पऱ्यांचा तलाव..........
पऱ्यांचा तलाव..........
" मेलास का रे?" मंदार ओरडला.
" अरे वर ये ना." किती वेळ झाला" गंमत करायची ही का वेळ आहे?" ऋजुता जोरजोरात म्हणाली.
" बुडाला लेकाचा." एकमेकांच्या हातावर टाळ्या देत आशुतोष आणि मंदार म्हणाले.
" कोणी परी मिळाली बहुतेक त्याला, पऱ्यांच्या तलावातून बाहेरच यायची इच्छा नाही." पोरं हसत हसत म्हणाले.
" जलपरी कशी आहे रे? आम्ही येऊ का आत?" मुलं परत म्हणाली. सगळ्या टोळक्याला अर्णव आणि ऋजुता ची दोस्ती माहिती होती म्हणून ते त्यांना चिडवत होते.
" काहीतरीच काय बोलताय, अशी वाईट शब्द काढायची काही गरज आहे का? मदत करायचं सोडून तुम्ही अपशब्द का म्हणताय?" राधिका आणि ऋजुता दोघीजणी ओरडल्या, चिडल्या. ऋजुता आता रडवेली झाली होती. अर्णव तिचा खास मित्र, मेडिकलच्या पहिल्या वर्षापासून त्यांची दोघांची दोस्ती झाली होती.
औरंगाबाद इथल्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी परीक्षा संपल्यानंतर पऱ्यांच्या तलावाकाठी पिकनिक साठी आले होते. इतक्या दिवसाचा अभ्यासाचा शिण घालवण्यासाठी खुलताबाद जवळील पऱ्यांचा तलाव जरा आडबाजूला शांत आणि प्रेक्षणीय होता. औरंगाबादच्या मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आजूबाजूच्या पंचक्रोशीतले होते. बहुतेक जण खेडेगावातून आले, गावाकडच्या विहिरीमध्ये पोहून, पोहणे यामध्ये मध्ये तरबेज, पाण्याचं जणू भय त्यांना वाटायचं नाही. त्यातून मे महिना म्हणजे औरंगाबाद मध्ये पाण्याची बोंब. होस्टेलमध्ये जेमतेम एक बादली पाणी मिळायचे. परीक्षा झाल्यानंतर पाण्याच्या दुष्काळाचा वचपा काढण्यासाठी सगळी मुले आणि मुली पऱ्यांच्या तलावाकाठी जमले होते. सगळ्यांनीच पाण्यामध्ये डुबकी मारली होती, बरेच जण निसंकोचपणे पोहोचत होते.
खुलताबाद जवळचा पऱ्यांचा तलाव नेहमी पाण्याने भरलेला असे, उन्हाळा असो की पावसाळा, त्यामुळे आजूबाजूचे जमीन पण हिरवीगार असे. त्यातून पऱ्यांच्या तलावा बद्दल भरपूर दंतकथा देखील प्रसिद्ध होत्या, चांगल्या देखण्या तरुणाचा दरवर्षी बळी जात होता. कधीकधी पौर्णिमेच्या रात्री कोणी उत्साही तरुण मंडळी पऱ्यांच्या तलावात उतरली तर एखादा गडी आत मध्ये राहत होता, ना त्याचं प्रेत सापडत, ना तो वर येत.
बरं अशा तलावाकाठी ना कोणी सुरक्षा सैनिक ना कोणी पोलीस, प्रत्येकाने आपापल्या जबाबदारीवर यावे आणि जिवंत राहिले तर परत जावे, सगळाच मोगलाई कारभार.
बराच वेळ झाला, सगळी मुले वर आली, मुलीसुद्धा वर आल्या, पण अर्णव चा पत्ता नव्हता.
सुरुवातीला गमतीने सगळ्या मुलांनी तो मेल्याचं जाहीर केल, पण नंतर जसा जसा वेळ जायला लागला तसा प्रत्येक जण कावराबावरा झाला.
बऱ्याच मुलांनी परत पाण्यात उड्या मारल्या, पण त्याचा कुठेच पत्ता नव्हता.
