कोरोनामुळे माणुसकी संपली का??
कोरोनामुळे माणुसकी संपली का??




कोरोना आणि लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपण डॉक्टर आणि पोलीस हे स्वतःचा जीव धोक्यात घालून सगळी परिस्थिती आटोक्यात आणण्याचा किती प्रयत्न करतायत ते पाहतोय. सोबतच काही कलाकार मंडळी, सामान्य माणूसही आपापल्या परिने या बिकट काळात मजुरांना, गरीब लोकांना, हातावर पोट असणाऱ्यांना मदत करतायत तेही पाहतोय... एकीकडे पायी चालत जाणारा मजूर बघताना जीव हळहळतो तर असे मदतीचे हात पुढे आलेले पाहून उर भरूनही येतो. पण याच वाईट काळात घडत असलेल्या पुढील काही घटना पाहून मन हेलावतं आणि वाटतं खरंच माणुसकी अजून जिवंत आहे की तिचाही अंत झाला???
एक घटना नुकतीच वाचनात आली. एका तरुणाचे साठ वर्षाच्या आसपाशीचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळले. तातडीने एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना हलवण्यात आलं. त्यांची तब्येत इतकी गंभीर होती की त्यांना ICU मध्ये ठेवण्याची गरज होती पण ICU बेड अव्हेलेबल नाहीत असं सांगून त्यांना जनरल वाॅर्डमध्येच ठेवण्यात आलं. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाखाच्या वर फीची मागणी केली आणि तेवढी परिस्थिती नसल्यामुळे मुलाने जनरल वाॅर्डमध्येच त्यांना ऑक्सिजन मास्क लावून ठेवण्याचा निर्णय घेतला. काही वेळ कामासाठी बाहेर गेलेला मुलगा परत हॉस्पिटलमध्ये येऊन बघतो तर वडिलांचं ऑक्सिजन मास्क जमिनीवर पडलेलं... आजूबाजूला कोणीच नाही. शेवटी तोच ऑक्सिजन मास्क लावून वडिलांच्या जीवाची होणारी तगमग बघत बसला. खूपच तब्येत खालावल्यानंतर त्यांना icu मध्ये हलवण्यात आलं पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मुलगा अखेर पोरका झाला... कोणामुळे?? कोरोनामुळे?? Icu बेड नाहीत म्हणणाऱ्या डॉक्टरमुळे?? प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये लाखाच्या घरात फीची मागणी करणाऱ्या डॉक्टरमुळे की संपूर्ण यंत्रणेमुळेच???
घटना दुसरी - पुण्यात काम करणाऱ्या एका जोडप्याने आपल्या पंधरा वर्षाचा मुलगा आणि तेरा वर्षाच्या मुलीसोबत जळगावला त्यांच्या गावी पायी प्रवास सुरु केला. उन्हातान्हात भुकेने व्याकुळ होत, रस्त्यावर कुठून तरी मिळणाऱ्या पाण्यावर भूक आणि तहान दोन्ही भागवत कसंबसं आठ दिवसांत जळगाव जवळ पोहचले. गाव काही अंतरावरच असताना रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीवाल्याने दया येऊन त्यांना मदतीचा हात पुढे केला. आठ दिवस चालून चालून थकलेले, मुलांचे केविलवाणे चेहरे आई-वडिलांना बघवत नव्हते म्हणून स्वतःच्या मुला आणि मुलीला गाडीवरून पुढे जाण्यास सांगितले. काहीच क्षणांचा राहिलेला रस्ता कापत ते जोडपं पुढे आलं आणि स्वतःच्या निर्णयावर पश्चाताप करत बसले. कारण मुलगा एकटा त्या रस्त्यावर रडत बसला होता आणि तो दुचाकीवाला त्या तेरा वर्षाच्या मुलीला स्वतःसोबत घेऊन गेला होता. कुठे गेला... मुलीसोबत काय घडलं काहीच कळलं नाही. मैलोनमैल चालून आल्यावर नियतीने केलेल्या फसवणुकीवर आई-बाप हंबरडा फोडत बसले होते. या भीषण परिस्थितीत मजूर कसेतरी आपल्या गावाकडे जाण्याचा मार्ग शोधत आहेत हे दिसत असताना त्यांना प्रामाणिकपणे मदत करण्याऐवजी मदतीच्या नावाखाली त्यांच्या जीवाशीच खेळ खेळावा?? याला माणुसकी म्हणावी का?
घटना तिसरी - लॉकडाऊनच्या काळात सगळीच कामे ठप्प झाल्याने गरीब जनता, ज्यांचं पोट हातावर आहे अशी लोकं अन्न पाणी मिळत नाही म्हणून हवालदिल झालेत. अशीच एक हवालदिल झालेली आई आपल्या मुलीला भूक लागली म्हणून आजूबाजूला कोणाकडे भातासाठी तांदूळ तरी मिळतात का हे शोधायला गेली होती... गरिबांवर दया म्हणूनही कोणी तांदूळ दिले नाहीत म्हणून निराशा पदरात घेऊन ती मागे फिरली आणि घरात भुकेपोटी स्वतःच्या मुलीचा गेलेला जीव तिला पाहावा लागला.
