संकल्प
संकल्प
दरवर्षी ठरवतं मन देऊया निरोप...
नावडत्या गोष्टींना,दुःखी भावनांना ,
पण हे मन आहे ना..हट्टी कुठलं
ते पुन्हा..पुन्हा संकल्पच राहतं करत !
नाहीच होत पूर्ण हे प्रकल्प..
राहतात अर्धेच कधी..कधी खंडित ,
मध्येच येत असतात अडचणी अनंत
म्हणून ठरवलंच एकदाचं..नकोच ते
सरळ निरोपच घेऊया अगदी निकोप
मला नकोय...
भग्न झालेल्या संकल्पांच्या अवशेषांचं ओझं
अन् ठरवलं...नाहीच अडकायचं द्वंद्वात
नाही तर नाहीच म्हणायचं
मनाविरुद्ध नाहीच जगायचं..कारण..
का कुणास ठाऊक ?
आपल्यालाच निरोप घेण्याची वेळ
समीप आली तर ?
फार वेदना होतील या काळजाला..
वेळीच मी आवरतं घेतलंय हे सांगायला ,
इतका उशीर लावला..हे समजायला ?
की..जगणं फारच सुंदर आहे ..
ते नीट सजवून..सजवून जगता आलं पाहिजे
योग्य वेळी स्वतःची बाजू घेऊन
अख्ख्या जगाशी लढता आलं पाहिजे !