मराठी माझी शान..
मराठी माझी शान..
जन्म कुठेही झाला असू दे ,प्रत्येक व्यक्तीला आपली मायबोली महत्वाची आणि चांगलीच वाटते कारण जन्मापासून त्या मायबोलीचा उपयोग आपण करत असतो. आता मराठी साहित्याचा जर विचार केला तर, मराठी भाषेत सुद्धा विविध प्रकार आहेत जसजसा प्रदेश बदलत जातो तसतशी मायबोली ही बदलत जाते. उदाहरणार्थ .पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ ,खान्देश, कोकण या प्रत्येक भागात मराठी तर आहे पण वेगवेगळ्या पद्धतीने ती बोलली जाते .म्हणजेच ती त्याची मायबोली पण या प्रत्येक मराठी भाषेच्या प्रकाराला मराठी साहित्यात खूप मोठे स्थान आहे असं मला वाटतं. तसं बघितलं तर मराठी साहित्य हे वेगवेगळ्या मराठी मायबोलीमुळेच खुलून उठतं. एखादा लेखक किंवा कवी जेव्हा त्याच्या मायबोलीतून कविता किंवा कथा लिहितो तेव्हा, ते वाचायला किंवा ऐकायला खूप छान वाटतं आवश्यक नाही आहे की आपण शुद्ध मराठी भाषेचाच उपयोग करून लेखन किंवा कविता किंवा कुठल्याही प्रकारचे मराठी साहित्य लिहावं कारण एकच प्रकार हा कंटाळवाणा वाटतो त्यामुळे मराठी साहित्यात विशेषता यावी म्हणून वेगवेगळ्या मराठी मायबोलीचा उपयोग करणे फार गरजेचं आहे. पूर्वीच्या काळी खूप मोठमोठे संत, महात्मे होऊन गेले व त्यांनी आपल्या राज्याला मोठा साहित्याचा वसा देऊन गेले .त्यांनी लिहिलेले ग्रंथ, ओव्या ,कथा ,कविता अगदी काळजाला भीडण्यासारख्या वाटतात.
खूप सुंदर मायबोलीचा उपयोग करून त्यांनी त्या रचनांना जन्म दिला आणि आजही त्यांच्या या रचनांना खूप महत्त्व दिले जाते त्यातला शब्द न शब्द ऐकावसा वाटतो. मायबोलीसाठी दोन-चार शब्द सुचतात ते अशा प्रकारे की....
"मायबोली आहे माझी शान
ठेवील जन्मोजन्मी मी तिचा मान
तिच्या अस्तित्वासाठी करेल जीवाचे रान माझ्यासाठी ज्ञानसागराची आहे ती खान
तिचे गुणगान करायला विसरेल मी स्वतःचे भान"..
मायबोलीचा गुणगान जेवढं करावं तेवढं कमीच वाटतं कारण ती आहेस तशी .अशी ही मायबोली माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि कायम महत्त्वाची राहील .खरंतर मायबोलीमुळेच आपल्याला आपला इतिहास कळत असतो, चांगल्या अणी वाईट यातला फरक जाणवत असतो. मायबोलीतूनच लिखाणाची सुरुवात झाली आणि लिखाणातूनच नाटक, चित्रपट तयार होत गेले. पुस्तके म्हणजे साहित्य निर्माण होत गेलं . जेव्हा एखादी घटना घडते ती सुखद असो वा दुखद ती व्यक्त करायला आपल्याला मायबोलीचा उपयोग करावा लागतो जर आपल्याला काही सुचत असेल किंवा लिखाण करावे वाटत असेल, सुंदर शब्दांची जुळवाजुळव करावी असे वाटत असेल तर नक्कीच मी माझ्या मायबोलीचा आधार घेते. आणि त्यामुळे तिला साहित्यात महत्त्वाचे स्थान निर्माण होते. आताच्या काळात जर आपण बघितलं तर पाश्चात्य संस्कृती किंवा भाषा याला महत्त्व दिले जाते त्यामुळे आपली मायबोली कुठेतरी मागे पडत आहे असं मला वाटतं. पाश्चात्य भाषेचा उपयोग करू नये असं काहीही नाही वेळ, गरज पडली तर त्याचाही उपयोग करणे गरजेचे आहे पण त्याला मर्यादा असावी आणि सोबतच आपण आपल्या मायबोलीला कधीही विसरू नये असे मला वाटते.आपल्या मायबोलीशी आपण खूप जुळलेलो आहोत कारण एखाद्या अनोळखी ठिकाणी जर आपण गेलो तर तिथली भाषा समजून घ्यायला थोडा त्रास होतो कारण आपण आपल्या मातृभाषेशी जुळले गेलेलो असतो मायबोलीशी आपलं नातं खूप घट्ट आहे. ते कसं तर बघा एखाद्या एखाद्या वेळी होतं असं की मोबाईलवर जेव्हा आपण मेसेज टाईप करतो तेव्हा शब्द टाईप केले जातात इंग्रजीच्या अल्फाबेट मध्ये पण मेसेज असतो मराठी म्हणजेच मायबोलीतून. चित्रपट सुद्धा विविध भाषेतून तयार केले जातात पण पसंती पहिली असते मायबोलीला म्हणजेच "मराठीला" अशा आपल्या मायबोलीला जपून ठेवण्याची फार आवश्यकता आहे. खास करून आजकालची लहान मुले यांना मराठीच महत्व सांगणे खूप आवश्यक आहे कारण आजकालची मुले ही खूपदा इंग्रजी भाषेचा उपयोग करतात पण त्यांना आपल्या मातृभाषेची जाणीव करून देणे ही काळाची गरज आहे .
