धुके...!
धुके...!
सकाळी दाट धुक्याची चादर नजरे समोर पसरली. दहा फुटा पलीकडचे काहीच दिसेनासे झाले. गाडीचे दिवे लावले, हॉर्न वाजवत अगदी पायी चालण्याचा गतीने गाडी चालवली. सूर्याचा मेकअपच बदलला आणि सूर्याचा चंद्र झाला. वाटले काय निसर्गाची किमया ही क्षणात सारे बदलते.
जीवनात अनेकदा असे अनुभव येतात. पटकन परिस्थिती बदलते आणि क्षणात जीवन कधी शून्यवत होते कळतही नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर खूप आशा बाळगून एखादी गोष्ट करावी आणि झटकन अपयश पदरात पडावे यासारखे चपखल उदाहरण दुसरे नाही. क्षणात सारे मुसळ केरात. तसेच काहीसे झाले मस्त कोवळे ऊन्ह उपभोगीत फिरायची मनीषा उरी बाळगून गाडी काढली आणि दत्त म्हणून धुके पुढे उभे ठाकले. सारी गतीच नष्ट पावली आणि मती खुंटली. क्षणभर अंतर्मनाचा वेध घेतला आणि मनाशीच म्हंटले
काय तुझा अवतार हा देवा
सूर्याचा तू चंद्र झाला
धुक्याच्या चादरीत का बरे
आज चेहरा तू असा लपवला.....?
आहेस ना रे तू आपला
असा कसा रे मग कोपला
तुझ्या तेजाचा आविष्कार मी जपला
मग सांग बरे का रे असा लपला...
खुदकन हसून तो बाहेर आला
धुक्याचा बोजवारा वाजला
हळू हळू तो क्षणात तापला
तेंव्हा कोठे जीव भांड्यात पडला...
म्हंटले नमस्कार करून त्याला
राम राम देवा खरोखरच तू पावला
नाहीतर आळसात पुन्हा माघारी फिरलो असतो
ये रे माझ्या मागल्या म्हणुनी पुन्हा झोपलो असतो...!
कारण पळवाट मन शोधत असते
दांडी मारण्याचे मनसुबे नित्य रचत असते
नको नको ते फिरणे उगाच वाटते
वेगळेच विश्व पाहण्याचे धाडस करू म्हणते..
बरे झाले तू आलास सामोरी
सुटली बघ घराची ओसरी
मंद वाऱ्याची ऐकतो मधुर खरी बासरी
हीच मेजवानी सुखाची मज देवा बरी...!