Nilesh Desai

Abstract Inspirational

4.6  

Nilesh Desai

Abstract Inspirational

"स्री"-त्व

"स्री"-त्व

4 mins
1.0K


"एक स्टेफ्री सेक्यूर अल्ट्रा थीन...." मेडीकलमध्ये ऑर्डर दिली तशा बाजूच्या दोघांच्या नजरा माझ्यावर आल्या. एक साधारण चाळीशीतला अन् दुसरा विशीतलाच. स्टोअरकीपरनं मला माझं 'गर्ल स्टफ' वर्तमानपत्राच्या कागदात व्यवस्थित पॅक करून दिलं. मी ते घेतलं, पैसे दिले अन् निघायला वळते तर तो विशीतला मुलगा माझ्याकडे पाहून गालात हसला. त्याची नजर माझ्यावरून फिरत माझ्या एका हातातल्या पॅक वर जाऊन पुन्हा हसत हसत माझ्याकडे आली. "दीडशहाणा.." मी ओठांतच पुटपुटले.. दुसऱ्या हाताने मी माझ्या ओढणीचं एक टोक तर्जनी आणि अंगठ्यामध्ये गोल फिरवत स्त्री नखऱ्यत त्याच्या डोळ्यांत पाहीलं, "तुला वापरायचे आहे का?" मी तडक बोलले..

 

खाडकन कानाखाली बसल्यासारखं त्यानं नजर माझ्यापासून हटवली. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं

हास्य माझ्या चेहऱ्यावर आलं होतं. मी अशीच आहे बिनधास्त... कोणालाही न घाबरणारी.. कोणाच्याही दबावात न राहणारी.. जे जे चूक आहे त्याला त्याचवेळी विरोध करणारी. जो कमजोर आहे त्याच्या पाठीशी उभी राहणारी मग तो कमजोर पुरूष असला तरीही.मला इतकंच कळतं की जोपर्यंत माझ्याकडून कोणाचं नुकसान होत नाही तोपर्यंत मीच योग्य आहे. माझ्यातल्या स्त्रीत्वाची चाहूल लागताच होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक बदलांना मी यशस्वीरित्या सामोरे गेले आहे.


माझ्या अभ्यासापासून ते घरातल्या एकूण एक कामाला मी योग्य प्रकारे हाताळले आहे. तसे घरातली कामं करणे ही काही फक्त माझी मक्तेदारी नाही. पण तरीही मुळात स्त्रीत्वातल्या जास्तीच्या ऊर्जेमुळे ती आम्ही घेतलेली अॅडीशनल जबाबदारी असे मी समजते. पुरूषांमध्ये नसते ही जास्तीची ऊर्जा. अन् असली तरी ती रूपांतरीत होत असते.. कधी तंबाखू, गुटखा तर कधी दारूत. कधी मेलइगोतही अडकते. फक्त काही टक्के पुरूष आपली ऊर्जा सकारात्मक कार्यात देऊन घरकामात मदत करतात. ऊर्जा कधीही नष्ट होत नाही ती रूपांतरीत होत असते हे खरेचआहे. म्हणूनच तर पूर्वी स्त्रिया एकत्र कुटुंबात आपली सर्व ऊर्जा झोकून देत. आजच्या लहान कुटुंबातल्या स्त्रिया नोकरी करून घर सांभाळतात. सांगायचं इतकच की आपल्यातली ऊर्जा स्त्री इतरांच्या सुखासाठीच उपयोगात आणते. आजकाल स्त्री सबलीकरणावर गल्लीगल्लीत व्याख्याने देणारा समाज आढळतो. या चर्चा सुरू असतानाच हाच समाज समोरून एखादी स्त्री (सुंदर स्त्री मुद्दामच नाही म्हटले कारण मुळातच आम्ही सुंदर असतो.) जाताना दिसलीच, की वरपासून खालपर्यंत तिला न्याहाळतो.


बरं मग काय उपाययोजना आणल्या या समाजाने आतापर्यंत.. तर काहीच नाही. कोणाला सबल करायच्या गोष्टी करतो हा समाज.. स्त्री ला...अरे चारपाच जणांच्या घोळक्याने आडवळणावर पकडलेच एखाद्या पुरूषाला आणि भागवली आपली वासना अनैसर्गिक पद्धतीने. काय करणार आहे तो पुरूष.. पोलिसात जाणार? घरी सांगणार? जास्तीत जास्त बदला घेईल पण फायदा काय.. जे झालं ते बदलू शकणारं आहे का? अर्थातच नाही. म्हणूनच स्त्री सबला करणं हा काही मुद्दा असू शकत नाही. त्याऐवजी जसे संस्कार घरी मुलींवर केले जातात तसेच मुलांवरही झाले हवेत. बलात्कारी फक्त मुलं नसतात, त्याला कारणीभूत त्याच्या घरातले संस्कार आणि तितकाच पोकळ गोष्टी करणारा हा समाज. 