गरीब जनतेसाठी सरकारने काही रेशन मोफत देण्याचा निर्णय घेतला, ही योजना अंमलात आलीही पण नक्की ही योजना गरीब, गरजू, उपाशी लोकांपर्यंत पोहोचते का?? एका लहान मुलीचा बळी कोरोनाने नाही घेतला तर उपासमारीने घेतला याला जबाबदार कोण?? एका वेळचे भाताचे तांदूळही यांना देऊ शकत नाही इतकी माणुसकी। संपुष्टात आली का???
कोरोनासारख्या आजाराने तर संपूर्ण जग एका विळख्यात सापडलंय पण पूर्णतः भरडला जातोय तो मजूर, परप्रांतीय, गरीब सामान्य माणूस. कोणी मजुराने आपल्या मुलाला गमावलं तरी त्याच्या अंत्यदर्शनासाठीही त्याला जाऊ दिलं नाही... तीन दिवस रस्त्यावर अश्रू ढाळत बसण्याची वेळ त्याच्यावर आली. एकीकडे मजूर कितीतरी हजारो किमी प्रवास करून आपल्या गावाच्या वेशीपाशी पोहोचलेत पण त्यांना आत घेतलं जातं नाही. कोणाचे पाय पोळले, कोणी भूक लागू नये म्हणून पोटाला कपड्याची वळकुटी बांधली, लहान नकळत्या जीवाला कोणी खांद्यावर घेऊन दुखऱ्या हाताची कळ मारून हा लांबचा पल्ला गाठला... एकाच आशेने की आपल्या माणसांत एका सुरक्षित ठिकाणी जाऊ... आपल्या माणसांच्या प्रेमछत्रात या जखमांना निवारा देऊ... वास्तवात मात्र कोणीं आपलं नसतं हेच अधोरेखित होतानाच चित्र पाहायला मिळतंय. ही दयनीय अवस्था फक्त परप्रांतीयांचीच होत आहे असे नाही.
महाराष्ट्रातील ऊस तोडीवरील कामगारांना त्यांच्या साखर कारखान्याकडून मदत करू असे फक्त आश्वासन दिले गेले पण प्रत्यक्षात मात्र त्यांच्या खाण्यापिण्याचीही सोय केली गेली नाही. त्यांचीही पावले डांबरी रस्त्याने घराकडे निघाली पण कोणत्याही साखर कारखान्याच्या मालकाने, नेत्यांनी, आमदारांनी मागे फिरून त्यांची चौकशीही केली नाही. इतकी पायपीट करुन आल्यावर या कामगारांना उदरनिर्वाहासाठी काहीच उरलं नाही. शिवाय त्यांच्याच गावात त्यांना प्रवेशही नाकारला जातोय.
सर्व सुख संपन्न घरात, बंगल्यात राहणाऱ्या आणि जनसेवेचे व्रत हाती घेतलेल्या या लोकांना गरिबीच्या आगीत होरपळणाऱ्या या कामगारांचे, सामान्य माणसाचे दुःख तरी कळत असेल का?? यांच्या दृष्टीने हा गरीब माणूस माणूसच नसेल का?? त्याच्या जगण्याशी किंवा मृत्यूशी यांना काहीतरी फरक पडत असेल का??
एक ना अनेक अशा विदारक घटना रोज घडतायत या गरीब जनतेसोबत, मजुरांसोबत. या जीवनमरणाच्या भयावह काळातही काही जण आपलाच फायदा बघत आहेत, कोवळ्या मुलीचं अपहरण करून नराधम माणूस माणुसकीलाच काळीमा फासत आहे... कोणी या मजुरांच्या स्थलांतरावरून राजकारण करताना दिसत आहेत... मजुरांच्या डोक्यावर आभाळ कोसळले असतानाही त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेतानाही नजरेस पडत आहे.
जिथे आज कोरोनाच्या लढ्यात हजारो, लाखो हात मदत करण्यासाठी एकटवले आहेत... प्रामाणिक, निष्ठावंत पोलीस आणि डॉक्टर स्वतःच्या जीवाची बाजी लावून आपलं कर्तव्य पूर्णपणे बजावत आहेत तिथेच वरती नमूद केलेल्या घटनाही रोज, वारंवार वेगवेगळ्या स्वरूपात कानावर पडतायत... आई आणि चिमुकलीचं रस्त्यावरचं रडणं कानांना सहन होत नाहीये... कधी हलगर्जीपणामुळे, फसवणुकीमुळे, खोटेपणामुळे किंवा कधी इतर कारणामुळेही कोणाच्यातरी घरातील व्यक्तीचा नाहक बळी जाताना दिसतोय... माणसाच्या डोळ्यातील अश्रू गोठून जिवंतपणी माणूस उन्मळून पडताना दिसतोय अशा वेळी मात्र मनाला एकच प्रश्न पडतो, "माणुसकी खरंच जिवंत आहे का?" जीव जीवाशी चालला माणसा माणसासारखा वाग रे स्वार्थीपणाचा बुरखा पांघरून माणुसकी नको संपवू रे...