थोडे दूर वरती काही कोळ्यांची मुले बोटीतून मासे पकडत होती, त्या दिशेला ऋजुता धावत गेली, हात जोडून त्यांना विनंती केली की "अर्णव पाण्याबाहेर आला नाही तुम्ही मदत करा."
म्हाताऱ्या कोळ्याने आपल्या मुलांच्या कडे सहेतुक बघितले,
" पोरी धीर धर, माझी पोरं आणतील त्याला शोधून"
म्हाताऱ्या कोळ्याने जोरात सांगितले,
दोघेजण ऋजुता बरोबर अर्णव ने कुठुन पाण्यात उडी मारली ते बघण्यासाठी आले.
अर्णव आणि ऋजुताने एकदमच एका मोठ्या खडकावरुन खाली उडी मारली होती, बराच वेळ दोघजण बरोबरच होते, नंतर अर्णव पाण्याखालून ऋजुता च्या पायाला गुदगुल्या करत होता, त्यांचा रोमान्स बहरत होता, बराच वेळ लपाछपी झाल्यावर अचानक अर्णव गायब झाला. त्याच्यानंतर मात्र तो दिसला नाही.
" कोणीही पाण्यात उडी मारू नका, पाणी ढवळू नका, माझ्या पोरांना खाली काय आहे ते दिसणार नाही." म्हाताऱ्या कोळ्याने जोरात ओरडून सगळ्या मुलांना सांगितले.
डॉक्टरी शिकणारे सगळे निशब्द झाले, त्यांना पूर्ण कल्पना होती की दहा मिनिटाच्या वर जर पाण्यामध्ये माणूस राहिला तर त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी जाऊन तो मरणच पावणार.
अर्णव पट्टीचा पोहणारा होता, व्यायामात तरबेज होता म्हणून थोडी तरी शक्यता होती ी तो श्वास रोखून कुठेतरी आहे.
" पोरांनो पाण्याची माहिती नसताना कशाला उड्या मारता, कुठे कपार आहे कुठे पानवेल आहे तुम्हाला माहिती तरी आहे का उगीचच गटांगळ्या खाता. आणि कधीही पाण्याजवळ आल्यावर ती अपशब्द बोलू नये रे , पाणी तथास्तु म्हणत असते. मेला मेला काय म्हणता , गप रहा सगळे." म्हाताऱ्या कोळ्याने या सगळ्या तरुण मुलांना जणू शब्दांचे फटकारे मारले.
आशुतोषने फायर ब्रिगेड ला पण फोन केला, मंदारने पोलिसांना फोन केला, गोविंद ने पाणबुडे यांना फोन केला मदतीची याचना केली. पण कोणालाही येण्यासाठी निदान एक तास तरी पाहिजे होता, तोपर्यंत काही खरं नव्हतं. खुलताबाद पोलीस स्टेशन मध्ये नेहमीप्रमाणे कोणीच नव्हतं. आनंद आणि मिलिंद मोटरसायकल घेऊन दौलताबादच्या दिशेने केले, काही दोर काही सामान मिळते का बघायला. पण व्यर्थ, किलोमीटरपर्यंत एकही दुकान उघडे नव्हतं.
ऋजुता दगडासारखी निशब्द बसून राहिले, तिच्या डोळ्यातून खळाखळा अश्रू वहायला लागले.
अर्णव शेतकरी बापाचा एकुलता एक मुलगा, मेडिकल च्या तिसऱ्या वर्षाला आलेला, केवढी स्वप्ने, किती सुंदर आयुष्य पुढे होतं पण आता तर! जर तो वर आला नाही तर? काय होणार? काय सांगणार त्याच्या आई-वडिलांना? नाही नाही ते विचार मुलांच्या मनात यायला लागले.
दोन तीन वेळेला कोळ्याची पोर पाण्याच्या वर आले, त्यांना कोणी सापडलं नव्हतं. प्रत्येक वेळेला आशेने सगळी मुलं उठून उभी राहात, पण कोळ्याच्या मुलांबरोबर अर्णव नाही बघून आता मात्र प्रत्येकाचा धीर सुटत चालला.
कोळ्या चा मुलगा वर आला, बापाशी काहीतरी बोलून त्याने हातामध्ये चंद्रकोरी सारखी एक सुरी घेतली आणि परत पाण्यात उडी मारली.
पाण्याच्या खाली हालचाल जाणवू लागली, पाण्याच्या वरती पाणवनस्पती तरंगू लागल्या, बराच वेळ झटपट झाल्यानंतर तीन डोके वर आली. दोन्ही मुलांनी बेशुद्ध अर्णवला वरती आणले होते.
मेडिकल ची मुले ती, ताबडतोब त्यांनी अर्णवला फर्स्ट एड द्यायला सुरुवात केली, त्याचं पोट आणि छाती दाबून पाणी बाहेर काढायला सुरुवात केली, त्यांच्या प्रयत्नाला यश येऊ लागलं, दहाव्या मिनिटाला अर्णव ने जोरात खोकला करून डोळे उघडले. त्याच्यानंतर कोळ्या ने त्याला आपल्या बरोबरच्या चाकावरती घातले, गरागरा फिरवून त्याच्या पोटातले सगळे पाणी बाहेर काढले. काही मुलांनी ताबडतोब अर्णवला कोरडे करून त्याच्या अंगावरती कपडे चढवले, त्याचा अंग गार पडत होतं, आणलेली ब्रॅन्डी त्याच्या हातापायाला चोळायला सुरुवात केली, अर्धा तासानंतर अर्णव पूर्णपणे शुद्धीवर आला.
दमलेली कोळ्यांची मुले बाजूला खडकावर बसून सगळ्या तमाशा बघत होती. राधिका ऋजुता जागेवरून उठल्या, ऋजुताने अक्षरशः त्यांचे पाय धरले. सगळ्या मुली आनंदाने रडू लागल्या. सगळ्या मुलांनी एकापाठोपाठ एक त्यांना मिठी मारली,
काय झाले आणि कसे झाले? सगळ्यांनाच उत्सुकता होती.
म्हातारा कोळी म्हणाला," पोराला स्वस्त पडू द्या, काही विचारू नका, पण तुम्ही सगळ्यांनी ध्यानात ठेवा, अनोळख्या ठिकाणी उगी सूर मारु नका."
खडका खालच्या कपारी पाशी भरपूर पाण् वेली उगवल्या होत्या, त्यातल्या एकामध्ये अर्णव चा पाय अडकला होता, कपारी मध्ये हात अडकवून त्यानी स्वतःला सोडविण्याचा भरपूर प्रयत्न केला पण पाण् वेली एवढ्या सहजासहजी तुटत नाहीत, तो जेवढा प्रयत्न करत होता तेवढा त्याचा पाय अडकत होता. कपारीचा वर येणारे पाणी कमी जास्त होत होते म्हणून मधून मधून त्याला श्वास घेता येत होता नाहीतर आज त्याचा जीवन अंत होणार होता. व्यायामाचे शरीर, आणि प्राणायामाची सवय म्हणून त्यानी आपला श्वास रोखून ठेवण्यात बरेच यश मिळवले होते. ते त्याला आता कामी आले होते.
त्याच्यापर्यंत जाण्यासाठी कोळ्याच्या मुलांना पाण् वेली कापावे लागले म्हणून चंद्राकृती सुरी घेऊन मुले खाली उतरली होती, सगळ्यांच्या नशीबाने आज आलेले गंडांतर टळले होते.
अर्णव च्या आई वडिलांना ही बातमी कळल्यानंतर ते मिळेल त्या वाहनाने औरंगाबादला येऊन धडकले. अर्णव बरोबर पऱ्यांच्या तलावाच्या बाजूच्या कोळ्याला भेटायला म्हणून ते गेले. कोळ्या चा तिथे काहीच पत्ता नव्हता.
खूप शोधल्यानंतर, कोळ्या च्या मुलाचा पत्ता लागला. वडिलांनी त्यांच्या पाया पडून त्यांची बोट धान्याने भरून टाकली.
पऱ्यांचा तलाव बळी घेतो ही दंतकथा खोटी होती तर. उलट कुठल्यातरी परीनेच अर्णवला कपारीत राहून श्वास घेण्यासाठी मदत केली असेल. अर्णवला तर काहीच आठवत नाही. एका भावी डॉक्टर चा जीव एका सुजान कोळ्याच्या मुलांने वाचवला होता.