कोरोनायण
कोरोनायण
सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळतो. हे खरे असले तरी सूर्य नेहमीच बरोबर पूर्वेला उगवत नाही. तो कधी थोडा दक्षिणेकडे सरकतो तर कधी उत्तरेकडे. सूर्याच्या या चलनालाच अनुक्रमे दक्षिणायन आणि उत्तरायण असे म्हणतात. या धावपळीच्या युगात पोटाची खळगी भरण्याच्या नादात जो तो वेड्यासारखा धाव धाव धावत होता. आपले छंद जोपासावे, स्वतः साठी वेळ द्यावा असे मनी मानसी कोणालाही न वाटावे एवढी व्यस्तता माणसाने लादून घेतली.
अगा आक्रीत घडले! एक साधा विषाणू 'कोरोना' आला. साऱ्या जगाला आपल्या विळख्यात घेऊन मृत्यूतांडव करणाऱ्या या विषाणूने सारं मानवी जीवन स्तब्ध केले. माणूस निश्चल झाला. 'लॉकडाऊन' हा परवलीचा शब्द प्रत्येकाच्या तोंडी पेरला गेला. अवघा भारत २४ मार्च २०२० ला बंद झाला. माणसे, व्यापार, उद्योगधंदे, शाळा, महाविद्यालये, मंदिरे, प्रार्थनास्थळे, विमाने-मोटार-गाड्या-वाहने, बाजारपेठा, वस्ती-वाड्या-तांडे-गाव-शहरे-नगरे-महानगरे इ. कोरोनाने बंद झाली. धावपळ थांबली! माणूस थांबला. वेळ मिळाला. श्वास कळला!
मी विश्व इन्स्टिट्यूट युरॉलॉजी व किडनी सेंटर, नांदेड या महाराष्ट्रातील नामांकित मूत्ररोग, किडनीरोग आणि डायलिसिस सारख्या सुविधा देणाऱ्या आणि मूत्रसंस्थेच्या आजाराच्या निवारणार्थ निस्सिमपणे स्वतःला वाहून घेतलेल्या हॉस्पिटलचा प्रशासक म्हणून कार्यरत आहे. कोरोना योद्धे म्हणून आम्ही आरोग्यसेवक लढलो. पण आमचे हे कोव्हिड हॉस्पिटल नसल्याने कामाचा ताण नव्हता. २४ मार्च २०२० नंतर व्याप-तापाच्या व्याख्याच बदलल्या. कोरोनामुळे सारे विश्व स्तब्ध झाले आणि प्रत्येकाला आपापले आयुष्य जगण्याचे, सिंहावलोकन करण्याचे, विरंगुळ्याचे काही क्षण उपभोगता आले. या कोरोनाने मला कवी बनविले. माझ्यातला कवी जागा झाला... लिहता झाला!
माझ्या आयुष्याच्या पन्नाशीत माझ्या जीवनात हे 'कोरोनायण' आलं आणि मराठी सारस्वतांच्या रांगेत कुठंतरी मला उभे राहण्याचे भाग्य मिळालं. कोरोनाने कुणाला काय दिलं, कुणाचं काय नेलं? हा चिंतनाचा विषय आहे परंतु माझ्यातला कवी जागा करणारा हा कोरोना माझ्यासाठी तरी इष्टापट्टीच ठरला, असे मला वाटते. या काळात मी लिहलेल्या कवितेचा हा माझा दुसरा संग्रह 'कोरोनायण' रसिकांच्या हाती देतांना मला आनंद होत आहे.
या काव्यसंग्रहाची पाठराखण करणारे आणि माझ्या विनंतीला होकार देऊन प्रस्तावना देणारे माझे मार्गदर्शक, जेष्ठ आणि प्रसिद्ध साहित्यिक, मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य श्री देवीदासजी फुलारी सर यांचा मी ऋणी आहे.
माझ्यावरील स्नेह आणि प्रेमापोटी आपला वेळातला वेळ काढून मला कौतुकाची थाप आणि मलपृष्ठासाठी भरभरून शब्दरूपी आशीर्वाद देणारे जेष्ठ कवी, व्यासंगी साहित्यिक आदरणीय श्री अशोकजी बागवे काका यांचे आभार मानणे ही माझ्यासाठी केवळ औपचारिकता असू शकणार नाही.
या संग्रहाला आकर्षक रूप देऊन ते प्रकाशित करण्याची आनंदमयी भूमिका आणि जबाबदारी लिलया पेलणारे स्वयं प्रकाशन, पुण्याचे प्रकाशक- मालक आणि स्वतः गझलकार असणारे माझे मित्रवर्य श्री शुभानन चिंचकर आणि त्यांचे सहकारी या सर्वांचा मी कायम ऋणी आहे.
माझा परिवार, माझे सोशल मिडियावरील असंख्य मित्र ज्यांनी मला सतत लिहिते ठेवले नव्हे माझ्या लिहिण्याची प्रेरणा ठरले त्या सर्वांचा ऋणनिर्देश करणे मी टाळूच शकत नाही.
माझ्या शब्दाटकी या मराठी गझलसंग्रहावर मराठी रसिकांनी भरभरून प्रेम केलं. हातोहात पहिली आवृत्ती संपली... एवढंच नाही तर मराठी साहित्य मंडळाचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले साहित्यभूषण पुरस्कार संग्रहाला मिळाला. असेच उदंड प्रेम मराठी रसिक मायबाप या 'कोरोनायण' काव्य संग्रहावर करतील, असा मनोमन विश्वास आहे.