देवाला लिहिलेलं पत्र
देवाला लिहिलेलं पत्र
प्रिय देवा,
देवा तू कुठे आहेस ? मी तुला सर्वत्र शोधत आहे. मी काही जणांना तुझा शोध घेतांना विचारलं सुद्धा तर त्यांनी मला उत्तर दिलं तू का देवाला शोधत आहेस, देव तर सर्वत्र आहे. पानांमध्ये, फुलांमध्ये ,पक्षांमध्ये ,हवेत, पाण्यात ,मानसात ,सर्वत्र देव आहे मग त्याला शोधण्याची गरज काय! पण तरीही मी द्विधा मनस्थितीत आहे कारण काही जणांनी मला असेही सांगितलेलं आहे की देव हा मंदिरात असतो मग तू नक्की कुठे आहेस देवा?तेव्हा हा प्रश्न विचारण्यासाठी मी तुला हे पत्र लिहीत आहे.
लहानपणी पासून शिकवलं जातं की चांगले कार्य करा देव तुम्हचं चांगलं करेल, वाईट कार्य केले तर देव तुम्हचं वाईट करेल . खरं आहे का रे देव हे?प्रत्येक गोष्ट सांगताना देवा तुझं नाव घेतलं जातं, असा देव आहे कोण हे जाणून घेण्याची खूप इच्छा आहे. कुणी तर हेही म्हणतं की तू एक नैसर्गिक शक्तीच आहे. मग अश्या शक्तीचं दर्शन करायला कोणाला आवडणार नाही! असंही म्हटलं जातं की ह्या विश्वाचा कारभार तुझ्या आधारामुळे चाललेला आहे मग अशा देवाला नक्कीच भेटायला आवडेल मला. असं म्हणतात की देव हा कुठल्याही स्वरूपात येऊन तुम्हाला भेटू शकतो आणि तुम्हाला तो मदतही करू शकतो आणि हे तितकंच खरंही आहे असं मला वाटतं पण तरीही तुझं खरं स्वरूप बघायला खूप आवडेल. बरेच प्रश्न डोक्यात आहे किंवा बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या जाणून घेण्याची खूप इच्छा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तूच सांगू शकतोस जसे की स्वर्ग -नरक, जीवन -मृत्यू, पाप- पुण्य या सगळ्या गोष्टी तुझ्याकडूनच जाणून घ्यायचे आहेत. एखादी चांगली घटना घडली की देवा तुझे गुणगान केलं जातं ,असं म्हटलं जातं की देवाने खूप छान कृपा केली आपल्यावर आणि एखादी वाईट घटना जर घडली तर तिथे सुद्धा तुलाच दोष दिला जातो देवा की ,का देवाने असं केलं असावं खरंच तू सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार असतोस का? असा एक प्रश्न मनाला पडतो. कधी कधी एखाद्या व्यक्तीचे भले केले किंवा त्याला मदत केली तर त्यातून समाधान मिळतं देवा त्या समाधानात तू तर नाहीस ना? कधी कधी
हातून एखादी चूक झाली तर मन सारखा विचार करत बसत की आपण चुकलो, हे सांगणारा तू तर नाहीस ना? तसं बघायला गेलं तर देवा तू खरच सर्वत्र आहे असं वाटतं कारण कधी कधी एखाद्या मंदिरात जर गेले आणि नुसता तुला नमस्कार जरी केला तरी मन प्रसन्न होतं .एक पाच सहा मिनिटे जरी तुझ्या मंदिरात बसून राहिलं तरी सगळं दुःख नाहीसं झाल्यासारखं वाटतं ही भावना कदाचित सांगत असेल की तू आहे पण तू का दिसत नाही? सकाळी उठल्यानंतर जेव्हा जेव्हा मी तुझे नामस्मरण करते तेव्हा तेव्हा एक वेगळीच शक्ती प्राप्त झाल्यासारखं वाटतं ती शक्ती म्हणजे तूच आहेस का रे देवा? पुरातन काळातील घडलेल्या गोष्टी जेव्हा मी ऐकते तेव्हा मला वाटतं की किती भाग्यवान ते साधु-संत ज्याना तु प्रत्यक्षात भेट