मला काही सांगायचंय-५
मला काही सांगायचंय-५
एकनाथरावला सारं काही आत्ताच घडल्या सारखं आठवत होतं. चौघा भावां मिळुन एकच मुलगी होती. वेणू तिचं नाव. साऱ्यांची अतिशय लाडकी. तळहाताचा फोड जसा. तिच्या शिवाय कुणालाच जेवण सुद्धा जात नव्हते.
वेणूचे त्या घरात खूप म्हणजे खूपच कोड कौतुक होत होते. तिच्या मनात येईल तो ड्रेस, पाहिजे ती खेळणी, पाहिजे ते दप्तर, पाहिजे तसं सारं काही मिळत होतं. ती शाळेतही हुशार होती. प्रत्येक वर्षी ती पहिल्या नंबरने पास व्हायची. तशीच ती चांगल्या मार्कांनी बारावीची परीक्षा पास झाली होती. सगळ्या गावात पेढे वाटले गेले होते. सर्वांनी तिचे कौतुक केले होते. कॉलेजला प्रवेश घ्यावा की नाही यावर दिन तीन दिवस घरात खल चालू होता. पण तिची शिकायची इच्छा मात्र कुणाला मोडता आली नाही. ती शहरात खोली घेऊन कॉलेज करायला लागली. तिचा सांभाळ करण्यासाठी तिची आई बकुळा तिच्या सोबत राहू लागली. काका एकनाथराव, तिचे वडील जीजा दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जाऊन भेटून यायचे. सर्व काही आलबेल चालू होतं. घराण्याच्या चालीरीती, संस्कार असल्यामुळे शिक्षण व्यतिरिक्त तिचं लक्ष दुसरीकडे कुठंच नव्हतं. त्यांच्याच गावातील राहुल नावाचा तरुण तिच्याच बरोबर शिकायला होता. त्याकाळी आताच्या सारखं मोबाईल वर बोलणं होत नव्हतं. एकमेकांच्या घरी जाऊन निरोप घेतले दिले जायचे. तसेच राहुलचं कधी तरी गावाकडे येणं जाणं झालं तर एकमेकांचे निरोप आणले जायचे.
राहुल एक सुसंस्कृत, सुंदर आणि सालस मुलगा होता. एक दोन वेळेस तो घरी आला तर बकुळा त्याच्या कडे बघतच राही. ती त्याला कधी कधी जावयाच्या स्वरूपात पाहू लागली होती. एकदा सहज म्हणून तिनं वेणू जवळ विषय काढून बघितला. तेव्हा,...
"आई, मुलगा चांगला आहे नाव ठेवायला कुठेच जागा नाही. परंतु आत्ताच हा विचार डोक्यात नको घालू माझ्या. मला अजून खूप शिकायचंय." असं म्हणून तिनं तो विषय तिथंच बंद केला होता.
इकडे नाथांच्या घरात तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली होती. एखादा छानसा सुंदर मुलगा बघून तिचं लग्न करावं असं सर्वांचं म्हणणं होतं. मुलगा पाहणं सुरू झालं आणि एक दिवस नाथांची बहीण, रखमा घरी आली. वेणू केवळ शाळेतच हुशार होती असे नाही तर घरातील कामातही अतिशय हुशार, तरबेज होती. स्वयंपाक करण्यात अगदी सुगरण होती. रखमाला तर ती खूपच आवडली होती, 'सून असावी तर अशी' ती मनाशीच विचार करत होती. रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारतांना तिने सहजच लग्नाचा विषय काढला. 'कॉलेजचं शेवटचं वर्ष आसंल आता लग्न करून टाकायला पाहिजे आता.' असे ती हळूच आबांना बोलली.
"आबा, वेणू आता शहाणी झाली. तिच्या लग्नाचा विचार केला पाहिजे लवकरच." रखमा अंदाज घेण्याच्या हेतूने बोलली.
"होय गं ताई, लग्न करावं म्हणतो आता तिचं लवकरच. मनासारखा पोरगा मिळेना बघ. तुझ्या ध्यानात असंल तर सांग एखादा." आबा म्हणाले.
"कुठं पाहणं चालू आसंलच की, बघायचा एखादा आपल्या तोडीचा आन द्यायचा बार उडवून. त्यात काय एवढं?" ती आपलं मनातलं झाकून यांच्या मनातलं काढू पाहत होती.
