मला भेटलेली अनामिका
मला भेटलेली अनामिका


पहाटेचे साडेपाच वाजले होते. वातावरणात गारवा, अंगाला भिडणारी थंडी, रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने कडाक्याची थंडी होती. वाटेतील पूल क्रॉस करत डांबरी रस्त्याचा कडेने जाताना रस्ता संपताच धुळीने माखलेल्या नागमोडी वळणाची सुरुवात झाली. पायवाट चुकल्याची मला जाणीव झाली.
झाडांची गर्दी आणि सगळीकडे पसरलेली आल्हादायक शांतता, भयाण शुकशुकाट, रातकिड्याचा किर्रकिर्र आवाज कानात गुंजत होता आणि तेवढ्यातच एका झाडाच्या कडेला पाठीमागे कुणाच्या तरी रडण्याचा आवाज आला. भरधाव रस्ता गाठत झपाझप चालणारी माझी पावले धीरगंभीर आणि मंद झाली होती.
अंधारात कुणीतरी रडत होते, तो स्त्रीचा आवाज होता. अतिशय खिन्न झालेलं हृदय ओक्साबोक्शी रडतं होतं. मी घाबरून गेले.
कोण आहे? त्या झाडाच्या मागे... कोण आहे तिथे, जीव मुठीत घेऊन मी विचारण्याचे धाडस केले.
ओळखलं नाहीस का गं मला? एका मुलीचा तो आवाज माझ्यासाठी नवखाच होता.
नाही, भीत भीतच मी नाही म्हटले.
अरे, असे काय करतेस? गेले पंधरा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक न्यूज चॅनेल्स अन् वृत्तपत्राची हेडलाईन झाले मी.
काळ्या कपड्याने पूर्ण शरीर झाकून घेतलेली साधारण 14 ते 15 वर्षे वयाची एक गोंडस, पण जीर्ण मन होऊन दुःखाने व्याकुळ झालेली मुलगी मला दिसत होती.
अंगाला शहारे यावे आणि तिथून पळत सुटावे, अशी माझी त्या वेळेला स्थिती झाली.
वाटलं माझ्याच डोळ्यातून आता रक्ताचा पूर वाहतोय. हृदय धडपडायला लागलं.
एका कप्प्यातून बाहेर पडलेलं जड अंतःकरण तिच्या शालेय जीवनावर बोलू पाहतेय.
भीत भीतच मी तिला म्हटलं, तू कोपर्डीची ती तर नाहीस ना? हे वाक्य तोंडातून बाहेर पडले.
दुर्दैवाने तू बरोबर ओळखलं, हो मी तीच. शिवरायांच्या महाराष्ट्रातली अबला स्त्री.
क्षणभरसाठी शिवरायांचं तिच्या तोंडून नाव ऐकून मला शिवरायांच्या जबर शिक्षेची आठवण येऊन गेली. परस्त्रीचा मान राखणारे शत्रूच्या पत्नीलाही बहिणीसमान वागवणारे शिवबा. गुन्हेगारांचे हात शरीरापासून वेगळे करणारे. आज त्याच शिवरायांच्या देशात स्त्री सुरक्षित नाही? हा प्रश्न मनाला छळून गेला.
पुढच्या क्षणी मी तिला म्हणाले,
आम्हाला माफ कर ताई, कदाचित मानवाने स्वतःची बुद्धी आणि सामर्थ्य गहाण ठेवले आहे. माणुसकी ओळखायला.
हिंस्त्र पशूही असा विध्वंस करायास दहादा विचार करेल. इतकी असंवेदनशील वागणूक त्या नराधमांनी तुला दिली. कीव येतेय मला त्यांच्या असंस्कारची अन्
मागसलेपणाची.
खरंच कीव येतेय तुला?
तिच्या प्रश्नातील तिटकारा समजण्यासारखा होता. हो गं कीव येतेय मला.
चीड कमी आणि वाईट जास्त वाटतं, संताप तरी कुणावर करावा?
रोज वर्तमानपत्र हातात घेतलं की, तीच घटना, कुणाचा तरी बळी जातो. कधी तर चौदा - पंधरा वर्षांची बालिका त्यात बळीचा बकरा बनते. आरोपीचा तपास चालू
आहे, त्यांची शोधमोहीम चालू असते तिचा मात्र जीव जातो. त्याला कोणती शिक्षा देऊन तिला न्याय मिळाला म्हणताना तिचा जीव वापस येऊ शकतो का? गुन्हेगाराला फाशी झाली हे मात्र शून्यातच उभं राहतं. कधी तर हेडलाइन बघताच क्षणी हातचे वर्तमानपत्र टाकून द्यावे वाटते. नाहीतर सारख्या रोजच्या घडणाऱ्या त्या बातमीने मन वैतागून जाते आणि वर्तमानपत्र हातातच न घ्यावे असे वाटते. इतका कसा एक मनुष्य दुसऱ्या मनुष्यसोबत हिंस्त्र पशूसारखा वागू शकतो, याचा कुठेच मेळ जमत नाही.
वातावरणात गंभीरता पसरल्यासारखी वाटत होते.
ती म्हणाली, अशीच कीव आली होती ना तुम्हाला 16 डिसेंबरला त्या दिल्ली कांडानंतर काय फरक पडला त्याचा?
खाली मान घालून मी ऐकत होते. परवाच मला दिल्लीची निर्भयाताई भेटली होती, किती उद्विग्न होती माहिती आहे तुला?
तिला वाटले तिचे बलिदान सार्थकी झाले, तिच्या त्यागामुळे पुन्हा कोणी हैवानाला बळी जाणार नाही. त्या घटनेनंतर मेणबत्ती घेऊन सारा तरुणवर्ग घराबाहेर पडून
दिल्लीच्या रस्त्यावर जनआक्रोश आणि चीड व्यक्त करत एकतेचे प्रदर्शन करत होता. सर्वांना वाटत होते तिला न्याय मिळावा. पण, कुणाला हे का कळले नव्हते की, ती तर गेली होती हे जग सोडून कायमची. तिने देशातील तरुणवर्गाला जाग आणून दिली, पण ती मात्र कायमची गेली. तिचे बलिदान अशा दृष्कृत्याचा शेवट करेल, हा भोळा समज असावा तिचा पण, माझी ही अवस्था बघून निर्भयाताईचा आत्मा तीळतीळ तुटत होता गं !
निर्भया, अरुणा, खैरलांजीची प्रियांकाताई... तिची तर देशसेवा करायची इच्छाच धुळीत मिसळली. आज त्यांच्याच रांगेत मी सुद्धा आहे माझीही कितीतरी स्वप्नं राख झालीत.
सिद्धार्थ गौतमाच्या करूण हृदयाला अश्रूंचा बांध फुटावा आणि शंकराचा तिसरा नेत्रसुद्धा फिका पडावा इतका क्रोध तिने व्यक्त केला.
माझी काहीही चूक नसताना मी ते दुःख भोगले आहे. जिवंतपणी मरणयातना झाल्या आणि माझा जीव तळमळत गेला.
सांग मी कसं शांत करू स्वतःला? त्या नराधमानी दिलेल्या यातना मरणोतरपण मी भोगले आहे. त्यांचा शेवट कसा करू?
तिच्या प्रत्येक शब्दात चीड होती, आक्रोश होता. डोळ्यात प्रचंड आसवे होती, मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला.
आपली भारतीय संस्कृती म्हणजे स्त्री ही दिवस होता आदिशक्तीचे रूप नारी आणि रात्र होताच पुरुषी शक्तीचा प्रयोग, असं आहे. पण याहीपेक्षा आताचं विदारक सत्य म्हणजे स्त्री ना देवी राहिली ना माता, पुरुषाच्या नजरेत ती फक्त उपभोग्य वस्तू झाली आपण फक्त भारत माता की जय... असे नारे देण्याच्या कामाचे राहिलो... भारत माता की जय!
हो... एवढंच करू शकतो ना, आपला तरुण वर्ग...
हे तिच्यासमोर बोलताना माझंही मन तेवढंच रडलं. जे व्हायला नको होतं तेच घडलं.
समस्त मानव जातीबद्दल मी नाही सांगू शकत पण एवढं सांगू शकते असा प्रसंग माझ्यासमोर घडताना दिसला तर मी तो टाळण्याचा प्रयत्न करेन, आणि विश्वास देते की
असा शिवछत्रपती महाराजांच्या देशात तरुण वर्ग नक्कीच स्त्री संरक्षणासाठी उभा राहील. तुला तात्काळ शांतता लाभो, अशी प्रार्थना करते.
माझे बोलणे ऐकून ती किंचित शांत झाली. पुन्हा एखादा जीव भरडला जाऊ नये, याची दक्षता घ्या,
पुन्हा दिल्ली, कोपर्डी, सांगली, खैरलांजी अजून कुठे माझ्यासारख्या निर्भयाचा जीव जाऊ देऊ नका...
असे म्हणत ती माझ्यासमोरून अदृश्य झाली...