सह्याद्रीच्या कुशीतल गाव
सह्याद्रीच्या कुशीतल गाव
सह्याद्रीच्या कुशीत कधीतरी फिरून यावं अशी आस धरणारा मी, अश्या प्रकारे सह्याद्रीच दर्शन होईल अस वाटलं नव्हतं. कॉलेज मध्ये तास चालू असताना माझ्या मित्राला आलेला फोन आणि तिथून सुरु झालेला वेगळाच प्रवास आम्हाला वेगळ्याच वळणावरती नेऊन सोडून गेला.
जुलै महिना चालू होता मुसळधार पाऊस आणि त्या दिवसांमधून पाऊस थांबायचं नाव घेत नसतो तो पडतच राहतो. माझा मित्र अनित मला त्याच्या गावी घेऊन निघाला. जवळ जवळ पाच तासांचा प्रवास करून बस मधून उतरल्या नंतर मला फक्त समोर मोठ मोठे डोंगरच दिसत होते. माझ्या समोर एक खाऊची गादी आणि तिथे फक्त लाईन लाईन फोन सेवा आणि लहान सहान वस्तू दिसत होत्या, माझ्याकडे एक बॅग,माझी छत्री,शूज पाण्याची एक बॉटल आणि पाकिटात 1000 रुपये बस इतकंच मी घेऊन अनित च्या गावी निघालेलो. पण मी इथे का आलोय हे मात्र अजून मला समजलेलं . कारण हा मित्र थोडा शांत स्वभाविक आणि फिरायचं म्हटलं तर तल्लीन होता. त्याच्या ह्या स्वभावामुळे त्याच पुढचं पाऊल काय असेल याचा फारसा अंदाज नाही लावता यायचा. पण त्याच्या त्या पाऊला नंतर जे बघायला मिळत ते नेहमी प्रमाणे अनोखा असायचा. मी ते डोंगर बघून खुश झालेलो एक पूर्ण डोंगर पार करून दुसरा डोंगर चढू लागलो. मोठ-मोठे दगड आणि खाली बघितलं तर दरड पाय घसरला की खाली पडून हात पाय नक्कीच दुखावेल. मी जसा पुढे जात होतो तशी पायावट कमी होत जात होती. एक-दोन नव्हे तर जवळ जवळ चार डोंगर चढून उतरून समोर मला थोडी घर दिसू लागली आणि अनित एकदाचा म्हणाला "आपण पोहचलो रे प्रवास संपलाय" थोडा जीवात जीव आला आणि हुरहूर संपली. घरी गेलो तर समजलं ह्याच्या घरी फक्त ह्याचे आई बाबा होते आणि बाबा अंथरून पकडून झोपले होते. अनित घरा मध्ये जाताच रडू लागला. ह्या परिस्तिथी मध्ये मित्राला सावरू की त्याच्या आईला मला कळत नव्हतं कारण अशी परिस्तिथी मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. त्याचे बाबा सारखे छातीला हात दाखवून म्हणत होते इथे दुखतंय, मी समजून गेलो होतो ह्यांच्या छातीत दुखतंय कारण ह्यांना रक्ताच्या गाठी मुळे त्रास होत असावा. अनित म्हणाला आपण जिथे बस सोडली तिथे जवळच एक वैद्य आहेत. ह्या भागांमध्ये हॉस्पिटल किंवा डॉक्टर जवळपास नाही. आता हे ऐकून मी अजून घाबरलो की ह्या परिस्तिथी मध्ये ह्यांना इथून कस तिकडे न्यायचं. ती रात्र मी झोपलोच नाही आणि जेव्हा डोळा लागणार तेवढ्यात त्याचे बाबा मोठ मोठ्याने ओरडू लागले. आम्ही पटकन उठलो आणि बघितलं तर ते श्वास घेत असताना त्रास होत होता. अनित आणि त्याची आई रडत होती पण परिस्तिथी अशी होती की कळत नव्हतं कोणाला धीर देऊ पण मला आता त्याच्या बाबांकडे बघायचं होत. सकाळचे पाच वाजले होते बाहेर पाऊस आणी परिस्तिथी खालवली होती. मी त्यांच्या छाती वरती हात ठेवून जोर जोरात पम्पिंग करत होतो आणि अनित ला म्हणत होतो रडत नको राहू ह्यांना तिकडे नेऊ शकू अस काहीतरी कर तो रडतच बाहेर गेला आणि काम करू लागला. पम्पिंग थांबवलं आणि काकांनी श्वास स्वतःहून घ्यायला सुरुवात केली. हे बघून बर वाटलं तितक्यात अनितने बांबू पासून स्ट्रेचर बनवून आणला आम्ही त्यांना त्यावर ठेवलं मला बाकी काही दिसत नव्हतं फक्त ह्यांना त्या वैद्यान पर्यंत पोहचवायचंय एवढंच दिसत होत.
