परिवर्तन
परिवर्तन
जीवाला जीव देणारा,
जीवापाड प्रेम करणारा,
नाती गोती जपणारा,
दुसऱ्याची व्यथा जाणणारा,
दुःखाचा डोंगर हलका करणारा,
संकटकाळी हाकेला ओ देणारा,
आतून बाहेरून निर्मळ,
सोज्ज्वळ तसाच प्रेमळ
मायाळू अन् कनवाळू
जरासा अंधश्रद्धाळू
शरीरानं, मनानं भक्कम होता,
पण माणूस हा माणूसच होता
काळ बदलला, जग बदलले
माणसाचे विचार बदलले
शिक्षण घेऊन शिक्षित झाला
स्वार्थी, ढोंगी, लबाड झाला
प्रगत झाला माणूस
आणि प्रगत झालं शास्त्र
कळलं नाही, गळून पडलं
कधी माणुसकीचं वस्त्र
सौख्याच्या प्राप्तीसाठी
रात्रंदिवस धडपडला
चंद्र, मंगळावर धडकला
पण शेजारी नाही कडमडला
कामा पुरता मामा
आणि ताका पुरता काका
कुणी नाही मदतीला
जर प्रसंग आला बाका
परिवर्तन जरी आहे जगाचा नियम
म्हणून काय माणसानं सोडावी माणुसकी?
प्रगतीच्या नावाखाली जीवन व्हावं एकाकी?
झाडानं सावली देणं,
नदीच सागराकडं धावत जाणं,
सूर्याचं उगवणं, मावळणं
तारे, वारे, सारे जिथल्या तिथंच आहेत
मग माणसाचं काय?
त्यानं का सोडावी माणूसकी?
जग बदललं तरी,
प्रवाहा बरोबर राहूनही
माणूस म्हणून राहावं
माणूस म्हणून राहावं