नको पाठवू रे वृध्दाश्रमात..
नको पाठवू रे वृध्दाश्रमात..
नको पाठवू रे वृद्धाश्रमात..
वयाच्या 18 व्या वर्षी सीमा च लग्न झालं नवरा मुलगा इंजिनियर होता. सीमा ग्रॅज्युएट झाली होती. त्या काळात एवढे शिक्षण म्हणजे खूप जास्त असायचं, घरची परिस्थिती ही चांगली होती. सीमाला सासू सासरे होते, सीमाच्या नवऱ्याला आणखी एक भाऊ होता पण तो कामानिमित्त बाहेरगावीच राहत होता.
सीमा तिच्या सासू-सासरे व नवऱ्यासोबत एका शहरात राहत होती. लग्नानंतरचा तिचं आयुष्य चांगलं होतं. सगळ्या घराची जबाबदारी ती योग्यरीत्या पार पाडत होती. नवऱ्याचा पगार चांगला असल्यामुळे तिला नोकरी करायची गरज नव्हती त्यामुळे तिचं सगळं लक्ष घरातच असायचं तिने कधीही स्वतःचा विचार केला नाही बऱ्यापैकी तिचं जीवन घर सांभाळण्यातच जात होतं.
अशाप्रकारे वर्षा मागे वर्ष निघत गेली. सीमाला दोन मुले झाली. घरात सगळ्यांना खूप आनंद झाला होता कारण मुले ही जुळी होती. आता सीमा तिच्या आयुष्यात खूप व्यस्त झाली होती कारण तिला दोन मुलांना सांभाळायचं होतं तसेच तिला सासू-सासऱ्यांना सुद्धा सांभाळायचं होतं. पण तिने न डगमगता सगळ्या गोष्टी योग्य रीतीने पार पाडल्या तिच्या जबाबदाऱ्या तिने योग्यरीत्या पूर्णत्वास नेल्या. अशीच हळूहळू वर्षानुवर्ष जात गेली आता सीमाची मुले मोठी झाली होती ती स्वतःच्या पायावर उभी राहिली होती.
सीमाने मुलांच्या पालन पोषणात कुठलीही कमतरता ठेवली नव्हती. सीमा व तिच्या नवऱ्याने मिळून निर्णय घेतला की आता मुले मोठी झाली आहेत त्यांची लग्न करून द्यावी त्यामुळे त्यांनी दोन्ही मुलांची लग्न एकाच मांडवत केली.आता सीमाला घर सांभाळण्याचं टेन्शन नाही असं वाटत होतं कारण आता घराची संपूर्ण जबाबदारी जशी तिने घेतली होती त्याच प्रकारे तिच्या सुना घेणार असे तिला वाटत होते पण काळ बदलला, लोक बदलली,सार काही बदलून गेले. असं म्हणतात ना की आपल्या मनात जे असतं तशाप्रकारे कधीही घडत नाही तशातलाच एक प्रकार सीमा सोबत झाला होता.
सीमा आता सासू झाली होती तिला वाटत होतं की ज्या प्रकारे मी माझ्या सासू-सासऱ्यांची काळजी घेतली त्याच प्रकारे माझ्या सूना सुद्धा माझी काळजी घेतील आणि तसं काहीही घडलं नाही. यांत चुक कुणाची तर होणारे विचारांचे मतभेद आणि बदलता काळ, दुसरं काहीही नाही. आता सीमाच्या घरात छोट्या छोट्या कारणांमुळे भांडण व्हायला सुरुवात झाली होती आणि मग एक दिवस असा आला की या भांडणाच कन्वर्जन मोठ्या वादात झालं आणि शेवटी तिच्या मुलांनी तिला व तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुम्ही आता या घरात राहू नका. आम्ही तुमची व्यवस्था वृद्धाश्रमात करून देतो हे ऐकताच सीमाच्या पायाखालची जमीनच सरकली.
थोड्या वेळासाठी ती स्तब्ध झाली तिच्या डोक्यात विचार सुरू झाले की आपण असा काय गुन्हा केला, एका क्षणासाठी तिच्या डोक्यात असाही विचार आला की हे घर आपलं आहे आपण आपल्या मुलांना सांगावं की तुम्हीच आमच्या घरातून निघून जा पण शेवटी ती आई आहे मुलं कशीही वागली तरी ती तशी वागू शकत नाही त्यामुळे ती काहीही बोलली नाही शांत पणे मुलांचा निर्णय तिने ऐकून घेतला पण तिचं मन मुलांना एकच प्रश्न विचारत होतं “नको पाठवू रे वृद्धाश्रमात”.