भरोसा
भरोसा
एप्रिल 26, शाळेचा शेवटचा दिवस. प्रिन्सिपल ची मिटिंग झाली आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर 45 दिवसाच्या सुट्टीचा आनंद पसरला.
नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे मी आणि माझी कॉर्डिनेटर प्रिन्सिपल सरांना ना सुट्टीच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो, सर हसले, त्यांनी आम्हाला दोघांना पण सुट्टीच्या शुभेच्छा दिल्या, एकदम टेबलावरील एक एन्वलप उचलून आमच्या हातात दिले आणि मिळाले," तुम्ही दोघी पाच दिवसाच्या वर्कशॉप साठी पाचगणी ला जाणार आहात. परवापासून वर्कशॉप आहे तुमचं नाव आधीच पाठवले आहे पैसे पण भरून झाले आहेत, बाकीची व्यवस्था तुम्हाला सोयीस्कर होईल तशी तुम्ही करा. पाच दिवस वर्कशॉप च्या कंपनीतर्फे राहण्याची आणि जेवण्याची सोय आहे."
आम्ही दोघींनी एकमेकींकडे बघितलं, सीमाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर मला थोडीशी चिंता वाटत होती. कुठल्याही ट्रीप साठी मी घराला व्यवस्थित तयार करून घरातल्या माणसांची सोय करून मगच बाहेर पडत होते. अचानक जाणे म्हणजे?
माझ्या चेहऱ्यावरील चिंतेचे जाळे बघून सर म्हणाले," आपल्या जोशीसरांचा गाव पाचगणी जवळ आहे त्यांना तुमच्या तिकीटाची व्यवस्था करायला सांगितली आहे."
झालं म्हणजे सरांनी तर सगळं ठरवलं होतं, थोडा आधी सांगायला काय झालं होतं. मला मनातून थोडासा रागच आला. ठीक आहे मुंबईच्या उकाडा पेक्षा पहिले आठ दिवस पाचगणीला मस्त थंड हवेच्या ठिकाणी बिना खर्चाचे जाणार होते.
आम्ही दोघींनी सरांना धन्यवाद म्हटले आणि बाहेर पडलो.
सीमा म्हणाली," मॅडम, काळजी करू नका, मी जोशी सरांना सांगते आणि आपली तिकीटाची व्यवस्था करते. आपल्याला उद्या रात्री जायला लागेल."
कशीतरी मान डोलावून आम्ही दोघी घराच्या दिशेने निघालो.
संध्याकाळी घरामध्ये मी ही बातमी फोडली. सासुबाई नाराज झाल्या, पण यजमान मात्र खूष झाले. " अग जा की जरूर, वर्षभर काम करून तू पण कंटाळली आहेस, घराची काळजी करू नको, आम्ही मस्त राहू. अजय आणि विजय याची मी काळजी घेईन."
मी पटपट बॅग भरायला घेतली. पाच दिवस राहायचं, व्यवस्थित साड्या ड्रेस स्वेटर, माझा ओळख पत्र, शाळेचे पत्र, एटीएम कार्ड, व्यवस्थित बॅग भरली.
रात्री उशिरा जोशी सरांचा फोन आला." मॅडम, लक्झरी बस आहे, गावI जवळ थांबेल, आणि बस पण तिथलीच आहे. तुमच्या मुलुंडच्या जॉन्सन गार्डन पाशी रात्री साडे आठ ला येईल, तयार राहा. मी आज रात्रीच जातो आहे, तुम्हाला घ्यायला मी येईल. बस नाव सावित्री ट्रॅव्हल्स."
झालं जोशीसरांनी जाण्याची व्यवस्था केली होती.
मी सीमा ला सांगितलं. सीमा ठाण्याहून चढणार होती.
दुसऱ्या दिवशी घाईघाईने जेवून मी आणि यजमान जॉन्सन पाशी येऊन थांबलो. जवळ जवळ वीस बस गाड्या निघून गेल्या, त्याच्यानंतर साडेनऊ वाजता सावित्री ट्रॅव्हल्स आली.
ड्रायव्हरने जोरात विचारले," न्यायाधीश मॅडम कोण?"