आपल्या मायबोलीचे मराठी साहित्यातील स्थान टिकवून ठेवण्यासाठी तिला जिवंत ठेवणे फार गरजेचे आहे त्यामुळे छोट्या पिढीपासून सुरुवात करावी लागणार आहे. पूर्वीच्या काळी जेव्हा मनुष्य हा रानावनात फिरत होता तेव्हा भाषेचा उगम झाला नव्हता पण हळूहळू शब्दांचा अक्षरांचा जन्म झाला आणि भाषा तयार झाली हळूहळू माणसं भाषेचा उपयोग करून एकमेकांशी संभाषण करून लागली मग निर्मिती झाली ग्रंथ, ओव्या ,अभंग, काव्य, कथा ,कादंबरी अशा विविध साहित्याच्या छटा निर्माण झाल्या आणि मायबोलीला महत्त्व यायला लागले .आपल्या राज्यातील किंवा देशातील जे, जे संत, महात्मे होऊन गेले त्यांनी मायबोलीतून मराठी साहित्याला खूप मोठा वसा दिला आहे त्यांनी लिहिलेले साहित्य हे वाखण्याजोगे आहे. खूप काही शिकण्यासारखा आहे त्यातून .येणाऱ्या पिढीला सुद्धा ह्या सगळ्या ऐतिहासिक ठेवायची माहिती असणं गरजेचं आहे.एखाद्या ऐतिहासिक ठिकाणी जेव्हा आपण फिरायला जातो तेव्हा आपण तिथे बघतो की त्या वास्तूच्या भिंतीवर खूप सुंदर अशी कलाकारी केलेली असते, विविध चित्रे काढलेली असतात किंवा कुठल्यातरी लिपीतून काहीतरी लिहिलेले असते तेव्हा त्या लिपी म्हणजेच भाषेतून काय लिहिलेले आहे हे जाणून घेणे फार गरजेचे असते असं मला वाटत. कधी, कधी एखादी सुंदर रचना कानावर पडली तर मंत्रमुक्त झाल्यासारखं वाटत. एवढी ताकद मायबोली मध्ये आहे. एखाद्या लेखकाची कविता जर ऐकली तरी खूप प्रसन्न वाटतं कारण ते शब्द जुळवण फार कठीण असतं आणि ज्याला ते जमतं त्याच्यामध्ये खरंच काहीतरी कला आहे असं हमखास समजावं. तो शब्दाशी केलेला खेळ इतका सुंदर वाटतो ना की खूपच. आपल्याकडे मराठी भाषा दिन साजरा केला जातो ही फार चांगली गोष्ट आहे कारण या निमित्ताने आपल्या भाषेचे महत्त्व काय आहे हे लक्षात येते. तसे बघितले तर मराठी भाषा ही बऱ्याच प्रमाणात बोलली जाणारी एक मोठी भाषा आहे फक्त काही ठिकाणी ती मवाळ वाटते तर काही ठिकाणी कठीण पण भाषा तर एकच आहे ती म्हणजे मराठी. माझी मायबोली मराठी साहित्यात मायबोली मराठीला अग्रीम स्थान आहे फक्त ते आता जपायला हवे. पुस्तकांमधून विविध माध्यमातून तिची शिकवण नवीन पिढीला देणे फार गरजेचे आहे.आपल्या अभ्यासक्रम पद्धती सुद्धा मराठीला महत्त्व आहे कारण बरेच विषय हे मराठी माध्यमातून सुद्धा शिकवले जातात त्यामुळे मराठी भाषा हे मुलांवर बिंबवली जाते. आणि ते आवश्यक सुद्धा आहे प्रत्येकाला आपापल्या भाषेचा गौरव असतो त्याच प्रकारे आपल्यालाही आपल्या भाषेच्या गौरव असायलाच पाहिजे आणि तो आपण करतोच कारण आपण नेहमी म्हणत असतो की "मी मराठी"आपले मराठी साहित्य हे मायबोली शिवाय अपूर्णच आहे कारण तिच्यामुळेच साहित्य तयार होतं असे मला वाटते.