मनीच्या कानी भाग-६
मनीच्या कानी भाग-६


हाय मनी,
परवा नाटकाच्या तालमीच्या वेळी चाय पे चर्चा झाली. अगदी चहा सारखीच गरमागरम. विषय फारच हॉट. सध्या तरुणाईत बोकाळलेल लिव इन च वेड. लिव इन किवा फ्री सेक्स, नावं काहीही असली तरी एकूणच गंभीर समस्या, तिचे अनेक पैलू, आणि माझा आवडता विषय. या विषयाला इतके अनंत पदर आहेत न, की प्रत्येक जण आपापला मुद्दा अगदी ठासून मांडत होते. वाद विवाद झाले की विषयाचा मात्र सर्वांगीण विचार होतो हे खर.
चर्चेला सुरुवात झाली, माझी डॉक्टर मैत्रीण तिच्याकडे येणाऱ्या लहान वयाच्या मुला मुलींच्या बिनधास्तपणाबद्दल सांगत होती. विशीत ही मुले सगळे अनुभव घेऊन मोकळी होतात, बर मानसिक गुंतागुंत असतेच असही नाही. हा पशुवत व्यवहार झाला की नाही? मैत्रीण पोटतिडीकेने तिची मत मांडत होती. म्हटल तर खरच आहे. भावनिक पातळीवर नाते जोडल्याशिवाय लग्न बंधन न स्वीकारता शारीरिक नात जोडू नये असं मानणारी आमची पिढी. आमच्या पिढीने इलेक्ट्रोनिक युगाचा उदय पाहिला, जग एक खेड होऊ घातलेलं पाहिलं, या बदलाशी, वाढणाऱ्या वेगाशी छान जुळवून घेतलं.पण ह्या एका बाबतीत मात्र आमची पिढी काठावरच राहिली.
लग्नाचं बंधन आज कोणाला नकोय. कमीटमेंट नकोय कोणाला.मला एक प्रश्न पडतो मनी, साध ड्रायविंग सुद्धा करायला लायसेन्स लागत. देशात राहायला परवाना लागतो. मग नात्यामध्ये बंधन का नको? ते करकचून आवळू नये, आणि ते अति सैल पण असू नये. साध लोकल ट्रेन मध्ये आपण सहप्रवाश्यांशी जमवून घेतो, सरकून त्यांना बसायला जागा देतो , मग जीवनाच्या प्रवासातल्या आपल्या सर्वात जवळच्या सहप्रवाश्याला आपण काही अंतर एकत्र चालण्याची खात्री का देऊ शकत नाही? एकमेकांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न का करू शकत नाही?
अग, लग्न काय नि लिव इन काय? सगळ नाटक घडत माणसांमध्येच. तडजोड दोन्हीमध्ये आलीच. रुसवे फुगवे दोन्हीत आलेच. उलट लग्नामुळे आपली अशी एक कुटुंबसंस्था निर्माण होते. सासरची, माहेरची अशी खूप माणस एकत्र होऊन एक आधार व्यवस्था निर्माण होते. त्यातली सगळीच माणस आवडतात किंवा पटतात अस नाही, पण रंगमंचावर पात्र तरी खूप वावरायला लागतात. काही चिवट धागे तयार होतात. लग्नाच्या बंधनामुळे कुठेतरी सगळ व्यवस्थित होईल, अशी मनाला खात्री होते आणि स्थैर्य लवकर येत. लिव ईन सारखी टांगती तलवार नाही, पार्टनर कधीही सोडून जाईल याचा ताण नाही.
लग्नाने लाभलेल्या मानसिक आधारामुळे माणूस वैचारिक.आर्थिक, सामाजिक प्रगती करायला मोकळा होतो. अर्थात मी म्हणतेय त्याला अपवाद सुद्धा असतात. पण हल्ली तरूण पिढीची ऊर्जा कमी वयात शारीरिक संबध घडण्यात / बिघडवण्यात वाया जातेय कि काय अस वाटून जात. की पूर्वीप्रमाणे तारुण्य आल्यावर लग्न लावून टाकत, म्हणजे एक प्राथमिक भूक भागली की इतर प्रगती साधायला माणूस मोकळा, हे बरोबर? पण मग स्त्री शिक्षण आणि हक्काचं काय? म्हटल ना, खूप मुद्दे आहेत वाद विवाद करायला. आम्ही बराच वेळ बोललो, शेवटी निष्पन्न काहीच झालं नाही, पण चर्चा झाली.
सगळ्यांना तुझी आठवण आली. वाद विवादात भाग घ्यायला तू नव्हतीस ना? नाटकात पण तुला मिस करतात सगळे.
आणि मी तर रोजच मिस करते तुला. डान्सच्या कार्यक्रमात बिझी आहेस ना? चल बाय.
लव यू
मम्मा.