मी एकदम आश्चर्यचकित झाले. माझी ओळख देताच, ड्रायव्हर शेजारचा माणूस खाली उतरला, अतिशय आदराने माझी बॅग वरती घेतली आणि पहिल्या नंबरच्या स्वीट वरती मला बसवले. यजमानांना पण म्हणाला," दादा घरचीच बस आहे काळजी करू नका."
हळूहळू बस ठाण्याकडे आली, ठाण्याच्या शेवटच्या स्टॉप वरती सीमा उभी होती, ती आल्यावर माझ्या जीवात जीव आला.
बराच वेळ गेला, बस आता वाशी पाशी आली होती. वाशी मध्ये दोन तरुण मुली चढल्या. दहा मिनिट गाडी सुरू झाली, अचानक त्या मुली ड्रायव्हर पाशी गेल्या," काका, मोबाईल घरीच विसरला, जर तुमचा देता का, दादाला घेऊन यायला सांगते. थोड्यावेळ थांबायचं का?"
झालं, ड्रायव्हरने प्रेमाने गाडी बाजूला घेतली, आपल्या मोबाइल पोरींना दिला, जीन्स आणि टी-शर्ट भरभर दादाला फोन करून आपण कुठे आहोत ते सांगितले आणि लवकर यायला सांगितले.
ड्रायव्हरने शांतपणे बस उभी करून पोरीच्या दादा ची वाट बघितली. खरंच दहा मिनिटातच दादा आला, पोरींचा जीव भांड्यात पडला. अशा रीतीने बस सुरू झाली.
भरत तिकीट घ्यायला कोणीच येईना, आम्ही तासभर वाट बघितली. मला वाटले बहुतेक सगळ्यांनी आधीच तिकीट काढलेली आहेत.
पुढे लोणावळा पाशी गाडी थांबली तेव्हा मी सीमाला म्हटलं," आपण कुठे उतरणार तुला माहिती आहे का?"
" नाही, मला वाटलं तुम्हाला माहिती आहे." सीमा गोंधळून म्हणाली.
" हे लोक तर आपल्याला तिकीट पण देत नाहीयेत, काय झाले असेल?" माझा प्रश्न.
शेवटी ड्रायव्हरच्या बाजूला बसलेल्या माणसाला मी विचारलं," तुम्हाला माहिती आहे का आम्हाला कुठे उतरायचं आहे? जोशी सर काय म्हणाले का?"
माझ्या चेहऱ्यावर चा गोंधळ बघून, तो माणूस हसला," मॅडम जोशी सर यांच्या घरीच तुम्हाला उतरवायचं आहे."
" अहो पण गावाचं नाव काय?" माझा बावळट प्रश्न.
" जावळी खोऱ्यातील आंबेगाव" त्याचे उत्तर.
ापरे म्हणजे आपण जावळीच्या अंधार्या खोऱ्यात जाणार आहोत तर.
" तिकिटाचे पैसे घेताना?" माझा प्रश्न
"जोशी सरांनी दिलेत की. " त्याचे उत्तर.
" अहो नको, आम्ही ड्युटीवर चाललो आहोत, पैसे आमच्याकडूनच घ्या." मी बळजबरी न हजार रुपये त्यांच्या हातात कोंबले.
रात्रीच्या प्रवासात कुठेही बस थांबली की ड्रायव्हर आम्हाला विचारत की आम्ही ठीक आहोत ना? त्यांचं आदरातिथ्य बघून मला फारच छान वाटत होतं. पहाटे दोन वाजता कुठलीतरी बस थांबली, माझ्या शेजारच्या खिडकीवर टकटक झालं. चहावाला दोन चहा घेऊन उभा होता.
चहा हवाच होता. रात्रभर जागरण आणि टेन्शन. बाहेर काळा मिट्ट काळोख होता.
शेवटी सकाळी साडेचारला, अचानक काळ्याकुट्ट अंधाऱ्या रस्त्यावरती बस थांबली. बरेच वाटसरु अंधारातच उतरले.
ड्रायव्हरच्या बाजूच्या माणसांनी आम्हाला सांगितलं," तुम्ही पण इथेच उतरा, पुढे जीप थांबली आहे त्याच्यात बसा ती तुम्हाला जोशी सरांच्या घरी सोडेल."
बाहेर काळा मिट्ट अंधार होता, इथे कुठे उतरायचं? मी प्रश्नार्थक नजरेने त्या दोघांकडे बघितलं. समोर दोन दिवे दिसत होते.