दिलीस. मग मी कुठे कमी पडतेय का रे देवा की माझी भक्ती कमी पडतेय? की माझ्यासारख्या सामान्य मनुष्यात ती शक्ती नाही आहे की जेणेकरून तू मला दर्शन देशील! तुझी नावे अनेक आहेत पण तुझे स्वरूप एकच आहे हे मला माहिती आहे कारण जेव्हा जेव्हा मी तुझे नाव घेते जसे की परमेश्वरा, भगवंता तेव्हा तेव्हा खूप छान वाटतं म्हणून एकदा तरी तुझ्याशी बोलायचं होतं. भगवद्गीता, रामायण, महाभारत यामध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी ऐकायला फार छान वाटतं आणि बऱ्याचशा गोष्टी या बोध घेण्यासारख्या आहेत आणि मानवाने खरंच आचरण त्या पद्धतीने केलं पाहिजे असं वाटतं कारण त्यामुळेच आपले जीवन सुखी होऊ शकत. खास करून श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं ते फार बरं वाटतं. असेच कुणीतरी आपल्यालाही मार्गदर्शन करावं असं मनाला नेहमी वाटत असतं. या काळात तू का येऊ शकत नाही देवा? कुठल्यातरी स्वरूपात ये, काहीतरी योजना कर. जेणेकरून या युगात सुद्धा माणसांना तुझं दर्शन घडू शकेल.जगात जेव्हा मोठमोठ्या घटना घडतात जसे की भूकंप, पूर ,मोठमोठे एक्सीडेंट आणि त्या घटनांमधून जेव्हा खूप नुकसान होतं तेव्हा तुझी खुप आठवण येते देवा. आणि तुला प्रश्न पण विचारावा असं वाटतं की, तू असताना असं का घडतं? तू नाही का रे अशा घटना थांबवू शकत !पण कधी कधी जेव्हा एखाद्या भुकेलेल्या पक्षाच्या पिल्लांना जेव्हा पक्षी चारा देतो आणि ते पिल्लू मोठ्या आनंदाने चारा खात आणि तृप्त होतं तेव्हा पण तुझी आठवण येते कारण वाटतं की तो पक्षी जणू तुझ्या स्वरूपातच त्या पिल्लांना मिळालेला आहे .त्याच प्रकारे आई हि सुद्धा तुझेच स्वरूप आहे असं म्हणतात आणि ते खरं आहे असं मला वाटतं कारण बाळ लहान असताना आईच्या स्वरूपात तूच त्याची काळजी घेत असतो पण तुझं खरं स्वरूप काय आहे देवा ते अजूनही कळत नाही आहे? फुलांभोवती फिरणाऱ्या फुलपाखरांकडे जेव्हा मी बघते तेव्हा असं वाटतं की ही एवढी सुंदर नक्षी कोणी बरं तयार केली असेल त्यात असणारे विविध रंग आणि ती सजावट अप्रतिम वाटते ही निर्मिती ही तुझीच असणार मग मला सांग देवा अशा निर्मितीकाराला भेटायला मला का ओढ लागू नये? सध्या तरी या आशेवर मी जगत आहे की विश्वाच्या प्रत्येक चराचरात तू वसलेला आहेस पण तुझं दर्शन झालं तर फार बरं होईल देवा. खरं सांगते देवा तुझ्या मूर्तिरुपी अस्तित्वाजवळ दिवा आणि एक अगरबत्ती लावल्याशिवाय करमत नाही रे !काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, हे माझ्या मनाच्या समाधानासाठी असतं की, खरंच देवा तू सांगतोस मला असं करायला? म्हणूनच देवा हे पत्र तुला लिहीत आहे या आशेवर की कधीतरी तू मला तुझे खरे स्वरूप दाखवशील. तुझ्यासाठी दोन ओळी आठवत आहे .त्या अशा प्रकारे आहे.
"आहेस कुठे देवा तू?
शोधून तुला दमले
सतत तुझे नामस्मरण करून नावात तुझ्या रमले"..
" होईल दर्शन कधीतरी तुझे साक्षात या आशेवर मी जगले,
अस्तित्व तुझे शोधता शोधता कुठेतरी हरपून बसले..
- तुझा हट्टी भक्त