व्यसन भ्रमणध्वनीचे
व्यसन भ्रमणध्वनीचे
आधी निरोप पोहोचवण्यासाठी प्रत्यक्ष माणसं पाठवावी लागत असे. मग डाकघर आले. त्याने पत्र पाठवण्याची आणि उत्तराची वाट पाहण्याची, ती वाचण्याची एक गोडी होती. इमर्जन्सी म्हणजे तार पाठवणे होते. मग दूरध्वनी आले तर निरोप पाठवणे जलद झाले. वेळप्रसंगी आपल्या माणसांचा आवाज ऐकता येऊ लागला. पण त्याचे जाळे विरळ होते म्हणून उपयोग गरजेपुरता होता. मग आला भ्रमणध्वनी. त्यामुळे संपर्क साधणे सोपे झाले. तरीही त्याचा वापर मर्यादित होता. पण इंटरनेट आले. अन् पाठोपाठ वेगवेगळ्या सोशल मीडियाचे जाळे जसे जसे कानाकोपऱ्यात पोहोचू लागले तसे तसे वातावरण दूषित व्हायला लागले. आणि स्मार्ट फोनने त्यात भर घातली, तेव्हा इंटरनेट हे व्यसन व्हायला लागले. जग जवळ आले, काम करणे सुकर झाले, कार्यक्षमता वाढली, सुरक्षितता वाढली (की असुरक्षितता!?), असे बरेच फायदे झाले हे मान्य आहे. पण त्याहून किती तरी पटीने जास्त तोटे आहेत. त्यातलाच हा सर्वात मोठा, भकासुर म्हणजे ह्याचे व्यसन! आबालवृद्ध ह्याच्या आधीन झाल्याचे चित्र खूप भयंकर दिसते आहे. प्रत्येक जण एकलकोंडा होत चालला आहे व त्याच्या त्याच्या व्हर्चुअल, आभासी विश्वात रममाण झालेला दिसतो. ज्यांनी भ्रमणध्वनीच्या आधीचा काल बघितला आहे त्यांना ह्याची जाणीव आहे. म्हणून तो संतुलन राखण्याचा प्रयत्न करत राहतो. पण बऱ्याच ठिकाणी नंतरच्या पिढीची तर व्हर्चुअल आणि रिअल वर्ल्ड मध्येच गल्लत होत आहे. दोन्हीं मधला फरक समजवला तरी स्वीकारणे अवघड जात आहे. त्यामुळे त्यांच्या मनात, अनुषंगाने आयुष्यात देखील खूप गुंतागुंत निर्माण झाली आहे. ह्याचे परिणाम अतिशय भीषण होत चालले आहेत. यावर हमाखास असा उपाय अजून तरी पकड मधे आलेला नाही.......
कुणाला सापडला तर सांगा माझ्यासाठी हवा आहे 😀
🔸🔹🔸💠🔸🔹🔸🌿
*स्वप्ना*