माझी एक बालमैत्रीण आहे नेत्रा. तिचे आईवडील अपघातात गेले अन् लहान भावाची जबाबदारी तिच्यावर आली. नेत्रा आणि तिच्या लहान भावामध्ये जवळपास आठ वर्षांचं अंतर. तिने जॉब जॉईन करून भावाचं शिक्षण, खेळ, लाड सर्व काही जपायला चालू केलं. खरंतर कमी वयातच स्वतःचं शिक्षण सोडून बहीण नाही तर आई व्हाव लागलं. या जबाबदारीने ती किंचितही ढळली नाही उलट मायेने आपल्या लहान भावाला जपत आली आहे. नेत्राचा किस्सा सांगण्यामागचा उद्देश हाच की जेव्हा रक्षाबंधन येते तेव्हा राखी कोणी बांधायची. नेत्राची रक्षा खरंच ते चिमुकले हात करू शकतील का..? माझा रक्षाबंधन या सणाला अजिबात विरोध नाही. पण त्यामागचा हेतू, इतिहास असा का की अबला बहिणीची रक्षा भाऊ करेल. कशासाठी..? बहीण खरंच अबला आहे का? रक्षाबंधन साजरा व्हावा पण तो भाऊ बहिणीतील प्रेम जपायला असा साधासुधा उद्देश नाही पटत का? आणि जर फक्त बहिणीची रक्षा करणे हाच एकमेव उद्देश असेल तर नाही रूचत मला हे स्पष्टीकरण. 


परवाच एका मुलीने तिची छेड काढणाऱ्या मजनूच्या कानाखाली जाळ काढला. बरं वाटलं बघून.. पण तिथं जमलेल्या जमावाने लगेच तिला मर्दानीची उपमा दिली. यातला भाव लक्षात घेता हे कळून येते की ती अन्यायाविरूद्ध आक्रमक झाली की मर्दानी म्हणजेच पुरूषाप्रमाणे. मग तिचं स्री म्हणून असलेल्या अस्तित्वाचे काय. आक्रमकतेचा ठेका फक्त पुरूषांकडे. पुरूषानेच आक्रमक व्हाव, त्यानेच मनात येईल ते बिनधास्त बोलावं, त्याने लाज बाजूला ठेवून समाजात वावरावं. अन् स्त्री ने मान खाली घालून अन्याय सहन करून राहावं. फरक हा याच विचारसरणीतून निर्माण झाला आहे. अगदी पूर्वीपासूनच आणि त्याचाच प्रभाव अजूनही या समाजावर पर्यायाने स्त्री मनावर राहीला आहे. परिस्थिती तोपर्यंत बदलणार नाही जोपर्यंत समाज आपल्या चुकीच्या समजूती बदलणार नाही.


"नाही बोलते तर कोपऱ्यात घे ना तिला एकदा..." दोन मुलांमधलं संभाषण सहज कुठेतरी जाताजाता कानावर पडलं. तळपायातली आग मस्तकात गेली पण त्यांच्यातल्या विवेकबुद्धीची कुवत लक्षात घेऊन त्यांना उत्तर देण्याच्या फंदात नाही पडले मी. सर्रास ही आणि असली विधाने ऐकायला मिळतात. पिळवटून टाकणे, कुस्करणे, दाबणे ही अन् असली शेकडो क्रियापद स्त्री पुढे वापरली जातात. पण एखाद्या स्त्री ने पुरूषाला कुस्करनं, दाबणं कसं समाजाला ऐकवणार पण नाही. मग स्री-पुरूष समानतेला समाजाची हीच मानसिकता अडसर ठरत नाही का?


एखादी स्त्री तिला जबरदस्ती कोपऱ्यात नेऊ पाहणाऱ्या पुरूषाला निश्चितच प्रतिकार करू शकते. किंबहूना झालेच कधी मन तिचे तर ती नाही का जबरदस्ती एखाद्या पुरूषाला कोपऱ्यात घेऊ शकत? अर्थातच घेऊ शकते. पण नाही करत सहसा ती. कारण ते तिच्यावर घडवलेल्या संस्कारात मोडत नाही. लहानपणापासूनच सर्वच पुरूषांवर असे संस्कार झाले, तर त्यांना लाज, भीती, करूणा आणि गरज असेल तितकाच मोकळेपणा यांची जाणीव होऊ शकेल. आणि मग कशाला विषय हवा स्त्री-सबलीकरणाचा. 

 

मागासलेला वा आपल्याच पोकळ बुडाच्या भ्रामक समजुतींमध्ये रूळलेला दुर्बल समाज स्वतःच्याच अस्ताकडे एक एक पाऊल सरकवत आहे. आणि हे आम्हाला सबलीकरण शिकवतात... कोणाला स्त्रीला? जिचे अस्तित्व आज एका राज्यात हजार पुरूषांच्यामागे थोडे कमी काय झाले की संपूर्ण गोंधळ उडाला... 


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract