बलुत्याला पशाचं
बलुत्याला पशाचं
कोणाला कशाचं
आणि बलूत्याला पशाचं
ही ग्रामीण म्हण आहे.पूर्वी 12 बलुतेदार पद्धत होती . आणि अठरापगड जाती होत्या. जाती तर आजही आहेत, मात्र त्यावेळी बारा बलुतेदार पद्धतीवर गाव गाडा चालायचा.
सुतार ,लोहार,कुंभार ,माळी
महार मांग कोष्टी कोळी
रामोशी, गुरव, चांभार, परीट
तेली न्हावी शिंपी कासार या सर्वांनी वर्षभर गावासाठी सेवा द्यायची,,आणि त्याच्या बदल्यात त्यांना शेतात येणार धान्य मिळायचं.
प्रत्येक घरातून पसापसा(ओंजळभर) गोळा केलं तरी , त्याची वर्षभराची बेगमी व्हायची.
त्यामुळे वर्षभर कष्ट केलेल्या त्या माणसाला, पशापायलिची आशा असायची. पाहिली म्हणजे पाच किलो.
पसा म्हणजे ओंजळ भरून, बऱ्याच वेळा त्यांना बळीराजाकडून मिळायचं, बराच वेळा नाही पिकलं तर मिळायचं नाही .
शिवाय असं असतं! छोटा गरीब शेतकरी ,आपल्या घासातला घास काढून देईल. पण मोठा तालेवार बागायतदार, ,असणारा आणि एकरानी शेती असणारा, पाटील ,सरपंच, ही पदे भूषवणारा मात्र,
त्या एका पसा पायलीभर धान्यासाठी चार वेळा हेलपाटे मारायला लावेल .
आता तिन्हीसांज झाली, आता नाही. उद्या आमका वार आहे म्हणून नाही, मग घरातली मंडळी अडचणीत आहेत म्हणून नाही.
बळदा मध्ये उतरायला कोणी नाही, म्हणून आज नाही.
मग एवढा पाण्याने हौद भरून टाक, मग एवढं काम करून दे, परसातल एक लाकूड फोडून दे, परगावी असणाऱ्या पोरीच्या सासरवाडीला एवढा निरोप सांगून ये, मग देतो असे करत त्या व्यक्तीला चकरा मारायला लावायचे.
त्यामुळे त्यांच्याकडून काही कारणासाठी बोलावणं आलं की, बलुतेदाराला वाटणार की मला धान्य देत आहेत. माझ्या हक्काचं धान्य मला देत आहेत.
काम मात्र दुसरंच काहीतरी असायचं .
म्हणून म्हणतात .
कोणाला कशाचं तर
बलुत्याला पशाचं
**************"*******
वरीलपैकी गुरव समाजाला पूजेसाठी इनामी शेती मिळालेली असते. शिवाय देवांना रोजचा नैवेद्य दाखवणार म्हणून, दररोज गावांमधून पीठ मागून आणायची देखील परवानगी त्यांना होती. आणि ते आणत असत.
सोनार तर तालेवारच,,शिंपी आणि कासार आपापल्या उद्योग व्यवसायानुसार चालणारे.
ते काही 12 बलुते दारामध्ये येत नव्हते. कारण रोखीने व्यवहार, पैसा नसेल तरी सेवेच्या बदल्यात ताबडतोब धान्य मिळायचे.
पण हा बाकीचा समाज मात्र वर्षभर सेवा द्यायचा.
शिवाय ब्राह्मण हा समाज तर धड पैसेवालाही नव्हता, पण गरिबीच रडगाणं देखील गाता यायचं नाही. वर्षभर मोठ्या मोठ्या लोकांच्या घरी, सगळ्या सणावाराला हजेरी लावायची .
लक्ष्मीपूजन करायचं, गणपती बसवायचे, दहा दिवस दोन्ही वेळ आरती ला जायचं.
पण त्याचा मोबदला मात्र, वर्षभर दहा चकरा मारल्यावर, कधीतरी कीड लागलेलं पायलीभर धान्य पदरात पडायचं.
कासार हे जैन समाजाचे, तर वाणी एक वेगळा लिंगायत धर्म असून ते शंकराचे पूजक..त्यामुळे वाणी कासार ब्राह्मण सोनार या जमाती या जाती गरीब होत्या पण त्यांना गरिबीमध्ये पकडले जात नव्हते.
त्यामुळे त्यांच्यासाठी काही बारा बलुतेदार ही पद्धत नव्हती.