"पाहणं सुरू आहे, पण मनासारखा पोरगा मिळाला पाहिजे ना. पोरगी शिकली सवरली आहे. तिला नवरदेवही तसाच नको का? चांगला जमीन जुमला, घरदार सगळं कसं व्यवस्थित पाहायला नको का? आम्हाला कुठं चार पाच पोरींचे लग्न करायचे आहेत?" आबा म्हणाले.
"ताई, तुझा सुरज काय करतो गं आता? दहावीला असंल नाही का आता?" आप्पांनी विषय काढला तशी बकुळाची कळी खुलली. पुन्हा सर्वांच्या मनातलं काढण्या साठी म्हणाली.
"व्हय! दहावीची परिक्षा देतोय आता. यंदा त्याच्या लग्नाचा बार उडवून द्यायचा विचार करतेय मी. आता एकटीनं काम होत नाही. हाता खाली सून आणावी वाटते लवकरच. एवढी इस्टेट आहे, जळता जळंना. शिकवून तरी कुठं नोकरी करायला लावायचीय त्याला? तुमची वेणू देता का माझ्या सुरजला?" बकुळानं शेवटी आपल्या मनातलं बोलूनच टाकलं.
"पण ताई, त्याचं वय पाच वर्ष कमी आहे, कसं काय जमायचं ते?" वेणूचे वडील जीजा म्हणाले.
"त्यात काय होतं? वयाचं काय चार दोन वर्षे इकडं का तिकडं. ताई, तुला चालत असंल तर आमची काही हरकत नाही." आबांना हे स्थळ सोडावंसं वाटत नव्हतं.
"हो. ताईला पटत असंल तर काही हरकत नाही. घेऊ जमवून." आप्पांनीही दुजोरा दिला.
"नाही. असं काही करू नका आबा. तिच्या मनानं घ्यावं लागंल. मुलाचं वय कमी असलेलं कसं चालेल?" एकनाथ म्हणाला.
"काय होतं? असला मुलगा, असलं स्थळ शोधून सापडणार नाही. घरी गडगंज संपत्ती, जमीन जुमला, मुलगा शिकलेला, निर्व्यसनी, शिवाय बहिणीचाच मुलगा. असलं दुसरं स्थळ पाहायला गेलं तर आपली सर्व तिजोरी रिकामी करावी लागेल. आणि मुलगा कसा निघतो? काय निघतो? त्याचीही काही खात्री नाही. नात्यातला मुलगा असला तर आपल्या दबावात राहतो. आपल्या शब्दाच्या पुढं तो जात नाही. जुनं नातं नवीन होईल. नवीन पायवाट तयार होईल." आबा असं म्हणताच आप्पांनीही मान डोलवत स्वीकृती दिली.
"पण तिची संमती घ्याल की नाही? तिला तर पसंत पडायला हवा ना? तिच्या मनाविरुद्ध काही करणं ठीक नाही." एकनाथ काका म्हणाले.
"जाऊ द्या. ती आल्यावर तिलाच विचारून घेऊ. मग ठरवू काय ते." जीजा म्हणाले.
"ठीक आहे. तस्सं करू. आता काय आणखी एका महिनाभरात परिक्षा होतील तिच्या. मग येईलच की घरी ती." यावर जास्त चर्चा होऊन नकार येऊ नये म्हणून बकुळानं हा विषय तिथंच थांबवला.
वेणूच्या घरचा हा विषय एकदाचा रखमाच्या कानावर गेला तेव्हा तिच्या काळजात धस्स झालं. 'अशा चांगल्या लेकराचं मातेरं करायचं का?' या विचारानं ती अस्वस्थ झाली. वेणू कॉलेज मधून आल्यावर तिनं तिच्या जवळ हा विषय काढला. वेणू तर अगदीच चिडली. रखमानं तिला जरा शांत केलं आणि शांततेत हा प्रश्न सोडवायचा सल्ला दिला. त्यांनी एक दिवस राहुलला आपल्या घरी जेवायला बोलावले. जेवण झाल्यावर त्याच्या जवळ हा लग्नाचा विषय काढला. त्यानंही मग थोडेसे आढेवेढे घेतच तयारी दाखवली. त्याला वडील नसल्या मुळं आणि आई त्याच्या विचारांना नकार देणार नाही याची खात्री असल्या मुळं तो म्हणेल तसं होणार हे निश्चित होतं. वेणू सारख्या मुलीला कोण नाकारू शकेल? म्हणून तो हो म्हणाला. परीक्षा झाल्यावर एक दिवस रीतसर मागणी घालायला त्यानं यावं आणि वेणूनं लगेच होकार द्यावा असं त्यांनी ठरवलं.
*****