मालिकेतील मनोव्यापार...
मालिकेतील मनोव्यापार...
मालिका सुरू झाल्या. अभिनय सुरू झाले. माणसं जवळ येऊन बोलायला लागले, वागायला लागले पुन्हा तेच तिरस्कार तेच छळ. पण हे सर्व आभासी. घरातली माणसे तशीच जखडून, अव्यक्त. मालिकेत माणसांना प्रवेश आहे. आमच्या असंख्य काम करणाऱ्या, स्वयंपाक करणाऱ्यांना घरात प्रवेश नाही. गावातल्या गावात नातेवाईकाकडे,लग्नाला प्रवेश नाही. अंत्यविधीला, मित्रांकडे प्रवेश नाही. निवृत्ती धारक, एकटे राहणारे यांच्याकडे कसलीच सोय नाही. एखाद्या मदत केंद्र, फोन नंबर की जिथे यांची सोय होऊ शकेल असं कुठे आहे?. त्यांच्याकडे पैसा आहे पण मनुष्यबळ नाही, बाहेर जाता येत नाही, कोणी आणून देऊ शकत नाही. असंख्य लोक ज्यांचा उदरनिर्वाह भाजी, स्टॉल, वर ते चालवत आहेत. भिकारी, असहाय्य, वाहन नसलेले यांचं काय? मध्यमवर्गीयांना व्यक्त करायला समाजमाध्यमे आहेत. सामान्यांचे काय? सामान्यांचीही दखल घ्यायला हवी.
दखल.
दखल सौंदर्याचीच घेतली जाते.
दखल यशाचीच घेतली जाते.
दखल असामान्याचीच घेतली जाते.
सामान्य ही दखलपात्र असतात.
सामान्यात ही वेगळेपण, यशोगाथा असतात.
माणसे जेव्हा बेदखल होतात तेव्हा अंधश्रद्धा, आत्महत्या हात जोडून तयार असतात.
खोटा अभिनय करणाऱ्यांना लाखो लाईक्स मिळतात. त्यांनी जगावं म्हणून प्रार्थना केल्या जातात.
घाम गाळून अभिनय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना trp नाही.
दखलपात्र जीवनाचं परिमाण trp
बेदखल जीवनाच परिमाण rip
आता मृत्यूचे सोहळे ही बंद झालेत.
wrap and rip एवढंच.
अंत्यदर्शनही बंद.
निंदक आहेत म्हणून सृजनाला वाव आहे. सापशिडीच्या खेळात साप नैराशेच्या गर्तेत नेतो तर शिडी यशोशिखराकडे नेते. लहानपणी ससा आणि कासव यांच्या शर्यतीची गोष्ट ऐकली होती, ती मोठेपणी कामाला आली. काहीच नसलं तरीही निवडुंगासारखं विपरीत परिस्थितीत वाढता यायला हवं.
कुठेही उगवता येतं, कुठेही वाढता येतं, स्वतःतून ही उमलता येतं हे भूछत्रीकडे पाहून शिकता येतं. जे माणसांनी शिकवलं नाही ते विषाणू शिकवून गेले.
नगण्य गोष्टीदेखील दखलपात्र असतात. सृजनाची व वेगळेपणाची दाखल घ्यावीच लागते. सामान्यातील असामान्यत्व शोधणे म्हणजेच दखल घेणं.