आयुष्य जगावंच लागतं ना?
आयुष्य जगावंच लागतं ना?
मनात चाललेल्या विचारातच
अनेक प्रश्न समोर येऊन उभे असताना
त्या उत्तराच्या शोधात राहावं लागतंच
शोध... शोधलं की सापडतं
पण काही गवसलं नाही तर?
निराश होऊन माघार घ्यावी लागेल
ती घेईल पण...
अनेक चेहऱ्यांशी सामोरं जावं लागेल
सामोरं जाईलही... पण
अनेक शब्दांचे टीकास्त्र सोडले जातील
ती झेलण्याची हिंमत राहील का?
राहीलही... पण
निराशेच्या जगात जगण्याची आस राहील का?
राहीलही... पण
पुन्हा जिद्दीने प्रयत्न करता येईल का?
करेलही... पण
नव्याने पुन्हा एकदा शोधेलही
पण यात माझ्या विचारांचं काय?
प्रत्येकवेळी दुसऱ्यांच्या विचारातच
आयुष्य जगावं का?
की आपल्याही मनाप्रमाणे जगायला मिळेल का?
इतक्याच प्रश्नावर येऊन आयुष्य थांबतं ना...
हल्ली आपण सगळंच शोधतो
पण स्वतःला कधी शोधतो का?
नाही ना...
आणि शोधलं तरी...
मनासारखं जगायला मिळतं का?
मिळेल नाही मिळेल... माहीत नाही
पण इतकं असूनही
शेवटी प्रश्न मात्र राहतोच की
आयुष्य जगावंच लागतं ना...?