धन्यवाद शिक्षक..
धन्यवाद शिक्षक..


सुनील खेडकर या शिक्षकामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या गावाला ओळख मिळाली आहे. ते तेथील शाळेत मुख्याध्यापक म्हणून आले आणि त्यांनी त्या गावचा शैक्षणिक कायापालट केला. पाथर्डी तालुका हा कायम दुष्काळी छायेत असणारा. त्या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव. ते तालुक्यापासून पस्तीस किलोमीटरवर आहे. गावात बहुसंख्येने भटक्या जमातीतील लोक राहतात. त्यात वंजारी, मागासवर्गीय यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गावात विकासाच्या मागासलेपणासोबत मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक अनास्थादेखील होती. गावात शंभर टक्के लोक ऊसतोड कामगार व सहा महिने स्थलांतर करणारे. त्या भागात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे नोंद घेण्यासारखे आहे.
जोगेवाडीमध्ये शाळेची स्थापना १९५१ साली झाली. त्या वेळी चौथीपर्यंत वर्ग भरत होते. लोकांचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होता. शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे त्या शाळेची पटसंख्या एकशेवीस आहे व चार शिक्षक तेथे कार्यरत आहेत.
सुनील खेडकर मुख्याध्यापक म्हणून २०१२ साली शाळेत रूजू झाले. ती शाळा अनेक अभावांनी ग्रस्त होती. मुलांना पिण्यासाठी पाणी नव्हते, जनावरांचा मुक्काम शाळेतच असे, त्यामुळे मुलांना आणि पालकांना तेथे येण्याची इच्छा होत नसे.
सुरुवातीला शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले, पण लोकांनी व जनावरांनी एकही झाड शिल्लक ठेवले नाही. लोकसहभागातून पंच्याऐंशी हजार रुपये जमा करून शाळेसाठी जागा खरेदी केली व संरक्षक भिंत बांधली. हिरवळ, वाढलेली झाडे टिकवली.
मुले शाळेकडे येऊ लागली. गावातील जुन्या बोअरवेलमधून (पाचशे मीटर अंतरावरून) शाळेत पाण्याची सुविधा शाळेच्या निधीमधून निर्माण केली. दर शनिवारी, दुपारनंतर दानशूर व्यक्तींना भेटून शाळेतील विद्यार्थ्यांना भेटण्यास बोलावले जाई. पालक सहभागातून पाच लाख रुपये २०१५ ते २०१९ दरम्यान जमा केले व शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ केली. त्यातून हॅण्डवॉश स्टेशन, आर.ओ. वॉटर सिस्टिम, शाळेची रंगरंगोटी, साऊंड सिस्टिम, कॉम्प्युटर, डिजिटल शाळेला लागणारे साहित्य खरेदी करण्यात आले.
गावातील नव्हे तर बाहेरगावांहूनही विद्यार्थी शाळेत शिकण्यासाठी येऊ लागले. शाळेसाठी ती मोठी उपलब्धी होती. मुलांमध्ये आधी स्वच्छतेचा अभाव होता. शिक्षकांनी परिपाठातून मुलांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे सुरू केले. मुले टापटीपपणे शाळेत येऊ लागली.
जोगेवाडीतील मुलांचे पालक स्थलांतर करणारे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या ओळखून त्यावर उपाययोजना केली तर मुले शाळेत येतील हे ओळखून तसे प्रयत्न केले गेले. उपाय म्हणून पालकांची मते, अडचणी जाणून घेऊन त्यांचे मतपरिवर्तन केले. शिक्षकांनी पालकांची भेट घेतली व त्यांनी एकत्र येऊन पन्नास टक्के मुलांचे स्थलांतर रोखले. हंगामी वसतिगृह योजना २०१५ पासून सुरू झाली. त्या माध्यमातून तेथील स्थलांतर पूर्णपणे रोखता आले. मुले रात्री शाळेतच राहत व त्यांच्या देखरेखीसाठी एक स्वयंसेवक नेमलेला असे. त्याला एक हजार रुपये मानधन देण्यात येई. प्रत्येक विद्यार्थ्यामागे शासन सहाशे रुपये खर्च करत असे, त्यातून त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय शाळेतच होई. ती योजना २०१९ सालानंतर बंद पडली. सेमी इंग्रजीचे वर्गही शाळेत सुरू केले. शाळेतील कार्यक्रमासाठी महिला येत नसत. त्यांचा सहभाग मिळवण्यासाठी हळदीकुंकू, संगीत खुर्ची, पालक मेळावे इत्यादी उपक्रम घेतले. त्यामुळे महिला शाळेतील कार्यक्रमाला हजर राहू लागल्या. विद्यार्थ्यांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यास सुरुवात केली. पटनोंदणी २०१२ मध्ये नव्वद होती ती एकशेवीस झाली.
