आषाढस्य प्रथम दिवसे
आषाढस्य प्रथम दिवसे


सकाळपासून असणारं मळभी वातावरण. कधीही वर्षु शकतील असे श्यामल मेघ. त्या वर्षावाच्या स्वागतासाठी उत्सुक पावसाळी पवनझुल्यावर बसलेली हिरवाई.
या शामल मेघांनी आपली 'आषाढस्य प्रथम दिवसे' ही कालिदासाने नोंदवलेली मेघदुतिय वेळा अचूक पाळली आहे तर...
पूर्वी जेव्हा विविध कारणांसाठी घराबाहेर जावं लागायचं तेव्हा बरेच महिने बाहेर रहावं लागायचं आणि बहुतेकदा मंडळी पावसाळ्याच्या सुमारास हटकून आपापल्या घरी परतून यायची. प्रियजनांचा विरहकाल नाहीसा करणारा हा वर्षाकाल म्हणूनच प्रिय. म्हणूनच हा मेघराजही
प्रियजनांचा आवडताच. याचं दर्शन म्हणजे घरी परतायची नांदीच. हीच पार्श्वभूमी कालिदास कृत मेघदुतिय यक्षाच्या हळवेपणाची. या यक्षालाही मेघदर्शनाने थेट आपली प्रिया आठवते.
पण धनेशाने त्याला दिलेल्या शिक्षेमुळे, वर्षभर परतून माघारी घरी जाता येणं शक्यच नसतं.
मग काय तो त्या मेघालाच दूत बनवून आपल्या नगरीला पाठवतो. प्रियेपर्यंत आपला निरोप पोचवावा म्हणून त्याचीच विनवणी करतो. तेच हे रसिकप्रिय काव्य मेघदूत... त्याच्यासह सुरु होतो रसिकमनांचाही प्रवास रामगिरीपासून ते थेट त्याचं घर असलेल्या अलकानगरीपर्यंत अतिशय काव्यरम्य. इतका की इ. सन पुर्व ४थ्या शतकापासून ते आजतागायत अगणित मनं या मेघाचे सहप्रवासी झाल्येत. होय अगदी खरंय, तिथपासून हा आषाढमेघ भारतीयच नव्हे तर विदेशीय मनांनाही मोहवत आला आहे.
खूप विविध भाषांतल्या, विविध प्रांतातल्या प्रसिद्ध आणि रसिकप्रिय कवी कवयित्रींनाही वेळोवेळी भूल पाडली आहे याने.
आपल्या मायमराठीतही खूप जणांनी याचे समश्लोकी अनुवाद केले आहेत.
त्यामुळे एकाच श्लोकाची मनोहारी दर्शनं घडली जातात.
मुळ अलंकारिकता प्रत्येकाकडून वेगळ्यावेगळ्या रीतीने व्यक्तं झालीये. खूप मोहून घेते त्यातली विविधता .
मेघदूताचे दोन भाग आहेत पुर्व आणि उत्तर मेघ.
त्यातल्या पुर्व मेघाल्या सातव्या श्लोकाची ही अनुवादीय रूपं
पहा विविधता कशी मोहवते आहे.
मूळ संस्कृत श्लोक
(पूर्व मेघ-श्लोक ७वा, वृत्त -मंदाक्रांन्ता)
संतप्तानां त्वमसि शरणं तत्पयोद प्रियाया:।।
संदेशं मे हर धनपतिक्रोधविश्लेशितस्य।।
गन्तव्या ते वसतिरलका नाम यक्षेश्वराणां।।बाह्योद्यानस्थितहरशिरश्चंद्रिकाधौतहर्म्या।।
याचा गद्य अर्थ- हे मेघा, संतप्तांचा, व्यथितांचा तू निवारा आहेस. स्वामींच्या शापामुळे मी माझ्या सखीचा विरह फार कष्टाने सहन करतो आहे. तेव्हा माझा निरोप तेवढा माझ्या प्रिय सखीला पोहोचवण्याची विनंती तुला करतो आहे. तुला यक्षांच्या अलकानगरीमध्ये जायचे आहे. जिच्यामधले महाल, वाडे, बाहेरच्या उद्यानात असलेल्या शंभूशीर्षांवरील चंद्राच्या प्रकाशाने उजळून निघाले आहेत.
आता पहा याचे विविध मराठी काव्यानुवाद-
१). तप्तांची तू कणव जलदा! प्रीती संदेश देई
स्वामीक्रोधें सखि विलग मी पोळतो येथ पाही
यक्षेशाच्या नगर अलके जा जिथें हर्म्यकेन्द्रे
बाह्य़ोद्यानी हर उजळूनी क्षालितो भालचंद्रे।।
(बा. भ. बोरकर )
२). संतप्तांचा अससि जलदा आसरा तूं, निरोप
कांतेला दे, विरह घडवी आमुचा स्वामि-कोप
यक्षेशाचें नगर अलका तेथ जा, सौध जेथ
बाह्योद्यानीं वसत हर तच्चंद्रिका द्योतवीत।।
(सी. डी. देशमुख.)
३) संतप्तांना निरविशी, क्षेम सांगे प्रियेस
दूरप्रान्ती विरहि पडलो क्रुद्ध होता धनेश
यक्षेशाचि नगरी अलका गांठली पाहिजेस
पाही तेथे धवलित उमानाथ चंद्रे निवास।।
(पंडित ग.नी. कात्रे)
४). निवारा तू जलद व्यथितां ने निरोप प्रियाते
स्वामीशापे सखिविरह मी साहतो फार कष्टे
जायाचे तूं नगरि अलका धाम यक्षेश्वरांचे
बाह्योद्यानी धवलि इमले चंद्रमाथी शिवाचे।।
(अ.ज. विद्वांस)
५) बाह्योद्यानी शिव-शशिकरें दीप्त ते हर्म्य जेथे
यक्षेशाची वसति अलका, जायचे जाण तेथे
तप्तां देशी उपशम तसा तू मदीयें निरोपे
जा मत्कान्तेप्रति विघटनें दूर मी स्वामिकोपे।।
(द. वें. केतकर)