भास....!चिंतन..(१४५)
भास....!चिंतन..(१४५)
भास...!
वेड्या मनाची वेडी स्वप्न,राजकुमार पांढऱ्या घोड्यावरून येणार,किंव्हा अवकाशातून परी येणार मग पुढचे सगळे सविस्तर रसग्रहण..!आता ते दिवस गेले. स्वप्नांसाठी सुद्धा डोळा लागवा लागतो. या डिजिटल युगात दिवस रात्र फक्त नावालाच उरले आहेत.सदा ,कधीही कोठेही मी आणि माझा स्क्रिन ,यापलीकडे काही नाही.स्वतःशी केंद्रित जीवन.भाव भावना इमोजीत कैद आणि कोसो दूर.उगाचच मनाचे समाधान मानण्याचे दंडक घालून घ्यायचे आणि जे नाही ते आहे समजून जीवन जगायचे.पूर्वी म्हण होती "बोलाची कढी बोलाचा भात किंव्हा हवेत बंगले वगैरे वगैरे.वास्तवतेचा सुतराम संबंध नसल्या सारखे.असो आज अचानक फोटो क्लिक केला आणि वाटले फक्त तुझ्या साठी थेट सुर्यावरून आल्या सारखे .अजूनही डोळ्यातली चमक तशीच शाबूत. घोडा नको ,गाडी नको डायरेक्ट सुर्यावरून एन्ट्री विथ प्रचंड एनर्जी. मनाचा वेग किती की ज्याला मोजमापच नाही.तू पैल तीरावर परमेश्वराकडे तक्रार करत उभी होतीस. मला हे दिले नाही ,मला ते दिले नाही वगैरे वगैरे. तितक्यात कानावर त्या विधात्याची वाणी कानावर आली.तो शांत पणे इतकेच म्हणाला..अग वेडे काय दिल नाही याची यादीच तुझी मोठी पण तू काही मागीतलेसच नाहीस त्याला मी काय करणार? तू फक्त मागून तर बघ.. आणि काय आश्चर्य तू मलाच मगितलेस आणि तो तथास्तु म्हणाला आणि धाडकन मला पाठवले. म्हंटले देवा काय रे तुझे हे वागणे. साध्या क्षुल्लक भक्ती साठी तू आज बरे मला वेठीस धरले...तसा तो हसला आणि म्हणाला बाबा,बाल हट्ट आणि स्त्री हट्ट पुरवावेच लागतात,त्याला पर्याय नाही.इतका भास क्षणात होऊन गेला आणि म्हंटले आपले चुकलेच,आपण कधी देवास काय हवे ते सांगितलेच नाही,फक्त काय नाही हेच त्याच्यापुढे मांडत गेलो.आणि निश्चय केला आता थेट मागणी करायची म्हणजे 'मागणी तसा पुरवठा' हे सत्य अमलात येईल आणि सारी मनोरथे, स्वप्न पूर्ण होतील...!
भास मनाचा मज शिकवून गेला
परमेश्वरानेच मज धडा शिकविला
म्हणे यापुढे तरी हवे ते माग बाबा
तुझ्या भक्तीचा आहे मजवरी ताबा...!