बाहेर आलो आणि शूज बघितले तर त्यात माती साठली होती. मी बिन पायी निघालो. समोर डोंगर बघून ह्यांना पार करायचंय हे नवीन चॅलेंज् आपल्याला मिळालय अस मनात ठेवलं आम्ही दोघांनी निघायला सुरुवात केली. त्यांच्या अंगावर प्लास्टिक कागद टाकला जो की मी आणला होता. पण आम्ही त्या मुसळधार पावसात भिजत जाणार होतो. डोंगराळ भागांमध्ये पाऊस खूप प्रमाणात पडतो कारण ढगांचं अंतर उंच शिखरांपासून खूप जवळ असत. त्यामुळे पावसाचा वेग अति आणि समोरची वाट धुरकट दिसत होती. दोन दिवस आम्ही उपाशी होतो. आणि अश्या उपाशी पोटी आम्हाला काकांना घेऊन जायचं होत. वाटेत मोठ मोठी झुडप, काटेरी वेली झाड, आमच्या शरीराला खर्चटत होत्या. बहुतेक माझी हालत बघण्यासारखी नव्हती. अर्ध शर्ट माझं आजू बाजूची झाड लागून फाटलं होत. पायात काटे रुपून रक्ताने पाय ओले होत होते. तिच हालत अनित ची पण होती, त्याला काहीही बोलण्यापेक्षा त्याला ह्या आधाराची गरज आहे आणि आपण त्याला साथ दिली तर त्याचे बाबा आज वाचतील हे मनात ठेवून मी गप्प राहिलो.
अलटून पलटून आम्ही पुढे मागे करत शेवटी चार डोंगर पार केले त्या स्ट्रेचर वरून त्यांना खाली ठेवलं. माझ्या अंगावरून रक्त सांडत होत. पाय जमिनीवरती टेकत नव्हते, हात खुप् दुखत होते. 99 टक्के मी अर्धा कामातून गेलोच होतो. आणि त्याच रस्त्यावर मी झोपलो अनित मला बोलत होता ते थोड थोड ऐकू येत होत. "हे बघ मित्रा आपण इथ पर्यंत आलोय हे सह्याद्रीच रूप आपल्या मागे आहे. सह्याद्रीच्या गरजत्या छावेत माझ्या बापाने कसलेल्या जमिनीत त्याने त्याची मेहनत पेरून आम्हाला लहानाच मोठ केलंय. हि सह्याद्री मला असा दगा नाही देणार. ह्या भूमी मध्ये स्वर्ग स्वतःहा झुकून इथल्या निसर्गाला वंदन करतो. इथल्या पाना फुलांन झाडा झुडपाने आपल्याला दिलेले आशीर्वाद आपल्या अंगावर स्वतःहा निशाणी करून सांगतायत की आपण खंबीर आपण भाग्यवान आहोत. इथल्या भूमीमध्ये आपल्या रक्ताचे थेंब शिंपडून आपण पुढे आलोय. प्रवास आता संपलाय तु धीर सोडू नकोस. तुझा जन्म नसेल झाला पण तु ऋणी आहेस ह्या सह्याद्रीचा आपल्याला पुढे जावंच लागेल. हे शब्द ऐकून माझे डोळे उघडले मी उठलो मित्राचा हात धरला आणि चालू लागलो. आम्हाला अश्या अवस्थेत बघून वैद्य बागे मधून धावत आमच्या पर्यंत आले त्यांनी त्याच्या बाबांना उचलल आणि घरामध्ये घेऊन गेले. त्यांनी तात्काळ उपाय चालू केले. आम्हाला सुद्धा मलम पट्टी केली आणि 4 दिवस तिथे थांबून काका बरे झाले. त्या सकाळी जेव्हा उठलो तेव्हा वैद्यांच्या घरा- शेजारून बाहेर नदी वाहत जात होती. तिच्या काठावर जाऊन बसलो आणि जे दृश्य बघितलं ते डोळ्यांचे पालवे हिकडचे तिकडे करू देत नव्हतं. इतक नैसर्गिक दृष्ट्या प्रबळ असलेलं गाव ना तिथे कसल्या सुख सुविधा अश्या ठिकाणात हि लोक कशी राहतात. हे सतत प्रश्न मला पडत होते. खरंतर निसर्ग म्हणजे स्वर्ग आणि ह्या स्वर्गात राहणारे हेच सुखी लोक असावेत. शहरातलं जीवन आपण धावपळीत जगत असतो. पण ही लोक जीवनाचा अर्थ सांगून जातात. ह्या मोठ मोठ्या डोंगरांमध्ये माणसाचं अस्तित्व असणं म्हणजे सुख आहे. विचार करतोय तितक्यात अनित तिथे आला म्हणाला, "मित्रा ह्या पुढचा प्रवास तु एकट्याने कर " कारण मला आता माझ्या जन्म भूमीमध्ये माझ्या आई बाबांसोबत जगायचंय आणि जिथं मरणाला पण वावर नाही अश्या त्या सह्याद्री सोबत राहायचंय.