Komal Mankar

Abstract Inspirational Others

4  

Komal Mankar

Abstract Inspirational Others

शनी आला, राहू गेला अन् मंगळाने घात केला

शनी आला, राहू गेला अन् मंगळाने घात केला

3 mins
325


दैवी शक्तीच्या आहारी जाऊन माणसाने स्वतःची बुद्धी तर गहाण ठेवलीच पण, आकाशातले ग्रह-तारे ह्याचा माणसाच्या संसारीक जीवनाशी तीळमात्र संबंध नसताना ते कुंडलीत कसे प्रवेश करतात हेच मला कळत नाही. राशी, ग्रह, जन्मकुंडली, राशी देवता ह्या साऱ्याचा प्रभाव माणसावर पडतच नाही. जशी निसर्गाने मानवाची निर्मिती केली तशीच निर्मिती सर्व नैसर्गिक घटकांची झाली आपण त्याकडे निसर्गाचा एक अविभाज्य भाग आहे हे समजून न बघता आध्यात्मिक कल्पना करतं बसणे किती मूर्खपणाचे लक्षण आहेत हे समजून येईलच. माणूस एखाद्या गुरु किंवा ढोंगी बाबाच्या आहारी जाऊन उलट स्वतःचं नुकसान कसा करून घेतो हे मला माझ्या वैयक्तिक जीवनात बघितलेल्या उदाहरणावरून स्पष्ट करावे लागेल. 


अनिता जवळजवळ तीस वर्षांची झाली. अनिता शिकत राहिली आणि लग्नाचं वय वाढतं गेलं. पावना घरात ठरायचा नाही, लग्न जुळायचं नाव नाही म्हणून अनिताच्या आईला शेजारच्या एका स्त्रीने फुकटचा सल्ला दिला. अनिताची आई तुम्ही देवळात जा म्हणे तिथे रिद्धीसिद्धी प्राप्त झालेले बाबा बसले असतात ते नक्कीच तुम्हाला लग्न जुळण्यासाठी उपाय सांगतील तो करा. अनिताच्या आईनेही त्या स्त्रीचं म्हणणं ऐकलं. अनिताजवळ आईसोबत देवळातल्या बाबांजवळ जाण्यावाचून दुसरा काही पर्याय नव्हता.


एक दिवस दोघी मायलेकी देवळातल्या बाबांजवळ गेल्या. देवळातल्या बाबाने आधी तिचा हात बघितला. त्यांचं हात बघणं हे प्रथम कार्य असतं मग हळूहळू थोतांडपणा सुरु होत असतो. त्यांनी हात बघून तिला सुचवलं, "अनिता आपल्या हातात लग्नरेषा सुकळ समृद्ध आहे. लग्न आज ना उद्या होईलच पण तुमच्या नाव राशीत दोष आढळतो. मला तुमची कुंडली आणून दाखवा म्हणजे काय करायचं ह्यावर मी तुम्हाला तोडगा सांगतो." ह्या आधी अनिताची कधी जन्मकुंडली बनवली नव्हती. नव्याने कुंडली बनवून त्या बाबांसमोर नेऊन ठेवल्यावर त्यांनी अनिताच्या कुंडलीत दोष सांगितला. ते म्हणाले, "तुमच्या राशीत शनी ग्रह आहे, राहूचा तुमच्यावर साया आहे. त्याला शांत करावे लागेल. नाही केल्यास तुमचं लग्न जुळणं अशक्य आहे. तुम्हाला सहा महिने शनीची शांती करावी लागेल त्यासाठी दर शनिवारी कुणाची दृष्ट तुमच्यावर न पडता केळीच्या झाडाची फांदी आणून नवीन नारळ आणून एका तांब्याच्या कलशावर पूजा मांडायची. पूजा पूर्ण झाल्यास ती पूजा नदी पात्रात सोडून द्यायची आणि शनिवारीच इथे मंदिरात एरंडीच तेल दिव्यात आणून टाकायचं." 


बाबाने सांगितलेला हे नियम तिने करण्याचा प्रयत्न केला. दर शनिवारी ती कुणाची नजर आपल्यावर केळीच्या फांद्या तोडताना पडू नये म्हणून पहाटे पाच वाजता उठायची. सहा महिने तिने सतत बाबाने सांगितलेल्या उपाययोजना केल्या पण लग्न जुळायचं नाव नाही आणि बाबाने हे उपाय सांगायच्या आधीच कुंडलीतले दोष बघायचे तिच्याकडून सहा हजार घेतले होते.


आता सात महिन्यांनी ती पुन्हा बाबाकडे गेली. एवढे उपाय करून अजून माझं लग्न कसं नाही जुळलं हे विचारायला. तर बाबाने तिचा हात आणि कुंडली बघून सांगितलं, तुमच्या राशीत शनी आणि राहुला तुम्ही शांत केलं पण आता मंगळ ग्रहाने प्रवेश केला. पोरी तुझ्यावर साडेसातीचं चक्र सुरु झालं ही एक खूप मोठी अडचण आहे. साडेसाती सुरु झाल्यावर सात वर्षं आता तुझं लग्न होणे शक्य नाही. तेव्हा न राहून अनिता बाबाला विचारते बाबा ह्यावर कोणताच उपाय नाही का तुम्ही रिद्धीसिद्धी प्राप्त आहात म्हणून मी माझं लग्न जुळेल ह्या आशेनं तुमच्याकडे आली. तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे. तेव्हा बाबाने तिला घरात होम करून तिच्या नावाची पूजा घेण्यात येईल ती ते स्वतः घालतील, असे सांगितले.


या होममध्ये जाळण्यात येणाऱ्या सामग्री वीस हजाराच्या आणि पाच हजार महाराजांना तसेच जेवण देण्यात यावं असं त्यांनी तिला सांगितलं. हे सर्व केल्यावर तिचं लग्न जुळेलच ह्याची शाश्वती त्यांनी दिली नाही. ह्यावरून अनिताच्या लक्षात आले हे बाबा पैशांसाठी सामान्य जनतेला असेच लुटतात. ह्याच्या नादी लागून आपण फसलो ह्याची जाणीव होताच ती त्या बाबाच्या उपाययोजनापासून सावध झाली परंत तिने त्या बाबाच्या मंदिराचा उंबरठा ओलांडला नाही. बाबांनी तिला हे उपाय केल्याशिवाय सात वर्षे तुझं लग्न होणे शक्य नाही असेही सांगितले होते पण तिचं त्याचं महिन्यात लग्न जुडलं आता तिच्या लग्नाला तीन वर्ष होतील अनिता एका लेकराची आईही आहे. ह्यावरून माणसातला अंधविश्वास दिसून येतो आणि अशा बाबा महाराजाच्या आहारी जाऊन सुशिक्षितांनी स्वतःवर ओढवून आणलेलं संकट, पैशाचा चुराडा वेळेचा झालेला दुरुपयोग आणि बाबाच्या कचाट्यात सापडल्यावर एकदाची तिथून सुटका होणे कठीण ते तुम्हाला बरबाद करूनच सोडतील हे सत्य नाकारता येणार नाही. म्हणून सतर्क राहा भोंदू बाबांपासून सावध व्हा! शनी आला राहू गेला अन् मंगळाने घात केला असं होऊ देऊ नका.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract