ती वाट बघत्येय (भाग-६)
ती वाट बघत्येय (भाग-६)
डॉ. रमेशच्या घरी जाऊन आल्या पासून शुभांगी घरात मनमोकळे रहायला लागली होती. डॉक्टर पत्नी सरिता सोबत ती एकदम मोकळी झाली होती. तिच्या मनातली खिन्नता निघून गेली. ती प्रसन्न राहू लागली. बालम टेकडीच्या सहलीचा विषय निघाला होता. पुन्हा एकदा तिथे जायला मिळणार, तिथल्या मैत्रिणीची भेट होणार, तिच्या सोबत गप्पाही होणार, या सर्व कल्पनांनी ती खुशीने फुलायची. तिला काय माहीत की, यांनी 'तिच्या मैत्रिणीला तिला भेटू द्यायचे नाही हे ठरवले होते.'
सहलीचा विषय ठरवतांना ती बाथरूम मध्ये गेल्यावर या तिघांनी तिच्या कधीही न पाहिलेल्या मैत्रिणी बद्धल चर्चा केली होती. शुभांगीची आणि तिची भेट घडू न देता ती सहल पार पाडायचे त्यांनी ठरवले होते.
हो नाही करता डॉक्टरच्या सवडीने सहलीला जायचा दिवस निश्चित झाला, त्या संदर्भात सरीताचा फोन कॉल आला, तशी शुभांगी खुशीत आली. सहली साठी सोबत काय काय घ्यायचे त्या सामानाची एक यादी केली. शुभमच्या हस्ते चिवडा, लाडूचे सामान मागवले. घरातील कामे आटोपून स्वतःच्या हाताने चिवडा, लाडू बनवले. कारळे, जवस, खोबरे इत्यादींच्या चविष्टशा चटण्या बनवून छोट्या डब्यांमध्ये भरून ठेवल्या. कपडे इस्त्री करून ठेवले. सहलीचा दिवस ठरल्या पासून तिच्यात एक प्रकारचे नवचैतन्य भरल्या गेले होते. अतिउत्साहाने काम करतांना तिला थकवा कसा तो बिलकुल जाणवतच नव्हता. तो जाणवेलच कसा? मना सारख्या कामात का कुणी दमत असतं? मानवी स्वभावाचं असंच असतं, मनाविरुद्ध एखादे छोटेसेही काम करावे लागले तर शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारे माणूस थकून जातो. तेच आवडीचे, मनासारखे काम असेल तर थकणे तर दूरच, उलट चैतन्य भरल्या जाते. शुभांगीचेही तेच झाले होते.
ठरल्या प्रमाणे डॉक्टर पती पत्नी गाडी घेऊन दारात हजर झाले. गाडीतून उतरता उतरताच डॉक्टर म्हणाले, "काय शुभांगी वहिनी, आटोपलं की नाही अजून?"
"अरे मित्रा, आटोपलं का म्हणून काय विचरतोस? केव्हाच तयार होऊन बसली आहे ती. बस तुमचीच प्रतीक्षा होती. ती तर आता पर्यंत दहा वेळा आरशापुढे उभी राहिली असेल. कदाचित नजरही लागायची त्या आरशाला. काय शुभांगी, खरंय ना?" म्हणत शुभमने तिची फिरकीच घेतली.
"राहू द्या. तुम्हीसुद्धा एवढा वेळ तेच करत होतात की मी बॅग भरे पर्यंत. जणू कुठे मैत्रिणींवर भाव मारायला जायचं. जास्त भाव खाऊ नका. मी सोबत आहे म्हटलं." तीही काही कमी नव्हती.
तोपर्यंत डॉक्टर जोडीने त्यांच्या बॅग्ज उचलून डिक्कीत ठेऊनही दिल्या. वेळ वाया घालवून उपयोग नव्हता. सायंकाळ पर्यंत परतही यायचे होते. शुभांगी घर लॉक करे पर्यंत शुभमने त्याची गाडी पार्किंगमध्ये व्यवस्थित लावून लॉक केली. मेन गेट लॉक करून चौघेही डॉक्टरच्या गाडीत बसले. स्वतः डॉक्टर सारथ्य करायला बसले. गाडी सुरू झाली. त्यांची एका अनोख्या प्रवासाला सुरुवात झाली होती.
