचार करत असतात. 


           मागच्याच महिन्यात रामरावांना एक सौम्य अटॅक येऊन गेलेला असतो. त्याचवेळी त्यांच्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे संपून गेले होते. आता मंदारच्या आॅपरेशनसाठी पैसा कसा उभा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे ऊभा होता. डाॅक्टरांनी त्यांना आठवड्याची मुदत दिली होती... लक्ष्मीबाईंच्या डोळ्यातून तर पाणी थांबायचं नाव घेत नव्हतं. किती केलं तरी त्यांचा एकुलता एक मुलगा होता...

          

   असंच एकेदिवशी रामराव पैशांचा विचार करत-करत झोपी जातात... आणि मध्यरात्री एकदमच "मंदार... मंदार..." करून उठून बसतात. त्यांचं अंग घामाने पूर्ण डबडबून गेलं होतं आणि हातपाय थरथर कापत असतात... लक्ष्मीबाईही त्यांच्या आवाजाने दचकून उठतात व रामरावांना काय झालं? वाईट स्वप्न पडलं का विचारतात... म्हणतात ना माणूस जास्त विचार करत असेल वा टेन्शनमध्ये असेल तर त्याला भरपूर स्वप्न पडतात तसंच काहीसं झालेलं रामरावांचं. एकीकडे काॅटवर पडलेला आपला एकुलता एक मुलगा आणि दुसरीकडे पैशांची तजवीज.... त्यांना दुसरं काहीच दिसत नव्हतं... लक्ष्मीबाई पुन्हा एकदा रामरावांना स्वप्नाविषयी विचारतात कारण या अगोदर कधी रामरावांची स्थिती अशी झाली नव्हती. 


          रामराव स्वप्नाविषयी सांगू लागतात, "अगं माझ्या स्वप्नात एक मुलगा आलेला. आपल्या मंदारएवढाच होता. समोरून गाडीवरून येत होता आणि मी ट्रक चालवत असताना बरोबर ट्रकचे ब्रेक फेल होतात व त्या मुलाला माझ्याकडून ठोकलं जातं. त्या मुलाचा अपघात होतो गं मी चालवत असलेल्या ट्रकने... आणि मी व माझ्या बरोबरचा साथीदार पोलिसांच्या झंझटमध्ये पडायला नको म्हणून, त्या मुलाला जागेवरच सोडून तिथून पळ काढतो... तो मुलगा आम्हाला मदत मागत होता आणि आम्ही त्याला मदत न करताच तिथून पळून जातो... मला खूप पश्चात्ताप होतोय या सगळ्याचा.... मला माफ कर मुला, मला माफ कर, मी चुकलो" म्हणून रामराव मोठ्याने रडू लागतात...

त्यावर लक्ष्मीबाई "अहो ते फक्त एक स्वप्नच होतं ना मग सोडा ते. उगीचच नको तसले विचार करत आहात तुम्ही मंदारचा अपघात झाल्यापासून..."

"नाही लक्ष्मी नाही हे फक्त एक स्वप्न नाही, ही खरी घटना आहे. चार वर्षांपूर्वी माझ्याकडून घडलेली. त्यावेळी आपला मंदार पहिल्या वर्षाला होता. त्याची काॅलेजची फी भरायची होती. तेवढेच पैसे कसेबसे आपण जमा केलेले मग त्या अपघात झालेल्या मुलाला कुठून भरपाई द्यायची आणि पोलिस केस वैगेरे ते वेगळंच म्हणून मी तिथून पळ काढलेला... पण आज मला त्या मुलाची आणि त्याला पाहून त्याच्या वडिलाची अवस्था काय झाली असेल ते आता कळतंय... म्हणून रामराव परत रडू लागतात... आपल्या नवर्‍याला असं अगतिकतेने आणि पश्चातापाने रडलेलं पाहून लक्ष्मीबाई म्हणतात, "आता पश्चात्ताप करून काय उपयोग, स्वत:च्या मुलाच्या शिक्षणासाठी स्वार्थी होऊन खूप मोठी चूक झालीय तुमच्याकडून... पण त्याची शिक्षा तुमचा स्वत:चाच मुलगा भोगतोय. देव वरून सगळं बघत असतो."