शाळेने पुढील नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले : १. फळा माझा मित्र -
वंचित घटकांतील व ऊसतोड कामगारांची मुले यांच्या मनात अभ्यासाबद्दल भीती असे. बहुतांश मुलांचे सर्व विषयांचे संबोध स्पष्ट नसत, म्हणून ‘फळा माझा मित्र’ हा उपक्रम राबवण्यात आला. दोन वर्गखोल्यांमधील मोकळ्या जागेत एक फलक तयार केला. मुले त्यावर मनमोकळेपणाने हाताने स्वतःला आवडणारी चित्रे काढू लागली, मुली रांगोळ्या काढू लागल्या. अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांना फळा हा मित्र वाटू लागला. ती मुले त्यांच्या हुशार मित्राकडून दुपारच्या मधल्या सुट्टीत संख्याज्ञान, संख्यावरील क्रिया शिकू लागली. मराठीतील मुळाक्षरे, इंग्रजीतील सोपे शब्ददेखील मुले शिकण्यास व लिहिण्यास लागली. इयत्ता पहिली ते चौथी असा सर्व वर्गांतील मुलांचा समावेश असल्यामुळे आपोआपच वर्ग ही संकल्पना न राहता मुले लहान-मोठ्या सर्वांकडून शिकू लागली. त्याचा फायदा असा झाला, की तीन महिन्यांत अभ्यासात मागे असणारी मुले हुशार मुलांसोबत आली. विद्यार्थ्यांची व्यक्त होण्याची उणीव भरून निघाली.
२. परिसराशी नाते जोडुया : मुले शाळेत अधिकाधिक रमण्यासाठी व टिकण्यासाठी हा उपक्रम राबव
ला. त्यात मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांतील शब्द, वाक्य, अनेक संबोध दोन फूट बाय एक फूट अशा बोर्डावर लिहून ते झाडावर; तसेच, परिसरात लावले. मुले सकाळी शाळेत आल्यानंतर परिसरातील ते सर्व बोर्ड वाचत बसत. त्या उपक्रमाचा फायदा असा झाला, की मुलांच्या मनातील अभ्यासाविषयाची भीती दूर झाली. विविध विषयांतील अनेक संबोध पहिली ते चौथीच्या मुलांना समजू लागले.
सातत्याने एखादा मजकूर किंवा आशय समोर जर आला तर तो चांगला लक्षात राहतो. असे प्रयोग अनेक गावांतून होण्यास हवेत. शाळेच्या भिंतींवर सुविचाराबरोबर संबोधही स्पष्ट होतील अशा काही गोष्टी येण्यास हव्यात.
३. चला, मुलांनो व्यक्त होऊ या : मुलांनी स्वतःमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी बालसभा हा उपक्रम राबवला. त्यामध्ये मुलेच सर्व नियोजन करतात. दरमहा होणाऱ्या बालसभेसाठी वर्गावर्गात नोटिस काढून, वर्गातून मुलांची नावे व ते काय सादर करणार याची माहिती मागवली जाते. नंतर, कार्यक्रमाच्या दिवशी मुले गाणी, नकला, गोष्टी, प्रश्नमंजुषा, प्रयोग सादर करतात. अशा रीतीने मुले व्यक्त होऊ लागली व नवनवीन घडामोडींचा त्यांचा अभ्यास होऊ लागला. हाताची घडी तोंडावर बोट हे तत्त्व वापरून चालणार नाही, तर मुलांना बोलते करून त्यांना व्यक्त होऊ देणे हे महत्त्वाचे ठरले आहे.
