काय म्हणतील लोक..
काय म्हणतील लोक..
खरं आहे, सर्वात मोठा रोग, काय म्हणतील लोक? कधी कधी मानसाला बऱ्याचशा गोष्टी करावयाच्या असतात पण लोक काय म्हणतील हा विचार त्याच्या डोक्यात येतो आणि तो तिथेच थांबतो. एखादी गोष्ट करावीशी वाटली तर सगळ्यात आधी डोक्यात विचारचक्र सुरू होतं त्यामध्ये मन काही वेगळेच सांगत तर मेंदू काही वेगळेच सांगतो मग मन आणि मेंदू ची कसरत सुरू होते आणि त्यात कधी मन जिंकत तर कधी मेंदू.
आजच्या या काळात वेगवेगळ्या प्रकारची माणसं आपल्याला बघायला मिळतात. प्रत्येकाचे विचार वेगळे प्रत्येकाचे आचार वेगळे, काही माणसं समाजाचा किंवा समाजातील लोकांचा विचार करत नाही तर काही माणसं या गोष्टींचा खूप विचार करतात. कधीकधी परिस्थितीनुसार आपण ठरवतो की काय योग्य आणि काय अयोग्य. कधी कधी कुणाचा विचार न करता योग्य तो पर्याय निवडावाच लागतो. काय म्हणतील लोक याचे एक सुंदर उदाहरण म्हणजे माझी एक मैत्रीण, आई-वडिलांना ती एकुलती एक त्यामुळे आई-वडिलांची जबाबदारी संपूर्णपणे तीच्यावर आई-वडिलांच गाव हे खुप छोटं वेळेवर आजारी पडलं तर ना डॉक्टर ना दवाखाना अशा परिस्थितीत आई-वडिलांना तिथे ठेवणे अयोग्य मग तिच्या मनात प्रश्न निर्माण होतो की त्यांना ठेवायचं कुठे? कारण मुलीच्या लग्नानंतर मुलीचे आई वडील जास्त दिवस सासरी राहू शकत नाही आणि राहिले तर लोक वेगवेगळ्या प्रकारे बोलतात अशाप्रकारे त्या मैत्रिणीच्या मनात प्रश्न निर्माण होतो की लोक काय म्हणतील? खरंच हा एक सर्वात मोठा रोग आहे .
असो,शेवटी तिने या रोगावर मात करत आई-वडिलांना स्वतःच्या जवळ ठेवले कारण सासरची माणसं चांगली होती पण प्रत्येकाच्याच बाबतीत असं होईल असं काही नाही म्हणूनच तर लोक काय म्हणतील हा एक रोग आहे. आणि लोक बोलणं कधी सोडत नाही म्हणून आपणच हा रोग टाळणं गरजेचं आहे. स्वतःच्या मनाला जे योग्य वाटेल तेच माणसांनी करावं नाहीतर आपण या रोगामुळे जगू शकणार नाही. आणि जेव्हा आपण आपल्या मना प्रमाणे एखादी गोष्ट करतो तेव्हा खरंच त्यातून खूप आनंद मिळतो आणि आपण समाधानी होतो.