मनीच्या कानी भाग-७
मनीच्या कानी भाग-७
आज मुंबईत पाऊस आहे . डिसेंबर महिन्यात पाऊस हे एक आश्चर्य आहे. तो पण थोडा थोडका नाही. धो धो पाऊस. चक्री वादळ आलय म्हणे गुजरात मध्ये. आपल्याकडे पण आता ऋतू आणि वेळ यांचा काही संबंध उरला नाहीये. हे सगळ म्हणजे माणसाने निसर्गावर केलेल्या अन्यायाची परतफेड आहे. बिन मोसमी पाऊस, पावसाळ्यात उन्हाळा यात दोष न माणसाचाच आहे. किती ओरबाडलय माणसाने निसर्गाला.हा आता कोणी म्हणेल मग विकास कसा करणार? झाडे कापली नाहीत तर रस्ते रुंद कसे होणार? पण जो विकास त्याशिवाय शक्य आहे, तो सुद्धा आपण निसर्ग वाचवून करायला तयार नसतो, हे दुर्दैव आहे.
आपल्या रोजच्या जगण्यात सुद्धा आपण हा विचार केला तर किती मन चक्रीवादळाने उध्वस्त व्हायची थांबतील. मन ओरबाडल गेलं कि ते दुखत. त्याच्या अंगाखांद्यावरची प्रेमाची सावलीची झाड कुणी मुळासकट उपटली , तर तिथं जन्माला येत वैराण वाळवंट . त्याच्या आयुष्यात ओल्या, शीतल पावसाळ्याच्या जागी करपवणारा उन्हाळा येतो. ज्याची झळ त्याच्या आसपासच्या माणसांना पण लागते. मग सुरु होतो बेमोसमी पाऊस... कधीही , कोणालाही भिजवणारा, पुरात बुडवून टाकणारा. मग त्या मनात येऊ लागत विचारांचं चक्रीवादळ, घोंगावणार, उरलं सुरलं जीवन उध्वस्त करणारे.
या चक्रीवादळाची चाहूल ज्यांना वेळीच लागते, ते सावरतात, पुन्हा प्रेमाची बीज रुजवायला लागतात. त्यांना यथावकाश हिरवं फुटतच. मनातल्या ऋतूचक्राला पण असंच सांभाळावं लागत. तर ते संयतपणे चालू राहत. वादळ आलं तरी टिकत नाही फारस . आणि आलच वादळ तरी हिरवी रोपटी तोपर्यंत इतकी मजबूत झालेली असतात, की ती सहज त्या झंझावाताला तोंड देऊ शकतात.
काय गम्मत आहे न ,मन नावाच हे सगळ्यात मोठ किंवा सगळ्यात छोट असं जे काही आहे ना, तेच अजून दिसत नाहीये शास्त्रज्ञाना. त्याची ना कुठली शाळा ना कुठलं विद्यापीठ . तरी हे मन जिकडे तिकडे लुडबुड करत. या मनावर साहित्यिकांनी भरभरून लिहिलं, कवींनी कविता, रुबाया लिहिल्या. विचारवंतानी चर्चा झडवल्या .पण हे मन पळतच आहे सगळ्यांपासून लांब, वाकुल्या दाखवत. भन्नाट उधळलेल्या घोड्यावर जसं स्वार होता येत नाही, तसं या मनाला लगाम घालण भल्या भल्यांना जमत नाही. आणि हे इवलसं किंवा अतिविशाल मन माणसावर मात्र हुकुमत गाजवत.
चला, पाऊस बघते खिडकीतून. बेमोसमी तो वो ही सही. मुंबईत थोडा गारवा तर आला, प्रदूषणाचे ढग नक्की ओले होऊन खाली बसले असतील, ये ही सही. तुमच्याकडे स्नो पडतोय न. सुंठ घालून चहा घेत जा मनी. मेथीचे लाडू कुरियर करतेय पुढच्या आठवड्यात. तोंड वाकड केलस न लगेच . लबाड. रात्री फेसटाईम वर बोलू.
बाय.
लव यू.
मम्मा.