आमचं सामान उतरवून आम्हाला जीपमध्ये बसवण्यात आलं.
माझ्या पर्स मधला छोटा चाकू मी घट्ट धरून ठेवला. बापरे या अंधारात कोणीही आम्हाला आरामात लुटू शकत होतं.
जीप मध्ये आम्ही दोघी मधल्या बाजूला बसलो होतो, सीमा च्या बाजूला अजून एक बाई बसली होती. मागच्या बाजूला तीन माणसं होती, कोंबडीचा टॉपला देखील होत, मला सारखं सारखं पाठीला लागत होतं. कोण कुठली माणसं, आम्ही दोघी, रात्रीच्या मिट्ट काळोखात.
जीपचा ड्रायव्हर ने बस ड्रायव्हरला टाळी दिली, आणि जीप सुरू केली.
असे कधी बस आणि जीपचा ड्रायव्हर टाळी देतात का? म्हणजे नक्कीच एका टोळीतले असले पाहिजे. माझ्या मनात आता शंके च्या कोळी जावळी पेक्षाही दाट जाळ विणायला लागला.
आता मात्र माझ्या छातीमध्ये धडधडायला लागलं. रात्रीचा काळोख, जावळीचा अंधारा रस्ता,
शिवाजी महाराजांच्या कादंबरी मधले जावळीचे जंगल आठवायला लागले.
पाचगणीचे खालचं जावळीचे दाट जंगल, समजा काही झालं तर?
ड्रायव्हरला झोप लागली तर?
बाजूच्या बसलेल्या माणसांनी आम्हाला दोघींना हात-पाय बांधून लुटलं तर?
नाही नाही ते प्रश्न डोक्यात यायला लागले.
मी हातामध्ये चाकू घट्ट धरून ठेवला. डोळे वटारून रस्त्याकडे बघत राहिले. काही ओळखीचे नाही, कधी आलोच नाही तर. पंधरा-वीस मिनिट वळणावळणाच्या रस्त्यावरून जीप सुसाट धावत होती.
एका वळणावरती जीप थांबली, सीमा च्या बाजूला बसलेला माणूस आणि ड्रायव्हर शेजारी बसलेला माणूस तिथे उतरले.
आता जीप मध्ये फक्त आम्ही दोघी आणि मागे बसलेली माणसं आणि कोंबडी ची टोपली.
कुठल्याही वाहनांमध्ये मागे बसलेली माणसं आपल्याला दगाफटका करू शकतात. मला आणि सीमाला आता प्रचंड भीती वाटू लागली.
अजून दहा मिनिटे गेले, अचानक काळ्याकुट्ट रस्त्यावरती दिव्याच्या प्रकाशात, हाफ पॅन्ट घातलेले जोशी सर दिसले.
त्यांना बघून माझ्या डोळ्यात अचानक पाणी आले आणि तोंडातुन एक आनंदाचा हुंदका बाहेर पडला.
सीमा माझ्याकडे बघायलाच लागली.
जोशी सरांनी हसून ड्रायव्हरचे आभार मानले, आमचं सामान घेऊन ते आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले.
" आता आठ वाजेपर्यंत झोपा, त्याच्या नंतर दुपारून मी तुम्हाला तुमच्या सेंटर वरती नेऊन सोडीन."
जोशी सरांना बघून मला एकदम हायसे झाले होते. ते काय बोलत आहेत त्याच्याकडे माझा अजिबातच लक्ष नव्हतं.
त्यांनी दाखवलेल्या खोलीमध्ये अंथरुणावरती हातपाय पसरून आम्ही दोघीजणी गाढ झोपून गेलो.
हा अनुभव मात्र आमच्या दोघींच्या कायमच स्मरणात राहिला.
दुसऱ्या दिवशी जोशी सर म्हणाले ," अहो बस पण आमच्या नात्यातल्याचीच आहे आणि तुम्हाला जो जीप न घेऊन आला तो माझा चुलत भाऊ होता , तुम्हाला घाबरायचं असं काहीच कारण नाही."
" इथे सर्व असेच प्रवास करतात, सगळी सगळ्यांच्या ओळखीचे, नातेवाईक, भरोशावरती तर जिंदगी चालते ना मॅडम."