भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर
भारतरत्न डॉ. भीमराव आंबेडकर
गावकुसाबाहेर दीनदलित
खितपत होते पडलेले
कमरेला झाडू गळी मटके
होते सतत लटकलेले...1
सावली वा दर्शनाने त्यांच्या
चातुरवर्णीयांना विटाळ होई
मान खाली घालून फक्त
दलित जनावराचे मांस खाई..2
लाचारीचे जगणे होते
हिन समजत महार जातीला
तुच्छतेची वागणूक मिळुनही
'जोहार माय' करी मनुवाद्याला..3
अंधारात चाचपडत होता
दलित गुलामगिरीत राहुनी
चातुर्ववाण्याकडे आपला
स्वाभिमान गहाण ठेवूनी..4
एक किरण आशेचा म्हणता
सूर्य तळपता आला जन्मला
महू गावी मध्यप्रदेशात
14 एप्रिल 1891 सालाला..5
धन्य माता पिता जगी
चौदावे रत्न लाभले पोटाला
माता भीमाई पिता रामजींना
भीमाबाळ पाहून हर्ष जहाला..6
धाकटे बाळ भिवा होते जिद्दी
का?कशामुळे?करारी प्रश्न विचारी
बुद्धिचातुर्य पाहून त्याची
रामजी पिता विचार करी..7
पाच वर्षाचा बाळ भीमा
पोरका झाला आईच्या प्रेमास
मायेच्या पदराआड घेई मग
आत्या मीराबाई लाडक्या भिमास..8
भारताचे आदर्श पिता
म्हणावे रामजी सुभेदाराला
भीमबाळाच्या मनावर
बालपणी योग्य तो संस्कार केला 9
साताऱ्यातील सरकारी
प्रवेश घेतला विद्या मंदिरी
शिक्षकवृंद अचंबित होतसे
भिवाच्या तल्लख बुद्धीवरी..10
पेटली ज्ञानजोत ज्ञानार्जनाची
अ, आ, इ, ई च्या सुरुवातीने
तळपू लागला शाळेत साऱ्या
बाळ भिवा आपल्या तेजबुद्धीने..11
बाळभिवाच्या आले लक्षात
मार्ग शिक्षणाचा सोपा नव्हता
अस्पृश्यता अटाळ विटाळ
बालमनावर घात करत होता..12
बुद्धिवान बाळ भीमाचा
स्वाभिमान कधी न डगमगला
निष्ठेने आणि अति कष्टाने
जगी इतिहास हा घडवला..13
नवरा चौदा वर्षाचे भीमराव
नऊ वर्षाच्या नवरी रमाबाई
विवाहबंधनात अडकूनिया
अक्षता पडल्या दोघांच्या डोई..14
एलफिस्टन हायस्कूलमध्ये
मॅट्रिक उत्तीर्ण भीमराव झाले
केळुस्कर गुरुजी कडून
'बुद्ध चरित्र'पुस्तक भेट मिळाले..15
आनंद झाला साऱ्या वस्तीत
पहिला दलित मॅट्रिक झाला
साखर वाटून मायमाऊलींनी
आनंदोत्सव साजरा केला..16
बडोद्याचे नरेश महान...
होते सयाजीराव गायकवाड
भीमरावांच्या उच्च शिक्षणाचे
त्यांच्यामुळेच उघडले कवाड..17
एलफिस्टन कॉलेजमध्ये
बाबासाहेबांनी प्रवेश घेतला
पहिले दलित उच्चशिक्षण घेणारे
भीमाने पुन्हा तोच इतिहास घडविला..18
मुंबई विश्वविद्यालयातुनी
पदवी परीक्षा उत्तीर्ण झाली
अर्थशास्त्र राजनीति विज्ञान
यात पदवी प्राप्त केली..19
अनेक हालअपेष्टा साहुन
जातीभेदाने गेले त्रासून
उच्चपदवीची संधी मिळता
भीमराव अमेरिकेत गेले निघुन..20
एम ए ची मास्टर डिग्री प्राप्त झाली
कोलंबिया विश्वविद्यालयातून
'ब्रिटिश भारतात प्रांतीय वित्तयाचे,
विकेंद्रीकरण'केली पीएचडी या विषयातून..21
मायदेशी आले भिमराव जेव्हा
जातीयतेचे फोफावले होते वारे
भडका होऊन जातिभेदाचा
होरपळत होते दीनदलित सारे..22
दिनदलितांचा कैवारी होऊन
भीमाने लेखणीला दिली धार
न्याय शास्त्राचा अभ्यास करून
बॅरिस्टर म्हणून केला प्रहार..23
अस्पृश्यतेला करण्या नष्ट
मार्ग धरला सत्याग्रहाचा
अधिकार मिळवून दलितांना
दिला चवदार तळ्याच्या पाण्याचा..24
साथ होती निरंतर रमाईची
बनून राहिली भीमाची सावली
उभी हयात कष्टली अपार
साऱ्या दलितांची माऊली 25
लंडन गोलमेज परिषदेत
दलितांसाठी हक्क मागितले
पुणे करार अजरामर झाले
गांधीजींचे प्राण वाचवले.. 26
शिका संघटित व्हा संघर्ष करा
मंत्र अनमोल दिला जगाला
संविधान लिहून भारताचे
सन्मानित केलं लोकशाहीला.27
स्वातंत्र्य समता बंधुता
तत्त्व जाणून जीवनाचे
सार्वभौम भारतामध्ये
मुळ रुजविले समतेचे..28
नांदते राष्ट्रीय एकात्मता
इथे घटनेच्या बळावरती
सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान
असे जगाच्या पाठीवरती..29
त्रिवार वंदन करते मी
घटनाकार भीमरावास
क्रांतीसुर्य बोधिसत्वाने
उद्धरिले दीनदलितास..30
भारताचे पहिले कायदेमंत्री
नियुक्ती झाली भीमरावांची
विरोधकांचा विरोध होऊनी
कास ना सोडली स्वाभिमानाची..31
बुद्ध, कबीर, फुले यांसी
मानून गुरु भामरावांनी
स्फूर्ती मिळवली जगण्यात
प्रभावित होऊन गुरु प्रेरणेनी..32
हिंदू धर्माच्या अनिष्ट परंपरेचे
उतरुनि जु मानगुटीवरचे
जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या
आचरण केले बौद्ध धर्माचे..33
14 ऑक्टोबर 1956 रोजी
नागपूर येथे दीक्षाभूमीवर
बौद्ध धर्माची दिक्षा घेऊन
अनुयांयाना सोबत केले धर्मांतर..34
क्रांतिकारी घटना घडली
नागपूर नगरी बुद्धमय झाली
बुद्धम् सरणम् गच्छामीच्या
एक सुराच्या मंत्राने नहाली.. 35
6 डिसेंबर 1956 रोजी
आल्या दाही दिशा अंधारून
काळाने हो घात असा केला
भीमाराव गेले आम्हा सोडून..36
जागा करून समाज सारा
चंदनावर देह शांत निजला
सागराने उसळून लाटा
आदरांजली वाहिली बा भीमाला..37
फिरून मिळणे आता कठीण
असा कोहिनुर भारताला
त्रिवार अभिवादन करूया
डॉ. बाबासाहेब आंबेडकराला..38