जयंत
जयंत
जयंत....!
जयंत हा माझा सर्वात मोठा भाऊ. आमच्या वडिलांचं कुटुंब मोठं. त्या काळी कुटुंब नियोजन नव्हतं, त्यामुळे आम्ही एक बहीण आणि सहा भावंड. त्यात पहिली बहीण मंगलादेवी व नंतर जयंत, हेमंत, दुष्यंत, सुमंत अनंत आणि मी शेंडे फळ प्रशांत.
आम्ही मोठ्या भावाला जयंदादा म्हणायचो. गोरा पण, झुबकेदार मिशी राखणारा देखणा. वाणी एकदम गोड, उत्साही आणि कर्तबगार. पोहण्यात तरबेज आणि बोलका, मित्र परिवारात सर्वांचाच लाडका. जय कृष्णमूर्ती, योगी अरविंद, विवेकानंद यांच्या विचारसरणीचा त्याच्या वागण्यातून प्रत्यय यायचा. अपयशावर जिद्दीने मात करणे, चिकाटीने ध्येय सिद्धी प्राप्त करणे आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणे हे त्याचे गुण घेण्यासारखे.
माझी बारावी झाली आणि पुण्याला शिक्षणासाठी जाण्याचा योग आला, पण आमचे महाविद्यालय त्याकाळी बदनाम त्यामुळे घरातून विरोध त्यात डिप्लोमा आणखीन विरोधात भर. पण त्याने चांगला आधार दिला आंबीटकेच सांगितले. तुला डिग्री हवी असेल तर इच्छाशक्ती प्रबळ ठेव कॉलेजला पण डिग्रीची सोय होऊन जाईल. यथाअवकाश कॉलेजवर डिग्रीसाठी संप झाला, कॉलेजला डिग्री कोर्सची सोय झाली आणि मलाही प्रयत्नाने डिग्रीला प्रवेश मिळाला.
त्याने पुण्याला जाताना हेन्रीसॅण्डो कम्पनीचे हिरव्या डायलचे घड्याळ मला दिले आणि सांगितले, पुणे म्हणजे विद्येचे माहेरघर,प्रत्येक क्षणी आपण काहीतरी शिकतोय या भावनेने शिक्षण पूर्ण कर. त्याचे हे बोल अजूनही मनात घर करून आहेत. कालांतराने तो अपघातात गेला पण त्याची शिकवण आजही वास करून आहे. आजही ते १९७२ साली दिलेले घड्याळ मी वापरतो. दादा कसा असावा याचा खरा मापदंड तो होता याची अनुभूती मनात जीवनात आहे. आज खंडेनवमी आज त्याचा स्मृती दिन म्हणून आठवण आली आणि डोळे पाणावले. आज तो नसला तरी त्याचे वास्तव्य क्षणोक्षणी जाणवते आणि जीवन जगण्यास स्फूर्ती आणि पाठबळ मिळते. असे अनेक मोठे भाऊ लाभले म्हणून अनेकांच्या जीवनाचे सोने झाले यात शंका नाही. ती पिढीच सद्गुणसंपन्न होती म्हणून पुढची पिढी चांगली घडली हे उघड सत्य आहे..!