जसा चष्मा तसा जग
जसा चष्मा तसा जग
जसा चष्मा तसा जग . आपल्याकडे एक म्हण आहे "काविळ झालेल्या माणसाला सगळं जग पिवळ दिसतं" म्हणजे ती व्यक्ती जशी असते तसंच तिला स्वतः सारखी सगळी माणसं दिसतात. तसाच काहीसा आजचा विषय आहे. की ज्या रंगाचा चष्मा घालू तसा आपल्याला जग दिसतं लहानपणी जत्रेत लाल, निळे, पिवळे, हिरव्या रंगाचे चष्मे ते आपण डोळ्यावर घातले त्याप्रमाणेच आजूबाजूची दुनिया दिसायची. लाल चष्मा घातल्यावर तर अगदी परग्रहावर गेल्यासारखं वाटायचं. थोडक्यात जसे विचार तुमच्या मनात त्यावेळी येतात तसंच तुम्हाला ते खरं वाटतं. अगदी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन बघा, फेशियल किंवा एखादा नवा हेअर कट केला की पार्लर वाली स्वतःच आधी, दहा वेळा म्हणेल काय छान ग्लो आलाय काय छान ग्लो आलाय मग आपल्याला पण स्वतःला वाटतं अरे वा! मी खूप छान दिसते आहे ,माझा चेहरा खूप सुंदर दिसतोय. पण घरी आल्यावर मात्र कोणाच्या चेहऱ्यावरची रेषा🙄 पण हालत नाही. मग अगदी स्वतःहून विचारलं माझ्यात काही फरक दिसतोय का? तर बारकाईने बघणार ,काही नाही मान हलवणार अहो पार्लर ला गेले होते मग काय हजार बाराशे खर्च केले असणार अहो पण चांगली दिसतेय का? काही नाही आहे तसंच आहे . आणि तिथे मात्र आपण दोन अंगुळे भूमीवरून वर चालत होतो, ते लगेच जमिनीवर येतो. तुम्ही एखाद्या दुकानात जा दुकानदारच आधी स्वतःच्या कपड्याची एवढी तारीफ करणार, आणि तुमच्या अंगावरती ती साडी कशी खुलून दिसते आहे, याचं वर्णन करणार. आणि मग आपण ती साडी घरी घेऊन येतो. घरी आल्यावर लाईटच्या उजेडात आपल्यालाच ती चांगली वाटत नाही. दुसरं मोठं उदाहरण महाभारतातलं आहे. एकदा दुर्योधन कृष्णाला म्हणतो, "माधवा तू देव आहेस, पण तुझ्याकडे दुजाभाव आहे. तू माझ्यापेक्षा झुकत माप पांडवांना देतोस" त्यावर कृष्ण हसून म्हणतो जसा जसा भाव आहे तसा मी त्याच्याकडे असतो. आणि एकदा ती प्रचिती दाखवण्यासाठी राजसूय यज्ञाच्या वेळी, दुर्योधनाला सांगतो की आता भोजनाला बसलेल्या व्यक्तींपैकी सर्वात गुणांनी परिपूर्ण असणारी व्यक्ती शोधून आण तिला भरपूर द्रव्य द्यायचा आहे तिचा सन्मान करायचा आहे. तीच गोष्ट तो युधिष्ठिरला सांगतो, पण उलटी सांगतो जमलेल्या भोजनार्थीपैकी एखादा वाईट माणूस, दुर्गुणी माणूस, शोधून आण त्याला इथून हाकलून द्यायचे आहे. दोघेही सगळ्या मंडपात फिरतात आणि हात हलवत कृष्णापर्यंत मोकळे येतात दोघांची ही प्रतिक्रिया एकच असते म्हणजे मोकळे येण्याची, पण विचारातला फरक बघा दुर्योधनाला कोणीही चांगला मनुष्य मिळत नाही कारण त्याच्या स्वतःच्या मनातली विचारसरणी तशी आणि युधिष्ठिरला कोणीही वाईट मनुष्य मिळत नाही कारण त्याच्या मनातली विचारसरणी तशी, अजून एक पुराणातलंच उदाहरण आहे, रावण जेव्हा शंकरांकडून पार्वतीला मागून घेतो आणि आपल्या खांद्यावरती घेऊन लंकेकडे चाललेला असतो, आता ती श्रीविष्णूचा आणि गणपतीचा धावा करते, नवरा मोठा उदार झालाय कोणी मागितली की बायको देऊन टाकतो पण सोडवायला काही येणार नाही मग सोडवणार कोण? तेव्हा रावणासमोर प्रथम नाराज मनी रूप बदलून येतात आणि रावणाची तारीफ करून त्याला म्हणतात तुझ्या खांद्यावरती ही माकडासारखी दिसणारी स्त्री कोण घेऊन चालला आहेस? त्यावर रावण उत्तर तो अरे ही तर त्रिपुरा सुंदरी लोक सुंदरी पार्वती आहे. छे !तुला शंकराने फसवलं बघ असाच वेश बदलून एकदा गणपती एकदा विष्णू समोरून येतात आणि रावणाच्या मनावर हे पक्क बिंबवतात की तुझ्या खांद्यावर असणारी स्त्री ही कुरूप आणि माकडासारखे दिसणारी काळी आहे तू ती कशाला घेऊन चालला आहेस? शेवटी रावण न राहून तिला खांद्यावरून खाली उतरवतो आणि त्याला पण ती त्रिपुरा सुंदरी पार्वती माकडासारखी आणि काळी दिसायला लागते, मग तो तिला तेथेच टाकून जातो त्या ठिकाणी काली मातेचे देऊळ कोकण किंवा गोवा या दरम्यान आहे. पुन्हा तेच तुम्ही तसा चष्मा घालाल किंवा तुमच्या मेंदूत जसे विचार भरवले जातील तसे तुम्हाला दिसते. अशी कित्येक उदाहरणे देता येतील. हिप्नॉटिझम सारखा प्रकार याच विचारसरणीवर आधारित आहे की समोरच्याला वातावरण निर्मिती करून तुम्हाला अपेक्षित आहे ते त्याच्या मनावर बिंबवले जाते आणि मग तुम्ही तो चष्मा घालून तसेच पाहता. पण शक्यतो आपल्या विचारातून समोरच्याला सकारात्मक ऊर्जा मिळेल असे बोलावे. आपण नकारात्मक राहिलो तर समोरची व्यक्ती देखील तसाच विचार करू लागते आणि त्याचे नुकसान होते. ****"****"*****"****" ''