गाण्याच्या भेंड्या, खेळ, कोडे, मध्ये एकदोन ठिकाणी थांबून चहा नाश्ता करत एकदाचे चौघेही बाळं टेकडीवर पोहोचले. सर्वप्रथम ते तेथील मंदिरात गेले. मागच्या वेळेस शुभमने मंदिर झाडून स्वच्छ केले होते. त्यानंतर बहुतेक कुणी तरी मंदिर दररोज स्वच्छ करत असावे असे दिसले. मंदिरात थोडा वेळ बसल्यावर ते तिथून उठले. आजूबाजूच्या परिसराचे निरीक्षण करू लागले. फुलांची झाडे, नदीकाठची माहीत असलेली, नसलेली सुंदर सुंदर फुले. नदीचा खळखळाट, पक्षांचा किलबिलाट ऐकतांना, पाहतांना सारे मंत्रमुग्ध झाले होते. रमेश आणि सारिता हे पहिल्यांदाच आलेले होते, शुभमची दुसरी वेळ असूनही तोसुद्धा यांच्या प्रमाणेच भान हरपून सारे काही न्याहाळत होता. या साऱ्या गडबडीत शुभांगीकडे कुणाचेच लक्ष राहिले नाही. दूरवरून तिला न्याहाळत असलेली, तिची मैत्रीण शिवानी तिला दिसली. तोच गुलाब फुलांचा बगीचा, पांढऱ्या शुभ्र साडीत उभी असलेली 'ती'. सारे काही मागच्या वेळेस होते तसेच आताही दिसत होते. 'ती' सुहास्य वदनाने शुभांगीच्या स्वागतास सुसज्ज होऊन उभी होती. शुभांगी एका अनावर ओढीने तिच्याकडे ओढल्या गेली.
शुभांगी तिच्या गूढ मैत्रिणी सोबत मस्त गप्पा मारत होती. हे तिघेही निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत होते. किंबहुना कुणी तरी त्यांना तिथे खिळवून ठेवले होते. बहुतेक शिवानीने, शुभांगीच्या मैत्रीणीनेच ती व्यवस्था केली असावी. बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत होत्या. शुभांगीने तिचा हात हातात घेतला तसे अंगावर रोमांच उठले. काय होतंय तिला काही कळलंच नाही. काही तरी वेगळंच घडत होतं हे नक्की.
इकडे निसर्ग सौंदर्य न्याहाळत असतांना अचानक सरीताला शुभांगीची आठवण झाली. तिने आजूबाजूला बघितले, शुभांगी दिसली नाही. तिने ताबडतोब रमेशच्या लक्षात आणून दिले. आता मात्र तिघेही घाबरले होते. वातावरणात अचानक गारवा जाणवायला लागला होता. गूढ रहस्यमयता जाणवू लागली. तिघांच्याही नजरेत अपराधी भाव उतरला होता. ठरवून सुद्धा ते शुभांगीला सांभाळू शकले नव्हते.
या त्रिकुटाचे लक्ष शुभांगीला शोधत शोधत गुलाबी बागेकडे गेले. बागेत एका झाडाखाली शुभांगी कुणाशी तरी बोलत असलेली त्यांनी बघितली. समोर कोण होते ते मात्र त्यांना दिसत नव्हते. "शुभांगी, शुभांगी," आवाज देत ते तिकडे धावले. शुभांगीच्या मैत्रिणीने त्यांना येतांना पाहिले. तिने अचानक शुभांगीचा निरोप घेतला. ती दिसेनाशी झाली. तिने केव्हा हिच्या शरीराचा ताबा घेतला ते शुभांगीला कळलेच नाही. हे तिघे तिथे पोहोचले तेव्हा, शुभांगी तिथे एकटीच बसलेली दिसली.
"शुभांगी, अगं एकटीच काय करते आहेस इथे? आम्ही केव्हा पासून शोधतोय तुला आणि तू मात्र निवांतपणे बसलीस एकटी." सरीताने विचारले.
"मी एकटी कुठेय? ही काय माझी मैत्रीण आणि मी गप्पा करत होतो इतका वेळ. तुमचा आवाज ऐकून मी तुमच्या कडे पाहायला लागले अन् ती कुठेतरी गायब झाली." शुभांगीने माहिती पुरवली.
"अगं, तुला झालंय तरी काय? इथे दुर दूरवर कुणीही नाहीय. तुला काही तरी भास झाला असावा." सरिता शुभांगीला जवळ ओढतच बोलली.
"नाही वहिनी, भास नाही. नक्की काहीतरी गडबड आहे. मागच्या वेळेस सुद्धा असेच मला चुकवून इथे येऊन बोलत उभी राहिली होती. त्या वेळेसही मला इथे कुणीच दिसले नव्हते." शुभमने माहिती पुरवली.
"बरं चला तर आता. बराच वेळ झाला आहे. घरी गेल्यावर चर्चा करू यावर. चालेल ना वहिनी?" शुभांगी कडे मोर्चा वळवत डॉ. रमेश निघायची घाई करू लागला. शुभांगी मात्र यावर कुठलेही मत प्रदर्शन न करता निवांतपणे उठून त्यांच्यासोबत निघाली. ते आता परतीच्या प्रवासात होते. शुभांगीच्या मैत्रिणीला, 'शिवानी'ला नकळत सोबत घेऊन चालले होते. मात्र सारेच भारावल्या प्रमाणे चिडीचूप होते, कुणीही कुणाशी बोलत नव्हते. माहीत नाही त्यांचा हा प्रवास, ही अनोखी सहल त्यांच्या जीवनात काय काय स्थित्यंतरे घडवणार होती?