लग्न
लग्न
सीमांत पूजनाने झाली ,
नव्या जीवनाची सुरुवात .
असते आपले मन सांगत ,
सीमा तुझी विस्तारली आता,
आजवर तू होतीस कन्या,
आज्ञाधारक ,गुणी , सालस .
यापुढे सून,बायको,काकी
,मामी अन् माता,
नव्या नात्याची तूला आस.
हळदीचे लेपन देऊन,
मिळतो कानमंत्र माहेरून.
तुझ्या जखमा तूच भरायच्या,
कुणाला कळणार नाही
अशा जपायच्या,
समोरचा दुखावला गेला तर,
हळुवार त्याला सांभाळायचा.
मुंडावळ्या बांधून तुझी,
नवी सुरुवात जीवनाला.
लाजाहोम करतो तुझ्या ,
लाजाळू भावनांची होळी,
लग्नानंतरच्या नव्या भूमिकेची,
सुरू होते मांदियाळी.
मंगलाष्टका समजावतात,
तुला नवे नाते,नवी आव्हाने.
जा सामोरे , नकोच भिऊस,
कायम आहोत मागे आम्ही .
थकलीस तर घेऊन पाणी,
जिंकलस तर घेऊन आरती.
सप्तपदीचा सूचक इशारा..
एकमेकांच्या साथीने एकमताने ,
प्रवास तुमचा सुरू करा,
कधी पुढे तर कधी थोडे मागे.
घोका पाठ समजुतीचा,
ठेवेल कणा ताठ संसाराचा.
गृहप्रवेशात आश्वस्त तू,
बाजूला सारून संकटाना ,
घरात येईल सुखसमाधान.
सासूच्या मांडीवर बसून,
तिघांनी आरशात बघत,
एकमेकांना सांगायचे असतं,
आता आपण सगळे एकत्र .
दुःखाला म्हणावं ये ,
थांब हवे तर जरा वेळ,
पराजित होऊन जा परत.
मंगळसूत्र गळ्यात पडता
उमगतो गर्भितार्थ.
काळे ,सोनेरी मणी अन्
वाट्यांचा उपयोग सार्थ.
एकच भाव दोघांच्या मनात
दुःखाबरोबर सोन्यासारखे
क्षणही गवसती संसाराच्या
ओजळीत ह्या...
जपून ठेवू,समजून घेऊ,
दोघे मिळून क्षण सोनेरी
सुख आणू अपुल्या दारी.
लग्नाच्या ह्या नसती नुसत्या विधी रिकाम्या..
समजून उमजून घ्याव्या पारखून तरच होईल
सुफळ संपुर्ण तुमचे सहजीवन...
