अनाथ
अनाथ
आईबाबा नसल्यावर होतात हाल खूप,
त्यांच्या स्वप्नातही येत नाही रोटी आणि साजूक तूप
दोन वेळ जेवणाचीच पडलीये त्यांना भ्रांत,
कशाला सतावील त्यांना काहीतरी नसल्याची खंत?
कुणाकडे करायचा हट्ट; आणि तोही कशासाठी?
कसली रंगवायची स्वप्नं घेऊन कोरी पाटी?
असे कितीतरी जीव दररोज जातात झोपी उपाशीपोटी,
उद्या मिळेल काहीतरी खायला, हीच ठेवून मनात आशा खोटी
या अशा संकटासाठी जबाबदार कुणाला धरावं?
चर्चा आणि अधिवेशनातच का आलेलं वर्ष सरावं?
हजारो जातात बळी दरवर्षी कुपोषणाचे,
एक दिवस हेही निमित्त बनावे एखाद्या उपोषणाचे
'चोच देणारा देतो चारा' म्हणणं जरी असलं सोपं,
तग धरुन उगवतात का लावलेली सगळी रोपं?
आज चित्रात का होईना त्यांना मिळतंय खायला,
एरवी निमित्त लागत नाही दररोज उपासमार व्हायला
आयुष्यात त्यांना दोनच गुरु-अपमान आणि भूक,
दोन वेळचं कष्टाचं अन् हक्काचं खायला मिळणं हेच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठं सुख!