रामराव "हो लक्ष्मी मला मान्य आहे मी गुन्हेगार आहे, पापी आहे त्यावेळी मी स्वार्थी झालेलो. मला काहीही शिक्षा होऊ दे, मला काहीही होऊ दे पण माझा मंदार लवकर बरा होऊ दे. देवा मला माफ कर !" 

लक्ष्मीबाई "एकच पर्याय आहे आपण चार वर्षापूर्वी अपघात झालेल्या त्या मुलाच्या घरी जावून त्याची व त्याच्या वडिलांची माफी मागूयात..."


           परत एकदा मुलाला वाचविण्यासाठीची एका बापाची तगमग जागी होते व रामराव त्या मुलाच्या घरी जातात. त्या मुलाचा पत्ता ते पोलिस स्टेशनमधून मिळवतात. कारण त्या दिवशीची तारीख रामरावांना लक्षात होती, मंदारचा वाढदिवस होता त्या दिवशी... रामराव व लक्ष्मीबाई त्या मुलाच्या घरच्यांची माफी मागतात. सुदैवाने तो मुलगा वाचलेला असतो. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाच्या अपघाताचं दुःख अनुभवलेलं असतं त्यामुळे ते समजून घेतात व रामरावांना माफ करतात... आणि आमच्या सदिच्छा तुमच्या मुलाच्या पाठीशी आहेत अस सांगतात...

"तुमचे हे उपकार आयुष्यभर मी विसरणार नाही" म्हणून रामराव त्यांचा निरोप घेतात.


         माफी मागून रामराव व लक्ष्मीबाईंच्या डोक्यावरचं निम्मं ओझं कमी झालं होतं. आता पुढं ठाकलं होतं मंदारच्या आॅपरेशनचा खर्च जमा करणे. ते दोघेजण थेट हाॅस्पिटलमध्ये पोहचतात. तिथं गेल्यावर त्यांना समजतं मंदारला थोड्याच वेळात आॅपरेशनसाठी घेणार आहेत...

रामराव डाॅक्टरांना म्हणतात "पण डाॅक्टर पैश्यांच्या व्यवस्थेचं काय?"

डाॅक्टर "मंदारचा एक मित्र येवून गेला रात्री त्याने पैसे जमा केलेत आॅपरेशनसाठी आणि आॅपरेशनला विलंब करून चालणार नाही. इन्फेक्शन होऊ शकतं." 


    रामराव आणि लक्ष्मीबाईंना खूप आनंद होतो की, आता आपला मंदार लवकरच बरा होणार आणि आश्चर्यही वाटतं त्या पैसे भरणार्‍या मुलाचं. ती दोघं मनोमन त्या मित्राचे आभार मानत असतात... रामरावांना कसल्याही परिस्थितीत त्या मदत करणार्‍या मुलाला भेटून त्याचे आभार मानायचे नव्हे पायच धरायचे होते... विचारपूस केल्यानंतर त्यांना समजतं की तो मुलगा दुसरा-तिसरा कोणी नसून आपण सकाळी ज्याची माफी मागायला गेलो होतो तोच होता. 

 

        रामराव व लक्ष्मीबाई मनापासून देवाचे आभार मानतात. आता रामरावांच्या मनावरच पूर्ण ओझं कमी झालं होतं. रामराव पुन्हा एकदा त्या मुलाच्या घरी जावून त्याची माफी मागतात व तूच मला माझा मुलगा परत मिळवून दिलास म्हणून त्याचे खूप आभार मानतात.


Rate this content
Log in

Similar marathi story from Action