आशेचा किरण
आशेचा किरण
सुख आणि दुःख ह्या दोन्हीं एकाच नाण्याच्या बाजू! कमी अधिक प्रमाणात सही, पण कुणाच्याही जीवनात न चुकणाऱ्या. इथे कुणाच्या वाट्याला फक्त सुखाच्या फुलांचा वर्षाव आहे किंव्हा फक्त दुःखाच्या काट्यांचे बोचणे आहे असे नाही. पण त्या त्या वेळी ते पचवता आले पाहिजे खरे. कुठल्याही समयी सकारात्मकतेवर नकारात्मकता हावी होता कामा नये. दुःखाचे सावट पडू दिले नाही तरी सिद्धार्थ गौतम ह्यांना एके दिवशी फुलांसोबतच्या काट्यांचा प्रत्यय आलाच. त्यातून प्रत्येकच जण बुद्ध होईल असे नाही ना!? म्हणून आयुष्यात चांगले वाईट दिवस आलटून पालटून येतच असतात आणि ते येत राहणार ह्याचा विसर पडू देऊ नये. कधी कधी तो दीर्घकालीन असतो. अश्या वेळी सुखाने भारावून भरकटणे योग्य नाही अथवा दुःखाने ढासळून कोलमडणे देखील अयोग्यच. तरी कधीतरी दुःखाचा डोंगर पोखरून त्यातून वाटचाल करणे कठीण होते. तेव्हा आशेचा एक किरण हवा असतो. तो दिसेपर्यंत "ही बाग जगाची न फुलांची काटे जागोजाग" असेच भासते. नव्हे हे एक कटु सत्य सुध्दा आहे. हे स्वीकारता आले पाहिजे. त्यास सामोरे जात जात एकदा का तो आशेचा कवडसा गवसला की परिस्थिवर मात करण्यासाठी चालना मिळते. आणि त्यातून तरलेल्या माणसाचा नवा जन्मच होतो जणू! एव्हाना जर तो वाट चुकला नाही तर, एकाच जीवनी नवनवीन जन्म घेऊन तासलेला व्यक्ती म्हणजे प्रगल्भतेचा उत्तम नमुना होऊ शकतो.