स्वप्नातून सत्याकडे
स्वप्नातून सत्याकडे
"मग आता तरी सांगशील का शेवटी कुठे घ्यायचं आहे आपण घर? कारण आजवर पाहिलेल्या इतक्या घरांपैकी तुला एकही घर मनासारखे वाटेना आणि परिणामी ते पसंत पडेना झाले आहे.मला तर वाटते आहे की आता आपण तुझ्यासाठी तुला आवडेल असे घर चंद्रावरच पाहूत आता!"
अभिजित, त्याच्या बायकोला मीनलला तिच्या अनेक घरे नापसंत करण्यावरुन चिडवत होता. ती मात्र अजुनही रात्री तिने तिच्या स्वप्नात पाहिलेल्या जगात वावरत होती. सरते शेवटी तिने सांगायला सुरुवात केली ....
"हो आपण अशाच ठिकाणी घर घेवूत..अगदी माझ्या स्वप्नांतले वर्णन सांगते बघ तुला... दाराबाहेर आल्यावर, झाडाखालची फुले वेचावित अशा इवल्या इवल्याशा तारका आपल्याला जवळ भासतील. पंख आणि पाय असे 'परीरुप'असलेली माणसे हवे तेंव्हा चालत किंवा उडत जातील त्यामूळे वाहनांमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण कोठेही नसेल.सगळे जग केवळ टेक्नोलॉजीने नव्हे तर मनाने देखील जोडलेले असेल. इतिहास हा विषय मार्कांपुरता न ठेवता आपल्या पुर्वजांनी केलेल्या चुका, लढाया, स्पर्धा यामूळे निसर्ग आणि मानवाचा झालेला नाश ते पुन्हा होवू देणार नाहीत अशी शिकवण देणारा असेल. मानवजात शिकून त्याचा उपयोग स्वत:चे भले करण्यात करुन घेतं जाईल. सगळ्या गोष्टी मुबलक असतील."
हे ऐकून अभिजित म्हणाला,"म्हणजे दीडदोनशे वर्षे अवकाश आहे असे घर घ्यायला आपल्याला ...चला सुटलो मी!"