४. स्वच्छ मुलगा, स्वच्छ मुलगी व शालेय मंत्रिमंडळ : मुलांना वैयक्तिक स्वच्छतेची सवय लागावी या हेतूने हा उपक्रम सुरू केला. ज्यांचा गणवेश स्वच्छ धुतलेला, तसेच व्यवस्थित नखे व केस असलेले, बेल्ट व ओळखपत्र व्यवस्थित लावलेले आहेत, अशा नीटनेटक्या राहणीच्या मुलांना फूल व बक्षीसरूपात वस्तू देऊन गौरवले जाते. शालेय मंत्रिमंडळ तयार केले. त्यात सर्व मंत्री मुलेच असतात. जी मुले शाळेत येऊ शकली नाहीत अशा मुलांच्या घरी मंत्रिमंडळातील सदस्य जाऊन ती शाळेत का आली नाहीत याची विचारणा करतात व ती माहिती सरांपर्यंत पोचवतात. स्वच्छता मंत्री, गुणवत्ता मंत्री हेही त्यांची त्यांची कामे चोख बजावतात.
विद्यार्थी गुणवत्ता व उपस्थिती वाढवण्यासाठी या उपक्रमांसोबतच मुलांसाठी बाल नर्सरी, बाल ग्रंथालय, स्वयंअध्ययन फळा, आदर्श परिपाठ, इंग्रजी शब्द, तारखेनुसार पाढे, सामान्यज्ञान, बोधकथा, विद्यार्थी वाढदिवस, स्वच्छ मुलगा वा मुलगी यांचे स्वागत, स्पर्धात्मक गणेशोत्सव, शालेय मंत्रिमंडळ, विद्यार्थी बचत बँक, बेटी बचाव बेटी पढाव, निबंध स्पर्धा, शैक्षणिक साहित्य कार्यशाळा, वृक्षदिंडी, विज्ञानकरिअर मार्गदर्शक, वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम, लोकसभा अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे संस्कार दिले जातात.
उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुढील फायदे झाले.
१. शाळेची पटसंख्या वाढली.
२. गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळू लागले.
३. विद्यार्थी स्थलांतर शंभर टक्के रोखता आले.
४. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळाला.
५. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
६. पालकांचा शाळेकडे मदतीचा ओघ वाढला व नकारात्मक दृष्टिकोन बदलला.
७. विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक,भावनिक विकास झाला.
८. शाळेत येणाऱ्या मुलींची संख्या वाढली.
९. वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य झाले.
१०. दानशूर व्यक्तींचा मदतीचा ओघ वाढला.
करोना काळात शिक्षकांनी गावातील कोविड सेंटरला पन्नास हजार रुपयांची मदत केली. शाळा समाजासाठी काय करते याचे ते आदर्श उदाहरण आहे. आमिर खाननेही ‘पाणी फाउंडेशन’ कार्यक्रमाच्या वेळी त्या शाळेला भेट दिली.
या छोट्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून शाळेची वेगळी ओळख निर्माण झाली.
सुनील खेडकर हे पाथर्डी तालुक्यातील तीनखेडी गावचे. शाळेपासून ते बारा किलोमीटरवर आहे. खेडकर यांनी यापूर्वी धुळे जिल्ह्याच्या तिखी, पाथर्डी तालुक्याच्या मानेवाडी अशा गावी शिक्षक म्हणून काम केले. ते म्हणाले, की माझे वडील शेतकरी आहेत. त्यांची इच्छा मी शिक्षक व्हावे व मुलांना उत्तम शिकवावे अशी आहे. ती मी पूर्ण करतो. मी आधीच्या दोन्ही ठिकाणी उपक्रम सुरू केले. परंतु लोकांचा सहभाग लाभला नाही. जोगेवाडीत मात्र पालकवर्ग जागरूकपणे प्रतिसाद देतो. खेडकर यांचे शिक्षण बारावी डी एड झाले आहे. ते बारावीला तालुक्यात पहिले आल्यामुळे ‘शिरोडकर अध्यापक विद्यालय (मुंबई)’ येथे त्यांना बी एडसाठी गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. ते म्हणाले, की मला मुलांमध्ये रमण्यास आवडते. आता सुट्टी आहे तरी आमच्या शाळेची तीन मुले राज्यस्तरिय हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेत आहेत. त्यांना मी मार्गदर्शन करतो.
(सुनील खेडकर संपर्क:९०४९६७०२४५)