आसवांची व्यथा
आसवांची व्यथा
मी किती बोलावले पण, ती कदाही येत नाही
वाहणाऱ्या आसवांना, कव अता ती देत नाही
होय ते उरलेत काही, तू दिलेले शब्द मागे
गूढतेचा स्पर्श त्यांना, ते कधीही थेट नाही
गात आहे नित्य मी, माझ्याच काही गीत पंक्ती
जे तुला भावेल हृदयी, कोणते ते गीत नाही
ती तुझ्या ओठांतली, सांगून गेली मौन भाषा
जीवनी आता पुढे, होणार अपुली भेट नाही
संपले आयुष्य ऐसे, जे कधी नव्हतेच माझे
फक्त पाठी दुःख माझे, ते कधी सरलेच नाही
आपल्या काही खुणा त्या, शोधितो मी या किनारी
विरून गेली लाट पाठी, ती पुन्हा नजरेत नाही
हाय मी सोसून गेलो, तू दिलेले घाव सारे
सांडला तो देह माझा, ज्यात बाकी प्रीत नाही