शुभ मंगल सावधान..!
शुभ मंगल सावधान..!
शाळा कॉलेज पदवी
हीच इच्छा वाजवी
हा हा म्हणता म्हणता
सारे नियती पुरवते लाघवी...
मग चालू होते
शर्यत जीवन जगण्याची
व्यवसाया पेक्षा
नोकरीच वाटते हक्काची...
थेंबे थेंबे तळे साचे म्हणता
वाहतात मागोमाग लग्नाचे वारे
येतात जातात अनेक स्थळे
वाटते आपणच आहात एकटे खुळे...
ओ की ढो काही कळत नाही
प्रेमाची पण काही बेजमी होत नाही
पै पाहुणे राहूणे पुढे सरकतात
वाटते कधी एकदा लग्न उरकतात...
ना धड बुड स्थिर
ना आपण असतो वीर
होते शेवटी बिरबलाची खीर
म्हणतात तेंव्हा थोडा धरा धीर...
अनाहूत क्षणी पत्रिका येते आणि
कुंडली जुळता कांदा पोहे उरकते
हे छान ते छान करीत
एकदाची दोघांचीही पसंती कळते...
ना त्या पसंतीत मी असतो
ना त्या पसंतीत ती असते
तरीही स्वारी बोहल्यावर चढते
एकदाचे शुभ मंगल झोकात पार पडते...
आजही मात्र
शुभ मंगल सावधान म्हंटले की
अंगावर काटा तरारून उभारतो
सावधानतेचा अर्थ अत्ता कळतो...
मी होते म्हणून टिकले...!
काय नशीब मेलीचं...!
आधी कळाल असत तर...?
हे सारे उद्गार कानी पडतात
जेंव्हा जेंव्हा
लग्नातले ते मन्त्र
गंगा सिंधू सरस्वती गोदावरी नर्मदा
कानावर दणादण आदळतात
तेंव्हा मात्र ते
केल्या कर्माचे फळ नित्य नियमाने
निमूटपणे भोगायला लावतात...
पण
शुभ मंगल सावधानतेतच
खरे मोठे सुख आहे
सर्वात सुंदर वाटतेही आणि पटतेही
आपल्याच
सौभाग्यवतीचे शुभ मंगल असे मुख आहे....!